कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवर आपण नियंत्रण मिळविले आहे आणि कोरोनाची तिसरी लाट आपण थोपविणारच.. असा जबरदस्त आत्मविश्वास व्यक्त करतानाच महाराष्ट्राचे वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी मुंबईच्या बोरीवली पूर्व येथील जय महाराष्ट्र नगर वसंत व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प गुंफताना मास्क हा आपल्या पेहरावातला एक अविभाज्य भाग असल्याचे आवर्जून नमूद केले.
शुक्रवार, २१ मे २०२१ पासून सुरु झालेल्या फेसबुक लाईव्ह वसंत व्याख्यानमालेचे ‘कोरोनाशी लढाई आपण जिंकणारच’ या विषयावरील दुसरे पुष्प गुंफताना ज्येष्ठ नेत्रशल्य विशारद, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी गेल्या दोन वर्षांतील कोरोना विरोधातील युद्ध लढताना काय काय उपाययोजना कराव्या लागल्या याची सविस्तर माहिती दिली.
कोरोना विषाणू जसा भारतात पर्यायाने महाराष्ट्रात आला तेव्हा वैद्यकीय सुविधा फारच कमी होत्या आणि मग त्या कशा वाढत गेल्या त्याची माहिती देतानाच त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाचा फार मोठा फायदा शासकीय यंत्रणेला झाल्याचे आवर्जून सांगितले. वैद्यकीय आणि शास्त्रीय, वैज्ञानिक या बाबींची सांगड घालून योग्यवेळी योग्य निर्णय घेण्यात आले. त्यामुळे आपण सर्व आरोग्ययंत्रणा आणि वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, पोलीस यांच्या समन्वयाने कोरोनावर नियंत्रण आणू शकलो, असे ते म्हणाले.

मास्क, सॅनिटायझर आणि सतत हात धुणे या गोष्टी अतिशय सोप्या शब्दांत समजावून सांगताना डॉ. तात्याराव लहाने यांनी आजही पन्नास टक्के लोक मास्क वापरत नसल्याचे स्पष्ट केले. यामुळे कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी अडथळे निर्माण होत आहे, असे ते म्हणाले.
दोन जण चहा प्यायला गेले तर आधी एकाने मास्क काढून चहा प्यावा, जेवण एकत्र घ्या पण एकाने जेवा तोवर दुसऱ्याने तोंडावर मास्क राहू द्यावा, असे आळीपाळीने चहा/भोजनाचे सेवन करता येते. आपण घरातून बाहेर पडल्यावर शर्टपँट काढतो का? नाही ना? तसेच मास्क हाही आता आपल्या कपड्यांबरोबरचा, पेहरावातला अविभाज्य भाग झाला आहे. तोंड आणि नाक झाकून योग्य पद्धतीने मास्क वापरला आणि स्वच्छता, अंतर व्यवस्थित राखले तर कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात आणून तिसरी लाट थोपविण्यात आपण निश्चितच यशस्वी होऊ, असा आत्मविश्वास डॉ. लहाने यांनी बोलून दाखविला.
हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांना मारहाण करण्याचे प्रकार बंद व्हायला हवेत. अशा प्रकारांमुळे वैद्यकीय यंत्रणेत असुरक्षिततेची भावना निर्माण होते. लोकांनी भीती बाळगण्याचे कारण नाही. आपल्याला काहीही होणार नाही, काहीही झालेले नाही, अशा पद्धतीने मानसिकरित्या मजबूत राहणे गरजेचे आहे. पण आरोग्याच्या दृष्टीने हलगर्जीपणा योग्य नाही, हेसुद्धा त्यांनी जाणीवपूर्वक सांगितले.
लोकांनी हक्कांबरोबर कर्तव्याचीही जाणीव ठेवणे आवश्यक आहे, हे सांगायला डॉ. तात्याराव लहाने विसरले नाहीत. विजय वैद्य यांच्या नेतृत्त्वाखाली या व्याख्यानमालेचे सूत्रसंचालन प्रा. नयना रेगे यांनी केले तर डॉ. लहाने यांची मुलाखत घेण्याची जबाबदारी ज्येष्ठ पत्रकार महेश म्हात्रे यांनी सांभाळली.

