ही संध्याकाळ कधीच विसरता येणारी नाही. (संध्याकाळ हा शब्द वाचला की काही रोमँटिक असं वाटेल, पण असं अजिबात नाही. पण, एका वेगळ्या अर्थाचा ‘रोमान्स’ जरूर आहे.) गर्दीच्या ठिकाणचे आपले रवींद्र नाट्यमंदिर संध्याकाळी फक्त गर्दीच नव्हे तर वाहतुकीच्या प्रचंड कोंडीसाठीही प्रसिद्ध आहे. आणि इतकं असूनही मी म्हणतोय की संध्याकाळ विसरता येणार नाही! तुम्ही मला वेड्यातच काढाल. पण, जरा थांबा. रवींद्रत आत तर चला. मगं खरी गमंत कळेल! तर वाचक हो रवींद्रत ‘बर्वे संचित’, या माझा मित्र चित्रकार सतीश नाईक यांनी लिहिलेल्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा होता. हा सोहळा प्रत्यक्ष अनुभवायचा होता. चित्र वा कुठलीही कलाकृती स्वतः अनुभवायची असते. अगदी तसाच अनुभव उपस्थित रसिकांना आला असणार यात शंका नाही. रूढ अर्थाने हा पुस्तक प्रकाशन समारंभ नव्हताच. प्रख्यात चित्रकार प्रभाकर बर्वेच तुमच्याशी बोलत होते व आपल्या आयुष्याश्यातील अनुभव म्हणा, शंका म्हणा तुमच्याशी हितगुज स्वरूपात मांडत होते, असेच समजाना! नेहमीप्रमाणे पुस्तक प्रकाशन झाले.. पण हितगुज संपल्यानंतरच!!
“जुल्फ बनकर बिखर गया मौसम
धूप को छाव कर गया मौसम” (राहत)
अशी काहीशी अवस्था झाली सर्वांचीच! ख्यातकीर्त चित्रकार अतुल दोडिया यांनी अस्खलीत मराठीत भाषण करून सर्वांची मने तर जिंकलीच, पण बर्वे यांच्याशी असलेले मैत्रीचे भाव खुलवून सांगून त्यांनी सिक्सरच मारली! कुमार केतकर, दिनकर गांगल, जोशी व मीनाक्षी पाटील यांनी ‘बर्वे संचित’ या पुस्तकाचे कौतुक तर केलेच, पण त्याचबरोबर सतीश नाईक यांनी केलेल्या श्रमाचे मोलही जाणले. बर्वे तुमच्या समोर उभे केले. पुस्तक प्रकाशन समारंभ तर सुंदर झालाच. पण त्याहीपेक्षा सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते साक्षात बर्वे यांच्या कोरा कॅनव्हासच्या सादरीकरणाने! हे सादरीकरण बर्वेची पान, या नावाने शेखर नाईक यांनी व कॅनव्हास आशुतोष आपटे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांच्या सहाय्याने अतिशय सुंदर केले.

बर्वे कळण्यास मदतच होते
“आकार म्हटला की त्याला अर्थ चिकटून साहजिकच आपल्या मनात तो अर्थ घुमू लागतो. आकाराला अर्थ असण्यास अजिबात हरकत नाही. परंतु चित्रकाराची खरी कसोटी, आकाराच्या अर्थात गुंतून न जाता तो आकार अर्थापासून जितका स्वतंत्र करता येईल तितका तो करण्यात आहे. कारण अर्थ त्या आकाराच्या ओळखीतून निर्माण होतो. मात्र त्यात वांग्मयीन अर्थ शोधणे गैर असल्याचे स्पष्ट मत बर्वे यांनी नोंदवले आहे. तसेच अप्रत्यक्षरित्या सूचित होणारा किंवा ध्वनीत होणारा आशय हा त्या कलाकृतीची उंची व खोली वाढवतो. चित्र आशयघन संपन्न होते ते त्यामुळे!
बर्वे तुम्ही जिंकलात!
१९६८पासून ४६वर्षांत देवाने जे काही दिले त्याबाबत आभार मानणारे बर्वे यांच्या पत्राच्या सादरीकरणाने मनात कुठेतरी सहज उद्गार निर्माण झाला की, बर्वे तुम्ही जिंकलात हो! मी केवळ नाममात्र. माझ्या हातून जर काही चांगल झालं असेल तर ती तुझी प्रेरणा असं सांगण्यासही हा थोर चित्रकार विसरला नाही. हेच तर बर्वे यांचं मोठेपण! या पुस्तक प्रकाशन समारंभाचे सूत्रसंचालन नितीन आरेकर यांनी केले तर याप्रसंगी विनील भुरके, गीता कुलकर्णी व नील दफ्तरदार यांचाही सत्कार करण्यात आला. या तिघांनी सतीश नाईक यांना अथक सहाय्य केले. कवी सौमित्र यांनी स्वतःच्या, बर्वेंच्या काही कविता वाचून कार्यक्रमास एका वेगळ्या उंचीवर नेले तर नितीन दादरवाला यांची बर्वे यांच्यावरील कविता वाचून अभिनेता मनोज जोशी यांनी चारचांद लावले. जाता जाता “Great artist can paint a great picture on a small canvas” असं कार्यक्रम संपल्यावर वाटतं राहीलं!
(लेखक विजयकुमार काळे ज्येष्ठ पत्रकार आहेत.)
छायाचित्र मांडणीः प्रवीण वराडकर

