मी राष्ट्रवादीत आहे आणि राष्ट्रवादीत राहणार. आता स्वतःच मी स्पष्टपणे सांगतोय. एफिडेव्हिटवर लिहून देऊ का? की स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ, असा सवाल विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज प्रसिद्धीमाध्यमांना केला.
गेल्या काही दिवसांपासून अजित पवार भारतीय जनता पार्टीमध्ये जाणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. या चर्चेला पूर्णविराम देताना आज अजित पवार यांनी, आपण राष्ट्रवादीत आहोत. शरद पवार यांच्या नेतृत्त्वाखाली आम्ही सर्व काम करत आहोत. महाविकास आघाडी मजबूत करत आहोत, असे सांगितले.
कारण नसताना माझ्याबद्दल माझ्या सहकाऱ्यांबद्दल जी बदनामी चाललेली आहे, ज्या तथ्यहीन बातम्या सगळीकडे दाखवल्या जात आहेत, याबद्दल अजितदादांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. नागपूरला महाविकास आघाडीच्या सभेसाठी आपण गेलो होतो. तेथून परतताना उद्धव ठाकरे यांच्यासोबत आपण नवी मुंबईतल्या एमजीएम रुग्णालयात जाऊन महाराष्ट्र भूषण कार्यक्रमाच्या वेळी उष्माघाताने जखमी झालेल्या रुग्णांची विचारपूस केली. त्यानंतर विरोधी पक्षनेता या नात्याने आणखी काही रुग्णालयांमध्ये जाऊन माहिती घेतली. त्यानंतर आपण आपल्या निवासस्थानी होतो. परंतु सातत्याने मी भाजपमध्ये जाणार… राष्ट्रवादी सोडणार… अशा बातम्या चालवल्या गेल्या. आजही मी विधानभवनात माझ्या कार्यालयात होतो. राष्ट्रवादीचे अनेक आमदार, देवेंद्र भुयार, शेखर निकम, धनंजय मुंडे, अनिल पाटील, नितीन पवार, अनेकजण त्यांच्या त्यांच्या कामाला आले होते. मी तिथे आहे म्हटल्यावर ते मलाही भेटले. तर मी मीटिंग बोलावली आहे, सह्यांची मोहीम चालवली आहे, अशा बातम्या आल्या. तुम्ही प्रत्येक आमदाराला जाऊन विचारू शकता आणि कोणी सही केली हे पाहू शकता. उगाच बदनामी करणे आता बंद करा, असे आवाहन अजितदादांनी केले.
माझ्या शासकीय निवासस्थानाबाहेर, देवगिरीच्या बाहेर काही चॅनलचे कॅमेरे लावलेले आहेत. कशासाठी करता? मला जायचंय तर मी जाईन आणि राहायचं तर राहीन आणि जे काय आहे ते मी स्वतः सांगीन… इकडे तिकडे कॅमेरा लावून… आम्हाला पण काय खाजगी जीवन आहे की नाही? आम्ही पण हाडामांसाची माणसं आहोत. आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, असा इशाराही त्यांनी दिला.
दुसऱ्या पक्षाचे काही प्रवक्ते राष्ट्रवादीचे प्रवक्ते असल्यासारखे भाष्य करत आहेत. अरे तुम्हाला जे म्हणायचं आहे ते तुमच्या पक्षाबद्दल सांगा ना… तुमचं मुखपत्र आहे. त्यात काय ते लिहा.. आमचे वकीलपत्र कोणी घेण्याची काही गरज नाही… असे त्यांनी संजय राऊत यांचे नाव न घेता सुनावले. आपल्यावर अनेक प्रकारच्या चौकशा अनेक वर्षांपासून चालू आहेत. चौकशी जेव्हा होते तेव्हा चौकशी अधिकारी बोलावतात. परवा दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनाही बोलावले. चौकशी असल्यानंतर जावं लागतं. विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतात. त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काय आहे? आणि त्याच्यामुळे माझ्यावर दबाव आणला जातोय, अशा पद्धतीचे भाष्य करणे चुकीचे आहे, असे अजित पवार यांनी सांगितले.

