कोणाचेही तोंड बंद करायचे असले तर त्याचे लग्न लावून देणे, हा प्रभावी उपाय आहे, असं उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितलं आणि तसं सांगतानाच मी स्वानुभवातून सांगतोय, असं म्हणून पुन्हा हंशा वसूल केला.
नाशिकमधील आमदार सरोज अहिरे यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेवर राज्यातील जुने वीजनिर्मिती प्रकल्प, त्यांचा आपत्कालीन परिस्थितीत होणारा वापर, त्यातून उद्भवणारे प्रश्न, याची चर्चा सुरू होती. ती होताना आमदार बच्चू कडू यांनी उपरोधिकपणे प्रश्न विचारला की, प्रकल्प उभा करायचा, जुना झाला तरी चालवायचा म्हणजे लग्नही सरकारने लावायचे आणि पुढची जबाबदारीही सरकारनेच घ्यायची, असं आहे का? त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी नागपूरमध्ये वीजप्रकल्पांतून निघणाऱ्या राखेच्या तलावाशी संबंधित काही उपप्रश्न विचारले.

त्यावर उत्तर देताना फडणवीस मिष्किलपणे म्हणाले की, बच्चू कडू यांनी बहुधा हा प्रश्न आदित्य ठाकरे यांच्याकडे बघत बघत विचारला असे मला वाटतेय… तर मी सांगू इच्छितो की, आम्ही लग्न लावून द्यायची जबाबदारी घेतो… त्यावर आदित्य ठाकरे उठून म्हणाले की, लग्न लावून देतो, पण आमच्या बाजूला या, अशी ही धमकी तर नाही ना… त्यावर फडणवीस म्हणाले की, एखाद्याचे तोंड बंद करायचे असले की…
ते वाक्य फडणवीस यांनी अर्धवट सोडून दिले आणि सभागृहात हंशा उसळला. त्यावर फडणवीस यांनी लगेच टिप्पणी केली. अहो, मी स्वानुभवातूनच सांगतोय हे… ते असे म्हणताच सभागृहात पन्हा हास्यकल्लोळ उडाला.

