राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्याची घोषणा करून 24 तासही उलटत नाहीत तोच त्यांच्या पुढाकाराने तयार झालेल्या विरोधी पक्षांच्या महाविकास आघाडीला अखेरची घरघर लागली आहे. महाविकास आघाडीने नियोजित केलेल्या पुढच्या चारही वज्रमूठ सभा रद्द झाल्या आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यात एकवाक्यता दिसून येत नाही. याउलट पटोले आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यात परस्परांवर कुरघोडीही सुरू झाली आहे.
कालच शरद पवार यांनी लोक माझे सांगाती, या पुस्तकाच्या सुधारित आवृत्तीचे प्रकाशन करताना पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा जाहीर केला. त्यापाठोपाठ राज्यातल्या महाविकास आघाडीच्या घटकपक्षांच्या नेत्यांमध्ये महाविकास आघाडीच्या भविष्याबद्दल शंकाकुशंका निर्माण होऊ लागली. आज या नेत्यांनी त्यांच्या पुणे, कोल्हापूर, नाशिक आणि अमरावती येथील प्रस्तावित वज्रमूठ सभा रद्द करण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते. येत्या १४ मेला पुण्यात, 28 मेला कोल्हापूरमध्ये, तीन जूनला नाशिक तर 11 जूनला अमरावतीत या वज्रमूठ सभा होणार होत्या. परंतु आता त्या सभा होणार नाहीत.

ऊन-पावसाचा खेळ
यावर बोलताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की, राज्यात सध्या प्रचंड ऊन आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या प्रस्तावित सभा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी वेगळाच सूर लावला. राज्यात पावसाळा सुरू झाला आहे. अनेक ठिकाणी भरपूर पाऊस पडतोय. त्यामुळे या प्रस्तावित सभा होतील की नाही याबद्दल काही सांगता येत नाही, असे त्यांनी सांगितले.

राऊतांनी चोंबडेगिरी करू नये – नाना पटोले
एकीकडे महाविकास आघाडीला घरघर लागली असतानाच उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज माध्यमांशी बोलताना जसे काँग्रेसमध्ये सोनिया गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांचे स्थान आहे त्याचप्रमाणे राष्ट्रवादीतही होईल. राहुल गांधी पक्षाचे अध्यक्ष नाहीत, खासदारही नाहीत. मात्र काँग्रेसचे नेते म्हणून राहुल गांधी यांच्याकडेच पाहिले जाते. तसेच शरद पवार राष्ट्रवादीचे अध्यक्ष नसले तरी त्यांचेच नियंत्रण राष्ट्रवादीवर राहील, अशा आशयाचे विधान संजय राऊत यांनी केले. यावर बोलताना नाना पटोले यांनी राऊत यांना खडे बोल सुनावले. राऊत यांनी चाटूगिरी करू नये. काँग्रेसवर भाष्य करताना त्यांनी चोंबडेगिरी करू नये. अजित पवार यांनीही सांगितले आहे. ते लक्षात घेतले तर राऊत यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर बोलताना चोंबडीगिरी करू नये असे पटोले म्हणाले. त्यावर पलटवार करत संजय राऊत यांनी चोंबडेगिरी कोण करताय आणि चाटूगिरी कोण करत आहे, हे मी सांगू का, असा सवाल केला. मी बोलायला लागलो तर चोंबडा कोण आणि चाटू कोण हे स्पष्ट होईल, असेही ते म्हणाले.

नितेश राणे यांचे भाकित खरे ठरले
दररोज सकाळी भारतीय जनता पार्टीवर तोंडसुख घेणारे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना प्रत्त्युत्तर देण्यासाठी भाजपाकडून नितेश राणे यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली. त्यानंतर घेतलेल्या पहिल्याच पत्रकार परिषदेत नितेश राणे यांनी महाविकास आघाडीची एक मे रोजी होत असलेली वज्रमूठ सभा शेवटची असेल. यापुढे महाविकास आघाडीची कोणतीही सभा होणार नाही, असे ठासून सांगितले होते. त्यांनी केलेले भाष्य एक तारखेच्या सभेनंतर अवघ्या दोन दिवसांतच प्रत्यक्षात उतरले…

