महाराष्ट्रात पाण्याची पळवापळवी यापूर्वी घडलेली आहे. धरणांच्या जागाही राजकीय सोयीने बदलल्या गेल्या आहेत. पण केंद्र सरकारने आणि पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी मिलेट्सचे महत्त्व अधोरेखित केल्यानंतर आता मिलेट्स सेंटरची पळवापळवीही झाल्याचे उघड झाले आहे.
कॉँग्रेसच्या आमदार प्रणिती शिन्दे यांनी औचित्त्याच्या मुद्द्याद्वारे यासंदर्भातील मुद्दा मंगळवारी विधानसभेत उपस्थित केला. राज्याच्या अर्थसंकल्पात मिलेट्स सेंटर सोलापूरमधे स्थापन केले जाईल, असे जाहीर करण्यात आले आणि त्यासाठी दोनशे कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूदही केली गेली. पण, गेल्या महिन्यात शासनाने आदेश काढून हे मिलेट्स सेंटर बारामतीला नेल्याचे जाहीर केले आहे, याकडे प्रणिती शिन्दे यांनी विधानसभेचे लक्ष वेधले.

सोलापूरचे आमदार, माजी मंत्री सुभाष देशमुख यांनीही या मुद्द्याकडे लक्ष वेधले. ते म्हणाले की, अर्थसंकल्पात हे श्री अन्न केंद्र सोलापूरला देण्यात आले होते. पण, नोहेंबर २०२३मध्ये परिपत्रक काढून आता हे केंद्र बारामतीला स्थापन केले जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
प्रणिती शिन्दे आणि सुभाष देशमुख या दोघांनीही अर्थमंत्री अजित पवार यांनी बारामतीचा विकास करा, बारामतीला निधीही द्यावा पण अर्थसंकल्पात सोलापूरला जाहीर केलेले केंद्र बारामतीला पळवू नये, अशी मागणी सरकारडे केली. सुभाष देशमुख म्हणाले की, अजित पवार बारामतीचे नाहीत तर राज्याचे अर्थमंत्री आहेत. त्यामुळे आपण अजित पवारांशी तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिन्दे यांच्याशीही चर्चा केली आहे. मात्र, सरकार पक्षाच्या वतीने यासंदर्भात उत्तर देण्यात आले नाही.

