आज राष्ट्रवादीत अजित पवारांपासून अनेकांमध्ये अस्वस्थता आहे. काँग्रेसमध्येही तीच परिस्थिती आहे. मात्र त्यांची गोळाबेरीज जमत नाही म्हणून ते थांबले आहेत, असा दावा शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी माध्यमांशी बोलताना केला.
अजित पवारांची अस्वस्थता आजची नाही. पार्थ पवार यांच्या पराभवापासूनच अजितदादा नाराज आहेत. महाविकास आघाडीमध्ये दादांना स्थान नाही. नागपूरच्या वज्रमुठ सभेतही त्यांना बोलू देण्यात आले नाही. त्यामुळे ते राष्ट्रवादी सोडत असावेत, असे ते म्हणाले.
अजित पवार हे ताकदवर नेते आहेत. ते राष्ट्रवादी सोडून जर भाजप किंवा आमच्या पक्षात येत असतील तर त्यांचे स्वागतच आहे. मात्र ते जर राष्ट्रवादीला घेऊन सत्तेत येत असतील तर आम्ही सत्तेत राहणार नाही, असेही शिरसाट यांनी सांगितले. राहुल गांधी मातोश्रीवर कधीही जाणार नाहीत, असा दावाही त्यांनी केला.

