एकीकडे राज्यात विविध ठिकाणी शिवसेना व भाजपाची स्वा. सावरकर गौरव यात्रा सुरू असतानाच महाविकास आघाडीच्या छत्रपती संभाजी महाराज नगर येथील वज्रमूठ सभेकडे जनतेचे लक्ष लागले होते. मात्र या जाहीर सभेला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी एनवेळी दांडी मारली. त्यामुळे आघाडीची ही वज्रमूठ किती काळ टिकणार अशी चर्चा उपस्थितांमध्ये रंगू लागली.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी त्यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत माफी मागण्यास नकार देताना आपण गांधी आहोत, सावरकर नाही, असे भाष्य केले होते. त्यावरून सत्ताधारी शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी काँग्रेसवर आणि विशेषतः राहुल गांधींवर जोरदार टीका केली होती. याचाच परिपाक पुढे स्वा. सावरकर गौरव यात्रा काढण्याच्या घोषणेत झाली. एकूण वातावरण लक्षात घेता उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधी यांच्यावर सावरकरांबद्दल अवमानास्पद टिप्पणी केल्याबद्दल जाहीर निषेध केला. त्यामुळे आजच्या सभेत सावरकर या विषयावर उद्धव ठाकरे कोणती भूमिका घेणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले होते. अशा वातावरणात सावरकरांच्या बाजूने भूमिका घ्यायची की विरोधात अशा कोंडीत सापडलेल्या नाना पटोले यांनी सभेला दांडी मारण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जाते. मात्र या सभेला काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात तसेच अशोक चव्हाण यांनी मात्र हजेरी लावून भाषणे ठोकली. परंतु त्यात सावरकरांवर कोणतेही भाष्य केले नाही.

