Homeडेली पल्सजागावाटपावरून पुन्हा महाविकास...

जागावाटपावरून पुन्हा महाविकास आघाडीत शिमगा!

आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने 2019 साली जिंकलेल्या 19 जागांवर आम्ही लढणार आणि विजयी होणार, असा दावा उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज केल्यानंतर महाविकास आघाडीत पुन्हा धुसफूस वाढू लागली आहे.

आज नांदेडच्या दौऱ्यावर असलेले राऊत यांनी महाराष्ट्रातल्या 18 तसेच दिव-दमण येथील अशा लोकसभेच्या 19 जागांवर दावा केला. या सर्व जागा शिवसेना म्हणून जिंकल्या होत्या. त्यामुळे तेथे असलेले खासदार आता कोणाकडे आहेत, हा प्रश्नच येत नाही आणि या सर्व जागा आम्ही लढणार, असे ते म्हणाले. त्यावर लगेचच महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून प्रतिक्रिया उमटल्या. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी, महाविकास आघाडीमधले जागावाटप अजूनही ठरलेले नाही. अशावेळी महाविकास आघाडीत बेबनाव निर्माण होईल अशी वक्तव्ये कोणी करू नयेत, असे बजावले. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी महाविकास आघाडी एकसंघ राहिल्यास आम्ही 48 पैकी 40 जागा जिंकू, असा दावा करतानाच संजय राऊत यांनी मांडलेल्या भूमिकेचे खंडन केले. कोणी किती जागा लढवायच्या यावर अजून चर्चा झाली नाही. अशावेळी अशा पद्धतीचा दावा करणे चूक आहे, असे त्यांनी माध्यमांना सांगितले. राष्ट्रवादीचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही संजय राऊत यांचा दावा खोडून काढताना लोकसभेच्या जागावाटपाबाबत महाविकास आघाडीमधल्या तीनही प्रमुख पक्षांचे नेते एकत्रित बसून निर्णय घेतील, असे सांगितले.

आघाडी

आघाडीने ठाकरे गटाला दिल्या आहेत फक्त पाच जागा – नितेश राणे

दरम्यान, संजय राऊत यांच्या या दाव्यावर भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार नितेश राणे यांनीही भाष्य केले. सिल्व्हर ओक, या शरद पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत महाविकास आघाडीने ठाकरे गटाला फक्त पाच जागांची ऑफर दिली होती. ही ऑफर जर मान्य नसेल तर तुम्ही आघाडीसोबत निवडणूक लढवू नका असे त्यांना स्पष्टपणे बजावले गेले, अशी आमची माहिती आहे. ही माहिती खरी आहे की खोटी, हे उद्धव ठाकरे किंवा संजय राजाराम राऊत यांनी स्पष्ट करावे, असे आव्हान त्यांनी दिले.

एकतर यांना अवघ्या पाच जागा दिल्या आहेत. त्यातही यांची आपापसात भांडणे आहेत. दक्षिण मुंबईतील जागा अरविंद सावंत यांना लढवण्यासाठी मिळू नये म्हणून एक महिन्यापासून अरविंद सावंत यांच्या विरोधात वातावरण तयार केले जात आहे. त्यांच्या गटाच्या सैनिकांचे राजीनामे घेतले जात आहेत. यांच्या मुखपत्रातून अरविंद सावंतांवर टीका केली जात आहे. या जागेवर अनिल देसाई यांना उमेदवारी मिळावी, असा प्रयत्न संजय राऊत यांच्याकडून चालू आहे, असेही त्यांनी सांगितले. घर फोडणे, काड्या लावणे याशिवाय या माणसाला दुसरे काही जमत नाही. दिवसाचे 24 तास आणि वर्षातले 365 दिवस हा माणूस हेच करतो, असेही नितेश राणे म्हणाले.

Continue reading

महाडच्या ऐतिहासिक भूमीतून समता आणि समरसतेचा संदेश…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाडमध्ये 'महाड चवदार तळे सत्याग्रह - शताब्दी वर्ष अभिवादन सोहळ्यात' प्रमुख उपस्थिती दर्शवली. तत्पूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी 'चवदार तळे जलशुध्दीकरण व परिसर सुशोभिकरण प्रकल्पा'चे भूमिपूजन व कोनशिला अनावरण केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की,...

‘जय श्रीराम’ ठाकरेंच्या शिवसेनेसाठी ‘सभागृहाचे अवमूल्यन’!

महाराष्ट्र विधानसभेत बुधवारी एक अनोखे राजकीय नाट्य घडले. भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री भास्कर जाधव यांना सभागृहात उघडपणे "जय श्रीराम" म्हणण्याचा आग्रह केला. या अनपेक्षित घटनेमुळे सभागृहात खळबळ उडाली...

भारताचा इराणबरोबर सौदा? वैद्यकीय मदतीच्या मोबदल्यात जहाजे??

युद्धाने होरपळलेल्या इराणला भारताने मानवतावादी मदतीचा हात पुढे केला आहे. इराणमधील भारतीय दूतावासाने जाहीर केले की, भारताकडून आलेली वैद्यकीय साहित्याची पहिली खेप इराण रेड क्रेसेंट सोसायटीकडे सुपूर्द करण्यात आली आहे. इराणने भारताच्या या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करत सांगितले, "भारताच्या...
Skip to content