Homeटॉप स्टोरीउद्धव ठाकरे येणार...

उद्धव ठाकरे येणार घायकुतीला?

मुंबई महापालिकेतल्या गेल्या काही वर्षांच्या काराभाराची चौकशी करण्यासाठी पोलिसांची एसआयटी नेमण्याला काही तास उलटत नाहीत तोच आज ईडीने उद्धव ठाकरे कुटुंबियांच्या जवळच्या माणसांच्या जागांवर धाडी टाकल्यामुळे उद्धव ठाकरे गोत्यात आल्याची चर्चा वेग धरू लागली आहे. त्यातच राज्य सरकारने ठाकरे कुटुंबाचे पोलीस संरक्षण कमी केल्यामुळे घायकुतीला येणार का, अशी चर्चा सध्या सुरू झाली आहे.

मुंबई महापालिकेच्या कारभारावर कॅगने अलीकडेच ताशेरे ओढले होते. सुमारे साडेबारा हजार कोटींच्या कामात मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचा ठपका कॅगने (महालेखापाल) ठेवला होता. या ताशेऱ्यांची दखल घेत राज्य सरकारने दोन दिवसांपूर्वीच पोलिसांचे विशेष तपास पथक (एसआयटी) नेमले. हे पथक आपले काम सुरू करत नाही तोच आज कोव्हिड सेंटरच्या कथित घोटाळाप्रकरणी अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) दहा ठिकाणी धाडी टाकल्या. यामध्ये आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय सूरज चव्हाण, संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजीत पाटकर यांचा समावेश आहे. पाटकर यांच्या निवासस्थानी छापेमारीच्या वेळी राऊत समर्थकांनी त्यांना विरोध करण्याचाही प्रयत्न केल्याचे समजते. संजीव जैस्वाल, नितीन गुरव, संजय शाह यांच्या घरीही ईडीची छापेमारी सुरू आहे. कोव्हिड सेंटर बनवण्यासाठी वापरलेल्या साहित्यात घोटाळा केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

दरम्यान यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात प्रसारमाध्यमांकडे आपले मत व्यक्त केले. नेमकी काय कारवाई सुरू आहे याबद्दल मला माहिती नाही. पण ज्यावेळी मुंबई महापालिकेत कोविड सेंटर सुरू करण्यात आले आणि त्यातील घोटाळा समोर आल्यानंतर धक्कादायक माहिती हाती आली होती. कशाप्रकारे कोणताही अनुभव नसणाऱ्या कंपन्या तयार झाल्या आणि लोकांच्या जीवाशी खेळण्यात आले, त्यातून कसे मृत्यू झाले याची सर्वांना कल्पना आहे. पुण्यात तर एका पत्रकाराचा मृत्यू झाला. त्यामुळे चौकशी सुरू होती. आता ती कुठपर्यंत पोहोचली आहे, छाप्यात काय मिळाले आहे याची मला कल्पना नाही, असे ते म्हणाले.

उद्धव ठाकरेंच्या सुरक्षाव्यवस्थेत कपात

दरम्यान, राज्य सरकारने ठाकरे कुटुंबियांच्या सुरक्षाव्यवस्थेत कपात केली आहे. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे, तेजस ठाकरे यांची सुरक्षाव्यवस्था कमी करण्यात आली आहे. तसेच मातोश्रीवर असलेल्या सुरक्षारक्षकांच्या संख्येतही कपात करण्यात आली आहे. उद्धव ठाकरे यांच्या सुरक्षा ताफ्यातील एक एस्कॅार्ट गाडी तसेच पायलट गाडीही कमी करण्यात आली आहे. मातोश्रीवर असलेली राज्य राखीव पोलीस दलाची (एसआरपीएफ) सुरक्षा काढून टाकण्यात आली आहे. त्यांना असलेली झेड प्लस सुरक्षा आता वाय प्लस दर्जाची करण्यात आली आहे. राज्याच्या गृह विभागाने हा आदेश दिला आहे. गृह विभागाच्या अखत्यारीतील एक समिती वेळोवेळी विविध महत्त्वाच्या व्यक्तींना असलेल्या धोक्याची तीव्रता अभ्यासत असते. त्यानंतर आवश्यकतेनुसार त्यांच्या सुरक्षाव्यवस्थेत वाढ वा कमतरता करत असते. त्यानुसारच ठाकरे कुटुंबाच्या सुरक्षाव्यवस्थेत फेरबदल करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

Continue reading

महाडच्या ऐतिहासिक भूमीतून समता आणि समरसतेचा संदेश…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाडमध्ये 'महाड चवदार तळे सत्याग्रह - शताब्दी वर्ष अभिवादन सोहळ्यात' प्रमुख उपस्थिती दर्शवली. तत्पूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी 'चवदार तळे जलशुध्दीकरण व परिसर सुशोभिकरण प्रकल्पा'चे भूमिपूजन व कोनशिला अनावरण केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की,...

‘जय श्रीराम’ ठाकरेंच्या शिवसेनेसाठी ‘सभागृहाचे अवमूल्यन’!

महाराष्ट्र विधानसभेत बुधवारी एक अनोखे राजकीय नाट्य घडले. भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री भास्कर जाधव यांना सभागृहात उघडपणे "जय श्रीराम" म्हणण्याचा आग्रह केला. या अनपेक्षित घटनेमुळे सभागृहात खळबळ उडाली...

भारताचा इराणबरोबर सौदा? वैद्यकीय मदतीच्या मोबदल्यात जहाजे??

युद्धाने होरपळलेल्या इराणला भारताने मानवतावादी मदतीचा हात पुढे केला आहे. इराणमधील भारतीय दूतावासाने जाहीर केले की, भारताकडून आलेली वैद्यकीय साहित्याची पहिली खेप इराण रेड क्रेसेंट सोसायटीकडे सुपूर्द करण्यात आली आहे. इराणने भारताच्या या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करत सांगितले, "भारताच्या...
Skip to content