स्वित्झर्लंड येथील दावोसमध्ये ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’च्या विद्यमाने आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेत पहिल्याच दिवशी महाराष्ट्रात सुमारे ४५ हजार ९०० कोटींच्या गुंतवणूक करारांवर स्वाक्षरी करण्यात आल्याची माहिती, राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली.
दावोस येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’च्या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी आगमन झाले असून त्यांनी दावोस येथे महाराष्ट्र पॅव्हेलियनला भेट दिली. महाराष्ट्र पॅव्हेलियनमध्ये राज्याच्या प्रगतीचे प्रभावी दर्शन घडवले जाणार असून महत्त्वाच्या उद्योगांसमवेत येथे सामंजस्य करारही केले जाणार आहेत, असे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज विविध कंपन्यांसमवेत सामंजस्य करार करण्यात आले असून या माध्यमातून सुमारे १० हजार तरूणांच्या हाताला काम मिळणार असल्याची माहितीही सामंत यांनी दिली. यावेळी, प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विपिन शर्मा, टी. कृष्णा, श्रेएरेन, आशीष नवडे, स्टीफन व सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
यावेळी करण्यात आलेल्या सामंजस्य करारानुसार ग्रीनको एनर्जी प्रोजेक्ट प्रा. लि. कंपनीची १२ हजार कोटींची, बेर्कशिरे हातवे होम सर्व्हिस ओरेन्डा इंडिया कंपनीची १६ हजार कोटींची, आयसीपी इन्व्हेस्टमेंट/ इंडस कॅपीटल कंपनीची १६ हजार कोटींची, रूखी फूड कंपनीची २५० कोटींची, निर्पो फार्मा पॅकेजिंग इंडिया प्रा. लि. कंपनीची १६५० कोटींची याप्रमाणे याप्रमाणे गुंतवणूक अपेक्षित आहे, असेही उद्योगमंत्री सामंत यांनी स्पष्ट केले.

