पुण्यातील कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रयत्न सुरू केले असून यासाठी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना फोन केल्याचे समजते.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही एका पत्राद्वारे या पोटनिवडणुका बिनविरोध करण्याचे जाहीर आवाहन केले आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या दोन आमदारांचे नुकतेच निधन झाले. या निधनामुळे रिक्त झालेल्या विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणुका होत आहेत. मी अगदी सुरुवातीपासून या मताचा आहे की, जेव्हा एखाद्या विद्यमान लोकप्रतिनिधीचे निधन होते, तेव्हा तिथे होणारी पोटनिवडणूक शक्यतो बिनविरोध करावी. कारण मुळात जसा त्या विधानसभेतील कौल लोकप्रतिनिधीला असतो, तसाच कौल त्याच्या पक्षालादेखील असतो. अनेकदा त्या पोटनिवडणुकीत उमेदवार हा मृत व्यक्तीच्या घरातील असतो. अशावेळेस पक्षाने जर मृत व्यक्तीच्या घरातील उमेदवार दिला असेल तर, त्या उमेदवाराला बिनविरोध निवडून देणे ही एका उमद्या राजकीय संस्कृतीने त्या निधन झालेल्या व्यक्तीला दिलेली श्रद्धांजलीच ठरणार नाही का? आणि ही प्रगल्भता महाराष्ट्राच्या राजकारणाला नवी नाही. अर्थात उमेदवार जर निधन पावलेल्या लोकप्रतिनिधीच्या घरातील नसेल तर, जनतादेखील सहानभूती दाखवेलच असे नाही, असेही त्यांनी पत्रात स्पष्ट लिहिले आहे.
अंधेरी पूर्व विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या वेळेस, दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी शिवसेनेच्या तिकिटावर उभ्या होत्या, त्यावेळेस मी देवेंद्र फडणवीस ह्यांना निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन केले होते. ज्याला सकारात्मक प्रतिसाद देत, त्यांनी ती निवडणूक बिनविरोध होऊ दिली. आता पुन्हा पिंपरी-चिंचवड आणि कसबा विधानसभांमध्ये पोटनिवडणुका होत आहेत. जो उमदेपणा भारतीय जनता पक्षाने दाखवला तोच उमदेपणा महाविकास आघाडीच्या नेत्यांनीदेखील दाखवावा. महाराष्ट्राची राजकीय संस्कृती प्रगल्भ आहे हे देशाला दाखवून देण्याची संधी आपल्या सर्वांना आहे. हीच नाही तर एकूणच अशा दुःखद घटनांमुळे होणाऱ्या पोटनिवडणुका बिनविरोध कराव्यात, असे आवाहन ठाकरे यांनी या पत्राद्वारे केले आहे.
दरम्यान, महाविकास आघाडीकडून दोन्ही ठिकाणी उमेदवार देण्याची तयारी सुरू केली आहे. या दोन्ही ठिकाणी निवडणुका होणार असल्याचे वक्तव्य संजय राऊत यांनी केले आहे. कसब्यातून काँग्रेसचा उमेदवार निवडणूक लढवणार असून चिंचवडमधून राष्ट्रवादी निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहे. चिंचवडच्या जागेसाठी शिवसेनेचा ठाकरे गटही आग्रही असल्याचे राऊत यांनी सांगितले.
भारतीय जनता पार्टीने चिंचवड आणि कसबा या दोन्ही ठिकाणी उमेदवार जाहीर केले आहेत. चिंचवडमधून अश्विनी जगताप यांना अमेदवारी देण्यात आली आहे. अश्विनी जगताप या दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी आहेत. सातारा हे त्यांचे मूळ गाव आहे. निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांच्या त्या लेक आहेत. प्रतिभा महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा आहेत. या प्रतिष्ठानद्वारे महिला बचत गटांचे जाळे त्यांनी पसरवले आहे. महिलांच्या विकासासाठी त्यांनी फार काम केले आहे. लक्ष्मण जगताप निवडणुकीस उभे असताना त्या प्रचारात सक्रीय होत्या. मात्र निवडणूक त्या पहिल्यांदाच लढवत आहेत. कसब्यातून हेमंत रासने यांना उमेदवारी देण्यात आली आहे. रासने पुणे महानगरपालिकेचे भाजपाचे नगरसेवक आहेत. पुणे महापालिकेचे ते दोन टर्म स्थायी समिती अध्यक्ष होते. आमदार मुक्ता टिळक (कसबा) आणि आमदार लक्ष्मण जगताप (चिंचवड) यांच्या निधनामुळे या पोटनिवडणुका होत आहेत.

