Homeकल्चर +सोनू निगमच्या आवाजातलं...

सोनू निगमच्या आवाजातलं ‘चंद्रिका’ प्रेक्षकांच्या भेटीला!

सोनू निगमने आपल्या गाण्याने देशातील प्रत्येकाच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. सोनू निगमच्या आवाजाची जादू प्रत्येकाच्या मनावर नेहमीच पसरली आहे. अनेक भाषांमधून त्यांनी पार्श्वगायन केलं आहे. ते सर्वात लाडक्या गायकांपैकी एक आहेत ह्यात काहीच शंका नाही. आतापर्यंत त्यांनी भरपूर गाण्यांना आपला आवाज दिला आहे. पण यंदा नवीन वर्षाची सुरुवात सोनू निगमने एका मराठमोळ्या गाण्याने केली आहे. होय. सुबोध भावे दिग्दर्शित आणि शंकर एहसान लॉय यांनी संगीतबद्ध केलेलं, आगामी मराठी चित्रपट ‘संगीत मानापमान‘ यातलं गाणं ‘चंद्रिका’ सोनू निगम ह्यांनी आपल्या सुमधुर आवाजाने गायलं आहे जे नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीला आलंय.

गायक सोनू निगमनी पहिल्यांदाच अशा प्रकारचं गाणं एका मराठी सिनेमासाठी गायलं आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. “चंद्रिका” या गाण्याविषयी बोलताना सोनू निगम म्हणाले की, ‘असं गाणं मी कदाचित आतापर्यंत कोणत्याही चित्रपटासाठी गायलं नसेल. हे गाणं खूपच वेगळं आहे. हे गाणं जेव्हा मी पहिल्यांदा ऐकलं तेव्हा एका मंदिराचे वातावरण तयार झाले. परंतु हे एक डिव्होशनला साँग नसून प्रेमाचं गीत आहे. प्रेमामध्येसुद्धा भक्ती आहे. मी ह्या गाण्यासाठी कुठलाही स्वार्थ ना करता स्वतःला पूर्णपणे समर्पित केलं आहे. देवाचे आभार आहेत की मला अशा प्रकारचं गाणं गायला मिळाले.’

जितकं सुरेख हे गाणं ऐकायला आहे तितकंच सुरेख चित्रिकरण या गाण्याचं झालंय. सुबोध भावे आणि वैदेही परशुरामी ह्या दोघा कलाकारांवर हे गाणं चित्रित केलं गेलंय आणि त्यात सोनू निगमच्या आवाजाची जादू तर जणू काही स्वर्ग. सोनू निगम ह्यांनी नाट्यसंगीताबद्दल माहिती देताना सांगितलं की, ‘मी संगीताच्या शैलीशी संबंधित आहे. म्हणूनच मी जगात शक्य तितके संगीत शिकण्याचा प्रयत्न करतो. मला माझ्या लहानपणी शास्त्रीय संगीत शिकता आले नाही. त्यामुळे जितकं होईल तितकं शिकून मी प्रेक्षकांसाठी गातो. मी भारतातील अनेक भाषांमध्ये गाणी गायली आहेत. लोकांचा विश्वास आहे की मी गाऊ शकतो. त्यामुळे मला प्रत्येक भाषा समजून घेण्याची संधी मिळाली. लता मंगेशकर आणि आशाजी हे महान गीतकार आहेत तर अजय-अतुल हेसुद्धा उत्तम संगीतकार आहेत. त्या सर्वांना नाट्यसंगीताची खूप खोलवर माहिती आहे. त्यामुळे त्यांच्याकाढून शिकण्यासारखं खूप काही आहे.’

इतकंच नव्हे तर मराठी संगीत आणि मराठी गायक याविषयीसुद्धा सोनू निगम ह्यांनी आपलं मत मांडत त्यांचा आवडता मराठी गायक कोण ह्याची माहिती दिली. ते म्हणाले की, ‘मराठी गाण्यांमध्ये खूप शोध आहे. जो कोणी संगीतकार किंवा गायक सुराला शोधून काढतो फक्त तोच एक लेजेंड बनू शकतो. मराठी संगीत तर आहेच, पण त्याबरोबर मराठी लेखन हेही एक वेगळं विश्व आहे. मराठी गायकांबद्दल सांगितलं तर बेला शेंडे, स्वप्नील बांदोडकर हे सगळे उत्तम गायक आहेत. पण तरुणांमध्ये मला आर्या आंबेकरचा आवाज खूप आवडतो. तिने चंद्रमुखीमध्ये खूप सुरेख गायलं आहे. इतरसुद्धा अनेक मराठी गायक आहेत, ज्यांचा आवाज मला खूप आवडतो.’

