तीन टर्म आमदार असल्याने या जागावाटपावर चर्चा झाली नाही. महाविकास आघाडीतील नेते एकमेकांशी चर्चा करत होते. आमचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशीही चर्चा झाली होती. आताही ते सतत फोनव्दारे संपर्कात आहेत. मात्र नाशिक येथे काहीतरी गडबड आहे याची कुणकुण लागली होती आणि याची कल्पना काँग्रेसच्या वरिष्ठांना दिली होती. काँग्रेसने नाशिक पदवीधर मतदारसंघातील दोन्ही उमेदवारांवर कारवाई केल्याने आघाडीचा उमेदवार कोण याबाबत चर्चा निर्माण झाली आहे. अपक्ष महिला उमेदवार शुभांगी पाटील यांनी उद्धव ठाकरे आणि माझ्याशी संपर्क साधला आहे. त्यामुळे यावर उद्या अंतिम निर्णय होईल, अशी माहिती विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज माध्यमांशी बोलताना दिली.
काँग्रेसचे डॉ. सुधीर तांबे यांनी अधिकृत उमेदवारी जाहीर झालेली असताना अर्ज दाखल न केल्यामुळे नाशिकमध्ये पेच निर्माण झाला आहे. आघाडी म्हणून जागावाटप करताना औरंगाबाद (विक्रम काळे) ही जागा राष्ट्रवादीकडे तर नाशिक काँग्रेसकडून डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी देण्यात आली. मात्र त्यांनी अर्ज भरला नाही. हा अर्ज न भरण्यामागे काय कारण आहे हे फक्त डॉ. तांबेच सांगू शकतील, असेही ते म्हणाले.
या जागावाटपावर भाजपा बोलत आहे. भाजपाला संधी मिळाली आहे म्हणून बोलत आहेत. मात्र त्यांच्या बोलण्याला काही अर्थ नाही. आम्ही बसून योग्य तो मार्ग काढला होता. मात्र अर्ज न भरल्याने प्रश्न निर्माण झाला आहे. हा काँग्रेस अंतर्गत प्रश्न आहे. त्यात महाविकास आघाडीला गोवण्यात काही अर्थ नाही. तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी बसून निर्णय घेतला होता. त्याला मी साक्षीदार आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत समन्वय नव्हता हे मी मान्य करणार नाही, असे अजित पवार यांनी सांगितले.
प्रकाश आंबेडकर आमच्या पक्षावर सतत का शंका घेतात हे कळायला मार्ग नाही. शरद पवारांनी ओपनमधून प्रकाश आंबेडकर, रा. सु. गवई, रामदास आठवले, जोगेंद्र कवाडे यांना निवडून आणण्याचे काम केले होते. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत आठवले यांच्यासोबत युती राहिली होती. पंढरपूरमधून आठवले यांना निवडून आणले होते. प्रकाश आंबेडकर नेहमीच आमच्या पक्षाच्या वरिष्ठांवर अशाप्रकारची वक्तव्ये करत असतात. तो त्यांचा अधिकार आहे. परंतु आम्ही कुणाशीही तसे वागत नाही, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.

