शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचे अनावरण उद्या मुंबईत विधान भवनाच्या मध्यवर्ती सभागृहात होत असून यावेळी उद्धव ठाकरे यांच्या परिवारातील कोणीही सदस्य उपस्थित राहणार नसल्याचे विश्वसनीयरीत्या समजते.
राज्य विधिमंडळाच्या नुकत्याच झालेल्या अधिवेशनात विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी बाळासाहेबांच्या जयंतीदिनी म्हणजेच २३ जानेवारीला त्यांच्या तैलचित्राचे अनावरण केले जाणार आहे. या कार्यक्रमाच्या निमंत्रणपत्रिकेवरूनही वाद निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. बाळासाहेबांचे चिरंजीव उद्धव ठाकरे यांचे नाव निमंत्रणपत्रिकेवर नसल्याचा मुद्दा पुढे आला. उद्धव ठाकरे माजी मुख्यमंत्री तसेच आमदारही आहेत. त्यामुळे त्यांचे नाव पत्रिकेवर असायला हवे होते, असे त्यांचे पाठिराखे बोलत होते.
विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी उद्धव ठाकरे यांना स्वतः फोन करून कार्यक्रमाला सहकुटूंब येण्याची विनंती केली. तसे त्यांनी स्वतःच माध्यमांना सांगितले. मात्र, ठाकरे कुटुंबाकडून यावर कोणतेही अधिकृत भाष्य करण्यात आलेले नाही. किंबहुना बाळासाहेबांच्या जयंतीचे औचित्य साधून उद्धव ठाकरे यांनी षण्मुखानंद हॉलमध्ये एक मेळावा आयोजित केला आहे. खासदार संजय राऊत यांनी, या कार्यक्रमाला उद्धव ठाकरे हजर राहणार की नाही असे विचारले असता हा राजकीय कार्यक्रम असल्याची टिपण्णी केली होती. विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी, हा संपूर्णपणे सरकारी कार्यक्रम असल्याचे सांगत राऊत यांच्यावर पलटवार केला. महाराष्ट्राचा, महाराष्ट्रातल्या २८८ आमदारांचा हा कार्यक्रम आहे, असे सांगायलाही ते विसरले नाहीत.
त्याचवेळी ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी औरंगाबादमध्ये बोलताना या कार्यक्रमाच्या आयोजनावर जोरदार टीका केली. बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचे अनावरण एका घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. माझे आजोबाही विचार करतील की, गद्दारांच्या हस्ते माझ्या तैलचित्राचे अनावरण होत आहे, असा टोला त्यांनी लगावला.
एका माणसाच्या राक्षसी महत्त्वाकांक्षेमुळे राज्य मागे गेले आहे. राज्य ओके नाही. पण हे ओके होऊन बसले आहेत. जेव्हढे ते खालच्या पातळीवर जातील तेव्हढे आपण मोठ्या उंचीवर जाणार आहोत, असेही ते म्हणाले. त्यांच्या या विधानांवरूनही ठाकरे कुटुंबीय या कार्यक्रमाला जाणार नाहीत, याचीच पुष्टी मिळते, असे जाणकारांचे मत आहे.

