आमदार जितेन्द्र आव्हाड एक हुषार आमदार आहेत. पण अतिउत्साहाच्या भरात कधी कधी ते भडकाऊ भाष्यही करतात. त्यामुळे मग त्यांच्यावर त्यांचेच शब्द गिळण्याची वेळ येते. मागे एका विधानसभा अधिवेशनात त्या काळात भारतीय जनता पक्षाबरोबर असलेल्या आमदार अनिल गोटे यांना भडकावल्याने आव्हाड यांना त्यांच्या पक्षाचे तत्कालीन नेते अजित पवार यांच्याकडून कानउघाडणी सहन करावी लागली होती.
आव्हाड यांनी भडकावल्याने त्यावेळी स्टँम्प पेपर घोटाळ्यातील आरोपी अब्दुल करीम लाडसाब तेलगी याच्यासंदर्भातल्या उल्लेखात गोटे यांनी सभागृहात शरद पवार यांचे नाव घेतल्याने सभागृहात गदारोळ माजला होता. सभागृहातील हे उल्लेख नंतर कामकाजातून काढण्यात आले पण गोटे यांना भडकावल्याबद्दल अजित पवार यांनी आव्हाड यांना सभागृह स्थगित झाल्यावर चांगलेच फैलावर घेतले होते.

गुरुवारी अनवधानाने केलेल्या वक्तव्यामुळे आव्हाड यांच्यावर दिलगिरी मागण्याची वेळ आली. मागासवर्गीय समाजाच्या जमिनी बेकायदेशीररीत्या बळकावल्या जाताहेत, या मुद्द्यावर आमदार जयकुमार गोरे यांनी लक्षवेधी सूचना विधानसभेत गुरुवारी मांडली. त्याला महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी उत्तर दिले. त्यावेळी आमदार जितेन्द्र आव्हाड यांनी आदिवासींच्या संदर्भात टिप्पणी करताना आक्षेपार्ह वक्तव्य केले. आदिवासी रात्रीच्या वेळी कार्यक्रम करतात आणि त्यांच्या सह्या घेऊन त्यांना फसवले जाते, असे विधान केले. त्यावर माजी मंत्री अशोक उईके यांच्यासह आदिवासी आमदारांनी तीव्र आक्षेप घेतला. त्यांनी सभागृहाच्या हौद्यात धाव घेत आव्हाड यांच्या विधानाला तीव्र आक्षेप घेतला. त्यामुळे सभागृहात गदारोळ सुरू झाला. त्यावेळी आव्हाड यांनी उभे राहून आदिवासी समाजाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो, असे सांगून आदिवासी समाजाची माफी मागितली.

