कोरोना संकटाशी लढणाऱ्या भारताला मदत करण्यासाठी कझाकिस्तानने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. कझाकिस्तानचे अध्यक्ष कॅसिम जोमर्ट टोकायेव यांच्या मार्गदर्शनानुसार व भारत-कझाकिस्तान या दोन देशांमधील सामरिक भागीदारीच्या तत्त्वानुसार कझाकिस्तानने भारताला कोरोनाशी लढण्यासाठी मदत पाठवली आहे.
कझाकिस्तान येथून दोन मालवाहू विमाने मदतीची सामग्री घेऊन नवी दिल्ली विमानतळावर नुकतीच उतरली. ४० टन वैद्यकीय सामग्री घेऊन आलेल्या या मालवाहू विमानांमध्ये मेडिकल मास्क, रेस्पिरेटर्स, प्रोटेक्टिव्ह सूट, पोर्टेबल आर्टिफिशियल लंग व्हेंटिलेशन डिव्हाईस यांचा समावेश आहे.

कझाकिस्तानचे भारतातील राजदूत नुरलन झालगासबायेव यांच्या हस्ते भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या युरेशियन विभागाचे संचालक वंडारु विल्सनबाबू यांच्याकडे सोपवण्यात आली. ४ मे रोजी कझाकिस्तानचे राष्ट्रपती टोकायेव यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संपर्क साधून भारतातील कोरोनाच्या वाढीबाबत काळजी व्यक्त करुन ७ मे रोजी कझाकिस्तान सरकारच्या अधिकाऱ्यांना भारताला आवश्यक ती सर्व वैद्यकीय मदत पाठवण्याचे निर्देश दिले होते. त्याप्रमाणे ही मदत नवी दिल्ली येथे पोहोचवण्यात आली आहे.
भारताने गतवर्षी २०२०मध्ये कझाकिस्तानला कोरोनाविरोधातील लढ्याला मदत म्हणून हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन गोळ्या पाठवल्या होत्या.

