राज्यात आमचे सरकार सर्वसामान्यांसाठी अनेक उपाययोजना राबवित आहोत. आम्ही ‘सरकार आपल्या दारी’सारखे उपक्रम राबवित आहोत, तर पूर्वीच्या सरकारचा कारभार ‘सरकार स्वत:च्या घरी’ असा होता, असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाविकास आघाडी सरकारला लगावला.
राज्यात उदंचन (पम्पिंग स्टोरेज) जलविद्युत प्रकल्पासंदर्भात आज 71 हजार कोटी रुपयांचे करार करण्यात आले, त्यानंतर सह्याद्री अतिथीगृह येथे ते पत्रकारांशी बोलत होते. आमचे सरकार दीड लाख लोकांना एकाच ठिकाणी 17 योजना देते, तेही त्यांना त्यांच्या ठिकाणी जाऊन. संभाजीनगर येथे सरकार आपल्या दारी, हा कार्यक्रम करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व माध्यमांना खास सूचना केल्या होत्या की, शेवटच्या खुर्चीकडे लक्ष द्या. कार्यक्रम संपेपर्यंत एक जरी हलला तर आम्हाला सांगा. कार्यक्रम संपल्यानंतरही एकही माणूस जागेवरचा हलला नाही, हे सर्व माध्यमांनी पाहिलेले आहे, असे त्यांनी सांगितले.
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी भीमा कोरेगाव आयोगासंदर्भात केलेल्या वक्तव्यासंदर्भात पत्रकारांनी विचारले असता, देवेंद्र फडणवीस म्हणाले की, यापूर्वीही विविध लोकांनी विविध प्रकारचे अर्ज केले होते. त्यावर आयोगाने कायद्यानुसार निर्णय घेतले आहेत. प्रकाश आंबेडकर हे स्वत: निष्णात वकील आहेत. त्यामुळे कुणाला बोलाविले पाहिजे आणि कुणाला नाही, हे त्यांना चांगलेच ठाऊक आहे. भरकटविण्यासाठी ते अशी विधाने करीत आहेत.
बीबीसीने कर बुडविल्याचे मान्य केल्यासंदर्भात पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले की, ज्यावेळी कारवाई झाली, तेव्हा अनेकांनी ओरड केली होती. आता सत्य समोर आल्याने ज्यांनी या कारवाईवर प्रश्नचिन्ह निर्माण केले, त्यांचे डोळे उघडायला हवेत.