सोनू निगम ह्यांनी “संगीत मानापमान” या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि अभिनेता सुबोध भावे यांची तारीफ केली आणि त्यांच्या कामाचं कौतुक केलं. जिओ स्टुडिओज ह्यांचेसुद्धा सोनू निगम ह्यांनी आभार मानत सांगितलं की, ‘जिओ स्टुडिओज मराठीत नेहमीच काहीतरी नवीन कन्टेन्ट प्रेक्षकांसमोर आणण्याच्या प्रयत्नात असते जे खरोखरच प्रशंसनीय आहे.’ सुंदर आवाज, सुंदर कंपोझिशन, सुंदर चित्रिकरण असल्यामुळे रसिक प्रेक्षकांकडून ह्या गाण्याला चांगलीच पसंती मिळाली आहे.

जिओ स्टुडिओज प्रस्तुत ‘संगीत मानापमान’ या चित्रपटात सुबोध भावे आणि वैदेही परशुरामीसोबत सुमित राघवन, उपेंद्र लिमये, नीना कुलकर्णी, निवेदिता सराफ, शैलेश दातार, अर्चना निपाणकर आदी कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. पटकथा आणि कथाविस्तार शिरीष गोपाळ देशपांडे आणि ऊर्जा देशपांडे यांचे आहे तर अतिरिक्त पटकथा आणि संवाद पटकथा प्राजक्त देशमुख यांनी केले आहे. जिओ स्टुडिओज प्रस्तुत, ज्योती देशपांडे आणि श्री गणेश मार्केटिंगनिर्मित, सुबोध भावे दिग्दर्शित “संगीत मानापमान”चे म्युझिक लेबल सारेगामा आहे. ‘संगीत मानापमान’ हा संगीतमय चित्रपट येत्या १० जानेवारीपासून आपल्या जवळच्या चित्रपटगृहात प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सज्ज आहे.

Continue reading

जान्हवी मोरे स्मृती चषक कॅरम स्पर्धा २९ एप्रिलला

डोंबिवली येथील दत्तनगर उत्कर्ष मंडळाच्या विद्यमाने येत्या २९ एप्रिल रोजी राष्ट्रीय कॅरमपटू जान्हवी मोरे स्मृती प्रित्यर्थ १६ वर्षांखालील‌ मुला-मुलींच्या राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा शास्त्री हॉल, दत्तनगर, डोंबिवली (पूर्व) येथे होणार आहे. स्पर्धेचे प्रवेशशुल्क रुपये १००...

मॅथेमॅटिकल ऑलिम्पियाडमध्ये भारतीय संघाची लक्षणीय झेप

भारतीय संघाने 15व्या युरोपियन गर्ल्स मॅथेमॅटिकल ऑलिम्पियाडमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. गणितात अपवादात्मक कौशल्य आणि चिकाटीचे प्रदर्शन करत, चार सदस्यीय भारतीय पथकाने एक सुवर्ण, एक रौप्य आणि एक कांस्य अशी तीन पदके पटकावली. ऐतिहासिक कामगिरी करत या स्पर्धेत भारतीय...

एलआयसीची ग्राहक आणि एजंटसाठी दोन स्वतंत्र मोबाईल ॲप लॉन्च!

केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या वित्तीय सेवा विभागाचे सचिव एम. नागराजू यांनी काल मुंबईत एलआयसीचे नवीन ग्राहक ॲप (मायएलआयसी) आणि विक्री मध्यस्थांसाठीचे (एजंट) मोबाईल ॲप (सुपर सेल्स साथी) यांचे अनावरण केले. 26 कोटींहून अधिक पॉलिसी आणि भारतातील सर्वात व्यापक विमा पदचिन्हासह...
Skip to content