महाराष्ट्रातली उष्णतेची तीव्रता लक्षात घेता राज्य मंडळाच्या शाळांना आजपासून सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी ही घोषणा केली.
यापूर्वीच जाहीर केल्याप्रमाणे पुढील शैक्षणिक वर्ष 15 जूनपासून तर विदर्भातील शाळा 30 जूनपासून सुरू होतील. तथापि सध्या असलेली उष्णतेची तीव्रता लक्षात घेता राज्य मंडळाच्या शाळांना आजपासूनच सुट्टी देण्यात येत आहे. सुट्टीच्या कालावधीत ज्या शाळांना अतिरिक्त उपक्रम राबवायचे असतील त्यांनी ते सकाळच्या अथवा संध्याकाळच्या सत्रात घ्यावेत. यासाठी नववी अथवा दहावीचे विद्यार्थी वगळता इतर वर्गातील विद्यार्थ्यांना बोलावण्यात येऊ नये. इतर विद्यार्थ्यांना अभ्यासाचा बोजा न देता सुट्टीचा आनंद उपभोगू द्यावा, असेही केसरकर म्हणाले.
राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी विषय सक्तीचा करण्यात आला आहे. केवळ केंद्रीय मंडळाच्या शाळांमध्ये आठवीच्या यावर्षीच्या वर्गालाच (बॅच) गुणांकनाची सवलत देण्यात आली आहे. मराठी विषय वगळण्यात आलेला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मराठी भाषा सक्ती इयत्ता सहावीपासून करण्यात आली आहे. तथापि कोरोनाचा काळ असल्याने यावर्षी आठवीत शिकत असलेले विद्यार्थी मराठी भाषा विषय पहिल्यांदाच शिकत आहेत. त्यामुळे 2022-23च्या आठवीच्या विद्यार्थ्यांना 2024-25 या वर्षी दहावीपर्यंत एकवेळची बाब म्हणून मराठी विषयाच्या परीक्षेचे श्रेणीमध्ये रूपांतरीत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

