राज्याच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या लाभार्थींशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री रवींद्र चव्हाण उद्या, गुरूवार, १३ एप्रिलला सायंकाळी ४.३० वाजता सह्याद्री अतिथीगृह येथे संवाद साधणार आहेत. यावेळी प्रामुख्याने आनंदाचा शिधा तसेच शिवभोजन थाळी योजनेतल्या अडचणींवर विचार केला जाणार आहे.

“आनंदाचा शिधा” संचाचे वितरण, राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान (बोनस), शिवभोजन थाळी या योजनांसदर्भात लाभार्थींना या शिधाजिन्नसांचे वितरण होत आहे किंवा कसे, रास्तभाव दुकानांमार्फत योजनेचा लाभ घेताना अडचणी तसेच समस्या येत असल्यास त्या जाणून घेणे, धान उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया, संवादासाठी निवडण्यात आलेल्या योजना यासंदर्भात हे मंत्री लाभार्थींशी संवाद साधणार आहेत.
यासाठी या योजनांचा लाभ घेतलेल्या लाभार्थींपैकी प्रत्येक जिल्ह्यातील सुमारे ५० लाभार्थी संबंधित जिल्हा कार्यालयातील NICच्या Video Conference केंद्रात उपस्थित राहणार आहेत. जिल्ह्यातील वरिष्ठ प्रशासकीय अधिकारीदेखील याप्रसंगी उपस्थित असतील. उपस्थित लाभार्थींपैकी निवडक लाभार्थींशी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री संवाद साधणार आहेत, असे समजते.

