उद्धव ठाकरे यांचा काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर गेल्यामुळे राजकीय लव्हजिहाद झाला आहे. आधी एखादी हिंदू व्यक्ती बोलते अशी त्यांची भाषा असायची. आता ते लव्हजिहादची भाषा बोलतात. बाळासाहेबांच्या मुलाचे राजकीय धर्मांतर झाले असून यापुढे ते कधीही हिंदू समाजाला संरक्षण देऊ शकणार नाहीत, असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार नितेश राणे यांनी आज एका पत्रकार परिषदेत केले.
राणे यांनी आज लव्हजिहाद तसेच धर्मांतर या विषयावर सविस्तर माहिती देणारी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते. खेड येथे झालेल्या उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभेत त्यांनी कोकणातल्या मराठी मुसलमानांना आवर्जून साद घातली, यावरूनही हे स्पष्ट होते. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना लव्हजिहादच्या प्रकरणांमध्ये हिंदू समाजाविरोधात अनेक ठिकाणी गुन्हे दाखल झाले. परंतु त्यांना ते दिसले नाहीत. अमरावतीमध्ये डॉ. उमेश कोल्हे यांच्या हत्त्येची दखलही त्यांनी घेतली नाही. हेच त्यांचे राजकीय लव्हजिहाद झाल्याचे उत्तम उदाहरण आहे असेही राणे म्हणाले.
या पत्रकार परिषदेत त्यांनी एक व्हिडिओ दाखवला. दौंडमध्ये एका हिंदू युवकाने मुस्लिम युवतीशी विवाह केला. त्यानंतर कमाल कुरेशी याने 14 ऑक्टोबर 2022 रोजी या युवकाची सुंथा केली. त्यानंतर त्याला धमकावण्यात आले. ही बाब कोणाला सांगायची नाही, आम्ही जे सांगू तेच तू करणार, असा दम देण्यात आला. याच कमालच्या पत्नीने तो अनेकांचे जबरदस्तीने धर्मांतर करत असल्याचे सांगितले. मी या गोष्टी जगाला सांगण्याचा प्रयत्न केला असता त्याने माझ्या पोटाला पिस्तूल लावले आणि जीवे मारण्याची धमकी दिली, असेही ही महिला म्हणाली. या व्हिडिओमध्ये ते स्पष्ट दिसत आहे. जिथे या कमालची पत्नी असे सांगते तेथे इतरांनी काय समजायचे हे समजून जावे असेही ते म्हणाले.
हिंदूने मुसलमानाबरोबर लग्न केले काय किंवा मुसलमानाने हिंदूबरोबर लग्न केले काय, आम्हाला याबद्दल कोणताही आक्षेप नाही. पण त्यात धर्म बदलण्याची काय गरज आहे? तुमचे प्रेम आहे ना… मग हिंदू म्हणून समोरच्याला स्वीकारा ना… देव-देवतांचे फोटो काढण्याची गरज काय? कुराण वाचण्यासाठी जबरदस्ती कशाला? हा विषय जेव्हा आम्ही विधानसभेत मांडला तेव्हा महिला आणि बाल विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी लव्हजिहादच्या लाखभर केसेस असल्याचे सांगितले. त्यामुळे अबू आझमी, रईस शेख, जितेंद्र आव्हाड यासारख्या आमदारांनी थयथयाट केला. थयथयाट करण्याची काय गरज आहे, असा सवाल नितेश राणे यांनी केला.
श्रीरामपूर येथील एका घटनेत एका जिहादी तरुणाने एका महिलेशी लग्न केले. तिचा धर्म बदलला. त्यानंतर त्याने तिच्या मुलीबरोबर लग्न केले. ती सात महिन्यांची गरोदर आहे. जेमतेम १४ वर्षांची ही मुलगी आहे. याला धर्मांतर म्हणणार नाही तर काय म्हणणार? १४ वर्षांपेक्षा खाली अनेक मुलींना आज लव्हजिहादच्या बळी ठरत आहेत. पॉस्कोखाली जे गुन्हे दाखल होतात त्यातली अनेक प्रकरणे लव्हजिहाद, धर्मांतरांची आहेत. त्यामुळेच आज सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. आजही काही पोलीस अधिकारी महाविकास आघाडीच्या काळातच असल्यासारखे वावरतात. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री, दिलीप वळसे पाटील गृहमंत्री, आणि नवाब मलिकसारखे अल्पसंख्याक विकास मंत्री सरकारमध्ये आहेत, असा त्यांचा समज आहे. पण या अधिकाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे की आता हिंदूंचे रक्षण करणारे सरकार आहे. प्रखर हिंदुत्ववादी देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री आहेत. त्यामुळे जास्त काळ त्यांची मुजोरी चालणार नाही. त्यांना आपल्या जागा सोडून लवकरच दुसरीकडे जावे लागेल, असा इशाराही नितेश राणे यांनी दिला.
या राज्यात लव्हजिहादच्या घटना घडत नाहीत, इंटरफेस कमिटीच्या स्थापनेवर जे लोक बोंबलत आहेत त्यांनी आमच्याबरोबर यावे, त्यांना लव्हजिहादची प्रकरणे कशी घडतात याची उदाहरणे दाखवली जातील. एकेक मुलींचे आयुष्य कसे उद्ध्वस्त होते हे त्यांनी स्वतः पाहावे, त्यांच्याशी संवाद साधावा. मग त्यांच्या लक्षात येईल की, हा सगळा प्रकार काय आहे? राज्य सरकारने या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून उत्तर प्रदेश, गुजरात, कर्नाटक यांच्यापेक्षा अधिक सक्षम आणि कडक असा लव्हजिहादविरोधात कायदा तयार करावा, असे आवाहनही आमदार राणे यांनी केले. आमदार राम सातपुते तसेच आमदार माधुरी मिसाळ यावेळी उपस्थित होत्या.

