आमदारांना अपात्र ठरवण्याचा अधिकार फक्त आणि फक्त विधानसभेच्या अध्यक्षांनाच आहे, अन्य कोणालाही नाही, असे स्पष्ट मत राज्य विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज व्यक्त केले.
नार्वेकर येत्या दोन दिवसांत लंडनच्या दौऱ्यावर जात आहेत. त्याआधी त्यांनी आज माध्यमांशी वार्तालाप केला. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील संघर्ष सर्वोच्च न्यायालयात अंतिम निकालाच्या प्रतीक्षेत आहे. त्यामध्ये मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह सोळा विधानसभा सदस्यांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. त्यामुळे सदस्याच्या अपात्रतेचा मुद्दा फार महत्त्वाचा ठरतो. त्यामुळेच नार्वेकर यांनी केलेले भाष्य महत्त्वाचे मानले जात आहे.
न्यायालयाने न्यायालयाचे काम करावे. विधिमंडळाने विधिमंडळाचे काम करावे आणि प्रत्येक स्वायत्त संस्था त्या-त्या पद्धतीने आपापले काम करतच असते. कायदा आणि संविधान प्रत्येकाला समान लागू असतो. नियम एकाला एक लागतो आणि दुसऱ्याला दुसरा असे होत नाही. इथल्या प्रत्येक नागरिकाला एकच नियम लागतो, असे सांगताना ते म्हणाले की, सदस्यांच्या निलंबनाचा निकाल अध्यक्षांव्यतिरिक्त कोणी घेईल असे वाटत नाही. आपण जगाच्या पाठीवर कुठेही असलो तरीही विधानसभेचे अध्यक्ष आहोत आणि आपण जोपर्यंत या अधिकारपदावर आहोत तोपर्यंत अपात्रतेच्या मुद्द्यावर विधानसभेतील कोणीही व्यक्ती म्हणजे उपाध्यक्षही निर्णय घेऊ शकणार नाहीत.

