Homeटॉप स्टोरी... अखेर शरद...

… अखेर शरद पवारांची भाकरी भाजलीच नाही!

२७ एप्रिलला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात शरद पवार यांनी आपण लवकरच भाकरी फिरवणार आहोत, असे सांगितले होते. त्यामुळे पक्षात मोठे फेरबदल होतील अशी शक्यता व्यक्त होत होती. मात्र दोन मे रोजी त्यांनी स्वतःच आपल्या पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यावरून, आपण भाकरी फिरवणार होता, पण प्रत्यक्षात तवाच फिरवला… असे का, असे त्यांना विचारले असता पवार म्हणाले की, भाकरी भाजलीच नाही आणि मग एकच हंशा पिकला.

लोक माझे सांगाती, या सुधारित आत्मचरित्रपर पुस्तकाच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमात दोन मे रोजी शरद पवार यांनी आपल्या पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा जाहीर केला होता. त्याचवेळी त्यांनी आपला उत्तराधिकारी निवडण्यासाठी तसेच आपल्या राजीनाम्यावर विचार करण्यासाठी एक समितीही जाहीर केली. पवार यांनी आपला निर्णय जाहीर केल्यापासून राजीनामा मागे घेईपर्यंत गेले तीन दिवस पक्षाच्या विविध नेत्यांकडून तसेच त्यांच्या सहकारी पक्षांच्या नेत्यांकडून पवार यांनी आपल्या पदावर कायम राहावं असा आग्रह केला जात होता. पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून रोजच्या रोज राजीनामासत्र तसेच ठिय्या आंदोलन अथवा इतर प्रकारच्या माध्यमातून पवार यांनी राजीनामा मागे घ्यावा म्हणून प्रयत्न केले जात होते.

आज सकाळी 11 वाजता यशवंतराव चव्हाण केंद्रात पवार यांनी घोषित केलेल्या समितीची बैठक झाली. ही बैठक जेमतेम पंधरा मिनिटे चालली. या बैठकीला अजित पवारही उपस्थित होते. या बैठकीमध्ये शरद पवार यांनी दिलेला राजीनामा एकमताने फेटाळण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचप्रमाणे तसा ठरावही एकमताने मंजूर करण्यात आला. ठराव मंजूर झाल्यानंतर यशवंतराव चव्हाण केंद्राबाहेर असलेले पक्षाचे कार्यकर्ते प्रफुल्लित झाले आणि त्यांनी पवारांच्या बाजूने घोषणाबाजी चालू केली. दरम्यानच्या काळात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनीही माध्यमांना या ठरावाबद्दलची माहिती दिली. त्यानंतर राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते शरद पवार यांच्या निवासस्थानी पोहोचले. तेथे त्यांनी ठरावाबद्दलची माहिती दिली तसेच राजीनामा मागे घेण्याची विनंती केली. त्यावेळी पवार यांनी संध्याकाळी साडेपाच वाजता पत्रकार परिषदेत आपण आपला निर्णय जाहीर करू, असे स्पष्ट केले.

संध्याकाळी साडेपाच वाजता यशवंतराव चव्हाण केंद्रात शरद पवार आपल्या पत्नी प्रतिभाताई यांच्यासमवेत आले. मात्र पत्रकार परिषदेच्या वेळी त्या व्यासपीठावर आल्या नाहीत. गाडीतच बसून राहणे त्यांनी पसंत केले. त्यानंतर पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, खासदार सुप्रिया सुळे, तसेच पक्षाची यंग ब्रिगेड होती. यात आमदार रोहित पवार, संग्राम पाटील, सोनिया मोहन, दर्शना संगत आदींचा समावेश होता. कार्यकर्त्यांच्या भावना, आपल्या सहकाऱ्यांचा आग्रह या साऱ्याचा सन्मान करत आपण पक्षाध्यक्षपद सोडण्याचा निर्णय मागे घेत असल्याचे पवार यांनी यावेळी जाहीर केले. मात्र पक्षांमध्ये नवे नेतृत्त्व तयार करण्याचं आपले काम चालूच राहील. यासाठी काही संघटनात्मक बदल केले जातील. यापुढे कोणतेही जबाबदारीचे पद आपण स्वीकारणार नाही. संघटनात्मक बदलांमध्ये नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाईल, असेही पवार यांनी सांगितले.

63 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीनंतर आपण निवृत्त होण्याचा निर्णय प्रयत्न केला, असे ते म्हणाले. अजित पवार का उपस्थित नाहीत, असे विचारले असता पवारांनी प्रतिप्रश्न केला की, पत्रकार परिषदेला सर्व पत्रकार उपस्थित असतात का? अजित पवार यांची कोणतीही नाराजी नाही, आपण राजीनामा मागे घ्यावा असं अजित पवार यांचीही विनंती होती. अजित पवार दिल्लीला गेले आहेत, या म्हणण्यातही काही तथ्य नाही. सुप्रिया सुळेंना आपला उत्तराधिकारी बनवण्यात येईल, या म्हणण्यातही काही तथ्य नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. महाविकास आघाडीतीलसर्व पक्षांचा समन्वय अधिक मजबूत केला जाईल, असेही ते म्हणाले.

Continue reading

तुम्ही ‘बायको’शी लग्न केलंय, ‘मोलकरणी’शी नाही!

सर्वोच्च न्यायालयाने नुकताच एक ऐतिहासिक आणि विचार करायला लावणारी टिप्पणी केली- "तुम्ही 'बायको'शी लग्न केलंय, 'मोलकरणी'शी नाही!" न्यायमूर्ती विक्रम नाथ यांनी एका वैवाहिक वादाच्या सुनावणीदरम्यान पतीला स्पष्ट शब्दांत बजावलं की, "स्वयंपाक करणं, भांडी घासणं, घर सांभाळणं, या गोष्टींमध्ये तुम्हालाही...

महाडच्या ऐतिहासिक भूमीतून समता आणि समरसतेचा संदेश…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाडमध्ये 'महाड चवदार तळे सत्याग्रह - शताब्दी वर्ष अभिवादन सोहळ्यात' प्रमुख उपस्थिती दर्शवली. तत्पूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी 'चवदार तळे जलशुध्दीकरण व परिसर सुशोभिकरण प्रकल्पा'चे भूमिपूजन व कोनशिला अनावरण केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की,...

‘जय श्रीराम’ ठाकरेंच्या शिवसेनेसाठी ‘सभागृहाचे अवमूल्यन’!

महाराष्ट्र विधानसभेत बुधवारी एक अनोखे राजकीय नाट्य घडले. भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री भास्कर जाधव यांना सभागृहात उघडपणे "जय श्रीराम" म्हणण्याचा आग्रह केला. या अनपेक्षित घटनेमुळे सभागृहात खळबळ उडाली...
Skip to content