एका युवतीच्या झालेल्या संशयास्पद मृत्यूच्या प्रकरणात आपल्या मंत्रिमंडळातले सहकारी संजय राठोड यांना मंत्रिमंडळातून काढून टाकणारे महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तोच न्याय आदित्य ठाकरे यांच्याबाबतीत का लावला नाही, असा सवाल भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार नितेश राणे यांनी आज केला. दिशा सालीयन हिच्या हत्त्येत आदित्य ठाकरे यांचा हात आहे, असा आरोप आहे. मग राठोड यांना लावलेला नियम, त्यांना लावलेला कायदा आदित्य ठाकरेंच्या बाबतीत का लावला गेला नाही, असे ते म्हणाले.
समान नागरी कायद्याबाबत उद्धव ठाकरे यांनी अजूनही ठोस भूमिका घेतलेली नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी समान नागरी कायद्याचा नेहमी पुरस्कार केला होता. उद्धव ठाकरेंमध्ये हिम्मत असेल तर त्यांनी समान नागरी कायद्याला बिनशर्त पाठिंबा जाहीर करावा, असे ते म्हणाले.

शिवसेना भवन हे हिंदुत्वाचे केंद्र मानले जाते. काल तिथे मुस्लिम बोर्डाचे मौलाना उद्धव ठाकरेंना भेटायला गेले. मग आता बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा विचारांवर चालणारी उद्धव ठाकरे यांची सेना तेथे गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण करणार का नाही? तसे जमत नसेल तर त्यांनी सेनाभवनावर लावलेला बाळासाहेबांचा फोटो काढून टाकावा आणि त्याठिकाणी भोंगा लावावा. मग पहाटे जे होते ते सुरू करावे असा टोलाही नितेश राणे यांनी लगावला.
काल आदित्य ठाकरे यांच्या गाडीला एका दुचाकीने धडक दिली. ही घटना घडली नसून घडवली गेली आहे, असा माझा आरोप आहे. आपली सुरक्षा वाढवण्यासाठी संजय राजाराम राऊत यांनी जसा प्रयत्न केला. तशाच प्रकारचा हा प्रयत्न असू शकतो. त्यामुळे पोलिसांनी याची चौकशी करून हे षडयंत्र तर नाही ना.. याची खात्री करून घ्यावी, असेही त्यांनी सांगितले. राहुल गांधी मणिपूरमध्ये संवाद साधायला गेले आहेत, याबद्दल गुणगान गाणाऱ्या राऊत यांनी राहुल गांधींच्या मणिपूर दौऱ्याबाबत सांगण्याऐवजी गोरेगावच्या पत्रा चाळीत जाऊन दाखवावे, असा चिमटाही राणे यांनी काढला.

