Homeहेल्थ इज वेल्थ४०व्या वर्षापूर्वी रजोनिवृत्ती?...

४०व्या वर्षापूर्वी रजोनिवृत्ती? ते तर हृदयाने पाठवलेले पहिले पत्र!

अमेरिकेतील नॉर्थवेस्टर्न मेडिसिन या प्रतिष्ठित संस्थेने केलेल्या मोठ्या संशोधनातून एक महत्त्वाचा आणि चिंताजनक निष्कर्ष समोर आला आहे. वयाच्या ४०व्या वर्षापूर्वी नैसर्गिकरित्या रजोनिवृत्ती (मेनोपॉज) आलेल्या महिलांना हृदयरोगाचा (कोरोनरी हार्ट डीसीज) धोका इतर महिलांपेक्षा तब्बल ४० टक्के अधिक असतो. हा अभ्यास जगप्रसिद्ध ‘जामा कॉर्डिओलॉजी’ जर्नलमध्ये प्रकाशित झाला असून या विषयावर आजवर झालेला हा सर्वात व्यापक अभ्यास आहे. १०,०३६ महिलांच्या दशकांपर्यंतच्या वैद्यकीय नोंदींचे विश्लेषण करताना संशोधकांना १,०००हून अधिक हृदयविकाराच्या घटना आढळल्या, ज्यात घातक आणि बिनघातक दोन्ही प्रकारच्या हार्टअटॅकचा समावेश होता.

संशोधनाचे सर्वात महत्त्वाचे, स्पष्ट निरीक्षण

रजोनिवृत्तीनंतर शरीरातील ‘इस्ट्रोजेन’ हे संप्रेरक (हार्मोन) कमी होते. हे इस्ट्रोजेन हृदयाच्या रक्षणात महत्त्वाची भूमिका बजावते, कोलेस्टेरॉल नियंत्रित ठेवणे, रक्तवाहिन्या लवचिक राखणे आणि जळजळ (इन्फ्लेमेशन) कमी करते. वयाच्या चाळीशीआधीच हे इस्ट्रोजेन कमी झाले, तर रक्तवाहिन्यांमध्ये चरबीचे थर (‘प्लेक’) जमा होण्याची प्रक्रिया लवकर सुरू होते, रक्तदाब वाढतो आणि चयापचय बिघडते. धूम्रपान, लठ्ठपणा, उच्च रक्तदाब आणि मधुमेह या जोखीम घटकांशी जुळवून घेतल्यानंतरही हा धोका ४१ टक्के जास्त कायम राहतो, हे या संशोधनाचे सर्वात महत्त्वाचे आणि स्पष्ट निरीक्षण आहे.

भारतीय महिलांमध्ये ४७ ते ४८ वर्षे वयात रजोनिवृत्ती

साधारणपणे अमेरिकेत वयाच्या ५१व्या वर्षी रजोनिवृत्ती होते. ४० ते ४५ वयात झाली तर ‘अर्ली मेनोपॉज’, तर ४० वर्षांपूर्वी झाली तर ‘प्रिमॅच्युअर मेनोपॉज’ असे म्हटले जाते. भारतीय महिलांमध्ये रजोनिवृत्तीचे सरासरी वय ४७ ते ४८ वर्षे आहे, जे पाश्चिमात्य देशांपेक्षा कमी आहे.

ग्रामीण भागात अकाली रजोनिवृत्तीचे प्रमाण जास्त

अकाली रजोनिवृत्तीची कारणे पूर्णपणे स्पष्ट नसली तरी अनुवांशिकता, धूम्रपान, स्थूलपणा आणि दीर्घकालीन मानसिक ताण (क्रॉनिक स्ट्रेस) यांचा त्यात मोठा वाटा असतो. भारतात ग्रामीण भागातील महिलांमध्ये कुपोषण, सततचा शारीरिक थकवा आणि आरोग्यसुविधांचा अभाव यामुळे हे प्रमाण जास्त असण्याची शक्यता आहे.

हृदयाच्या दीर्घकालीन आरोग्याचा महत्त्वाचा इशारा

अभ्यासाच्या प्रमुख लेखिका डॉ. प्रिया फ्रीनी यांनी सांगितले की, “४० वर्षांपूर्वी रजोनिवृत्ती आली तर, ती केवळ स्त्रीरोगविषयक बाब नसून हृदयाच्या दीर्घकालीन आरोग्याचा एक महत्त्वाचा इशारा आहे. असे झाल्यावर लगेच रक्तदाब, कोलेस्टेरॉल, रक्तशर्करा, वजन आणि झोपेची तपासणी व्हायला हवी.” महिलांनी डॉक्टरांकडे आपल्या रजोनिवृत्तीची माहिती स्वतःहून द्यावी आणि हृदयरोग प्रतिबंधाचे नियोजन सुरू करावे, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

हृदयाने पाठवलेले पहिले पत्र; दुर्लक्ष करू नका!

नियमित व्यायाम, संतुलित आहार, तणावमुक्त जीवनशैली आणि वेळेवर वैद्यकीय तपासणी- या चार गोष्टी या धोक्याला मोठ्या प्रमाणात नियंत्रणात ठेवू शकतात. हे संशोधन म्हणजे भारतीय महिलांसाठीही एक स्पष्ट संकेत आहे- वय ४०च्या आधीच मासिक पाळी बंद होण्याकडे दुर्लक्ष नको, ते हृदयाने पाठवलेले पहिले पत्र असू शकते!

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content