बिबट्या आला तर रोडिओवर गाणी लावा… म्हणजे बिबट्या पळून जातो, असा सल्ला वन अधिकारी देतात, अशी तक्रार एका आमदाराने काल विधानसभेत केली. त्यावरून संतप्त झालेले वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गाणं म्हणून बिबट्या पळून जात नाही, हे स्पष्टपणे सांगितले. पण, तसे सांगताना लक्षवेधी सूचना कोणीतरी मांडल्यावर वनअधिकाऱ्यांचा हा सल्ला वनमंत्र्यांना विधानसभेत ऐकवण्याची वाट बघू नका. हा सल्ला मिळाल्यामिळाल्या आपल्या लेटरहेडवर एक पत्र लिहून वनमंत्र्यांना म्हणजे मला पाठवा म्हणजे मी तसा सल्ला देणाऱ्या वनअधिकाऱ्यांना गाणी ऐकायला मिळतील, अशा ठिकाणी पाठवतो, असे मुनगंटीवार यांनी सांगताच सभागृहात हंशा उसळला.
तुम्ही आमदारांनी अशा गोष्टी वेळच्या वेळी सांगितल्या नाहीत तर मग राज्याच्या विकासाचेच गाणे झाल्याशिवाय राहणार नाही, अशी टिप्पणीही वनमंत्र्यांनी केली.

एका आमदाराने शेजारील राज्यातून हत्ती महाराष्ट्रात येतात आणि पिके नष्ट करतात, असे सांगितले. त्यावर छत्तीसगड किंवा कर्नाटकसारख्या शेजारील राज्यातून हत्तीही महाराष्ट्रात येतात, इतका विकास माजी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या सरकारने २०१४ ते २०१९मध्ये केलेला आहे, अशी टिप्पणी मुनगंटीवार यांनी केली. अर्थात, गंमतीचा भाग सोडून त्यांनी या सर्व संकटांवर सरकार करीत असलेल्या उपाययोजनांचीही माहिती दिली.
त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील यांनी मुनगंटीवार यांच्या या उत्तरांना आणि असे व्हायला उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस जबाबदार आहेत, असे विधान केले. त्यावर सभागृहातील सर्वांनाच प्रश्न पडला आणि फडणवीस यांनी मुनगंटीवार यांना वनमंत्री तसेच सांस्कृतिक कार्यमंत्रीही केलेले असल्यामुळे त्यांना वनअधिकारी गाणी ऐकवण्याचा सल्ला देत आहेत, अशी टिप्पणी केली आणि सभागृह पुन्हा हास्यकल्लोळात बुडाले.

