रायगड जिल्ह्यातील दुर्घटनेमुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त २२ जुलै रोजी कोणतेही सार्वजनिक कार्यक्रम आयोजित न करता हा दिवस ‘सेवा दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय प्रदेश भारतीय जनता पार्टीने घेतला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही यावर्षी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे.
सेवा दिनाच्या माध्यमातून पक्षाचे कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी राज्यभर पूरग्रस्त नागरिकांना सहाय्य करतील, अशी माहिती भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी दिली. फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वैद्यकीय सेवेसाठी पक्षातर्फे राज्यात ५० हजार रुग्णमित्र नियुक्त करण्याचा निर्णयही घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. सेवा दिनी रक्तदान शिबीर, आरोग्य शिबीर, नेत्रदान शिबीर कृत्रिम अवयवांचे वाटप, पूरग्रस्त कुटुंबांना अन्न वाटप असे कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. पूरग्रस्त स्थिती असेपर्यंत आरोग्यसेवेचा व अन्य उपक्रम चालू राहणार आहेत.

फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रुग्णमित्र उपक्रमाचा प्रारंभ केला जाणार आहे. पक्षाचे ५० हजार कार्यकर्ते २२ जुलै २०२४पर्यंत या उपक्रमाच्या माध्यमातून जनतेच्या वैद्यकीय गरजांच्या पूर्ततेसाठी काम करणार आहेत. २८ हजार ग्रामपंचायतीत प्रत्येकी एक आणि शहरी भागात प्रभागात एक असे ५० हजार कार्यकर्ते रुग्णमित्र म्हणून काम करणार आहेत. या अभियानाच्या संयोजकपदी डॉ. अजित गोपछडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मोदी सरकारने तसेच राज्य सरकारने सुरू केलेल्या विविध आरोग्यविषयक योजनांचे लाभ सामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी हे रुग्णमित्र काम करणार असल्याचेही बावनकुळे यांनी नमूद केले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा २२ जुलै रोजी वाढदिवस असून राज्यभरातील त्यांचे चाहते, कार्यकर्ते, हितचिंतक दरवर्षी मोठ्या प्रमाणावर हा वाढदिवस साजरा करतात. इर्सालवाडी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर कुणीही आपला वाढदिवस साजरा करू नये. पुष्पगुच्छ, होर्डींग, जाहिरातींवर खर्च न करता तो निधी इर्सालवाडी गावाच्या पुनर्उभारणी आणि ग्रामस्थांच्या मदतीसाठी उपयोगात आणावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री पवार यांनी केले आहे.