आमची भूमिका स्पष्ट आहे.. पहिल्यांदा हा अत्याचार थांबवा! शासकीय सर्व्हे थांबवा! स्थानिकांशी संवाद साधा! फायदा कुणाचा होणार आहे हे सांगा! वाद वाढवण्यापेक्षा जाहीर संवाद साधा, असे आवाहन उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी आज केले.
बारसू येथील रिफायनरीच्या विषयावर ते बोलत होते. ज्याप्रमाणे मविआ सरकारची अट होती की, प्रकल्प काय आहे हे जनतेला समजावून सांगावं. तसं एक जाहीर प्रेझेंटेशन द्यावं, पारदर्शकता ठेवावी आणि अंतिम मान्यता ही भूमिपुत्रांची असावी!, असेही ते म्हणाले.
बारसू येथे सुरु असणारी खोके सरकारची दडपशाही अतिशय दुर्दैवी आहे आणि घटनाबाह्य मुख्यमंत्री मात्र गायब आहेत. निसर्गसंपन्न कोकण जपणाऱ्या भूमिपुत्रांवर हे रावणराज्य चालवणारे सरकार पोलिसांकडून वार करण्यास मागेपुढे पाहणार नाही, असेही आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

दंडुकेशाहीने सर्वेक्षण नको – अजित पवार
बारसू रिफायनरीसाठी होणारे सर्वेक्षण तत्काळ स्थगित करून मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्र्यांनी आंदोलकांशी चर्चा करावी व त्यावर मार्ग काढावा. पोलिसी बळाचा वापर करून दंडुकेशाहीने सर्वेक्षण करू नका, अशी विनंती विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ट्विट करत सरकारला केली आहे.
रिफायनरी प्रकल्पाविरोधात आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस असून आंदोलक आंदोलनावर ठाम आहेत. त्या आंदोलनात महिला आणि मुलांचाही समावेश आहे. राज्यात उष्णतेची प्रचंड लाट आहे. खारघर घटनेत अगोदरच काही लोकांना आपण गमावले आहे. त्याची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी सरकारने घ्यावी, अशी मागणीही अजित पवार यांनी केली आहे.

दडपशाही आणि सर्वेक्षण तत्काळ थांबवा – बाळासाहेब थोरात
रत्नागिरी येथील बारसू रिफायनरीस्थळी स्थानिक नागरिक महिला, मुले, सर्वजण रिफायनरी सर्वेक्षणाविरोधात आंदोलन करत आहेत. आज पोलिसांनी त्यांच्यावर व वार्तांकन करणाऱ्या माध्यम प्रतिनिधींवर दडपशाही सुरू केली, हे अत्यंत निषेधार्ह असून सरकारने ही दडपशाही आणि सर्वेक्षण तत्काळ थांबवावे, अशी मागणी विधिमंडळ काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.
मुंबई-वडोदरा एक्स्प्रेसच्या नावाखाली मागच्या आठवड्यात गरीब आदिवासी लोकांच्या जमिनी बळजबरीने ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी महिलांवर लाठीहल्ला केला. काल अंधारात मुंबईतील आरेमधील शेकडो झाडे पोलीस बंदोबस्तात तोडली गेली. या घटना ताज्या असताना कालपासून कोकणाचा निसर्ग उद्ध्वस्त करणाऱ्या बारसू रिफायनरीचा विरोध करणाऱ्या स्थानिक राहिवाशांवर पोलिसांनी दमदाटी सुरू केली आहे. या सगळ्या गोष्टी महाराष्ट्रात सुरू असताना मुख्यमंत्री सुट्टीवर गेले आहेत आणि उपमुख्यमंत्री चकार शब्द काढायला तयार नाहीत. बारसू रिफायनरी कोणाचे हितसंबंध अडकले आहेत काय?, असा सवालही त्यांनी केला.

दंडेली कराल तर याद राखा – नाना पटोले
बारसू रिफायनरी प्रकल्पासाठी पोलीस बळाचा वापर करुन सर्वेक्षण केले जात आहे. या पोलीस दडपशाहीचा काँग्रेस तीव्र निषेध करत असून पोलीस बळावर कोणाचा विकास साधायचा आहे? स्थानिक जनतेला विश्वासात न घेता प्रकल्प लादणे ही हुकूमशाही असून कोणत्याही परिस्थितीत भाजपा सरकारची ही दादागिरी सहन केली जाणार नाही. बारसू रिफायनरीसाठी जनतेवर दंडेली कराल तर याद राखा, असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे. विकासाला काँग्रेसचा विरोध नाही. पण स्थानिकांना उद्ध्वस्त करणारा प्रकल्प असेल, स्थानिक जनतेचा त्या प्रकल्पाला विरोध असेल तर त्यांच्याशी चर्चा करुन संवादातून मार्ग काढला जाऊ शकतो. जनतेच्या मनात जर रिफायनरी प्रकल्पाबाबत काही शंका असतील तर भाजपा सरकार स्थानिक जनतेच्या शंकांचे निरसन का करत नाही? पोलीसांचा फौजफाटा घेऊन कसले सर्वेक्षण करता?, असा सवालही त्यांनी केला.

