मुंबई महापालिका आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी आसुसलेल्या उद्धव ठाकरे यांची आता कोंडी झाली आहे. मै इधर जाऊँ… या उधर रहूँ… अशी गत करून घेताना त्यांच्यासमोर आता महाविकास आघाडीबरोबर राहायचे की प्रकाश आंबेडकरांबरोबर जायचे, असा प्रश्न पडला आहे.
गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या शिवसेनेबरोबर प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्यासाठी प्रयत्न चालवले आहेत. वंचित बहुजन आघाडीचे मुंबईत तसे अस्तित्त्व नाही. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांनाही त्यांना पूर्ण प्रतिसाद दिला आहे. आतापर्यंत झालेल्या खुल्या आणि छुप्या चर्चेत या दोघांनी मुंबई महापालिकेची निवडणूक, त्याचबरोबर राज्यात इतरत्र होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये युती करण्याचा निर्णय घेतला आहे.

मात्र यासाठी शिवसेनेचा ठाकरे गट ज्या महाविकास आघाडी सहभागी आहे त्या महाविकास आघाडीतले घटक पक्ष काँग्रेस तसेच राष्ट्रवादी काँग्रेस यासाठी तयार नाहीत. प्रकाश आंबेडकर यांनी स्वतः माध्यमांशी बोलताना हे स्पष्ट केले आहे. राष्ट्रवादीचा वंचितला महाविकास आघाडीत सामावून घेण्यासाठी खुला विरोध आहे तर काँग्रेस छुपा विरोध करत आहे असे ते म्हणाले होते.
आज त्यांनी यापुढील भाष्य केले. उद्धव ठाकरे यांनी चार भिंतीमध्ये झालेली चर्चा लक्षात घेता येत्या दोन दिवसांत त्यांच्या शिवसेनेची तसेच वंचितची युती जाहीर करावी, असे आवाहन त्यांनी केले. ठाकरे युती घोषित करण्यास तयार आहेत. मात्र ते वंचितला महाविकास आघाडीत सहभागी करून घेण्याबाबत आघाडीच्या नेत्यांशी चर्चा करत आहेत. तसे त्यांनी आपल्याला कळवलेही आहे. मात्र काँग्रेसला आणि शरद पवारांना आपण जितके ओळखतो तितके कोण ओळखत नाही. त्यामुळे ठाकरेंनी आता वाट न पाहता येत्या दोन दिवसांत युती जाहीर करावी, असे आंबेडकर म्हणाले.

वंचित बहुजन आघाडीला सोबत घेऊन महाविकास आघाडीबरोबर संबंध ठेवायचे तर शिवसेनेला म्हणजे शिवसेनेच्या ठाकरे गटाला आपल्या कोट्यातल्या जागा त्यांच्यासाठी सोडाव्या लागणार आहेत. भाजपाबरोबर युती होती त्यावेळी शिवसेना ज्या जागा भाजपाला सोडत होती त्यातल्या काही जागा महाविकास आघाडीच्या इतर घटक पक्षांच्या संमतीने बहुजन वंचित आघाडीला सोडता येणे शक्य आहे का याची चाचपणी सध्या उद्धव ठाकरेंचे जवळचे सहकारी करत आहेत. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनीही आघाडीतला जो प्रमुख पक्ष ज्या पक्षाला सोबत घेईल त्यांनी त्यांच्या कोट्यातल्या जागा या मित्र पक्षाला सोडाव्यात, असे जाहीर केल्याने ठाकरे गटाला वंचितला सोबत ठेवायचे असल्यास आपल्या कोट्यातल्या जागा सोडण्याशिवाय पर्याय राहिला नसल्याचे बोलले जाते.
जर महाविकास आघाडीने आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादीने वंचित आघाडीला काही जागा सोडण्यास नकार दिला किंवा त्यांना सोबत घेतल्यास काडीमोड घेण्याची तयारी दाखवली तर हा विषय आणखी वेगळी वाट दाखवू शकतो. तसे झाल्यास काँग्रेस राष्ट्रवादी यांची आघाडी राहील आणि वंचित बहुजन आघाडी आणि ठाकरे गट असे स्वतंत्रपणे जागावाटप करतील आणि त्याचबरोबर बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजपा यांची युती असे तीन वेगवेगळ्या युती किंवा आघाड्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये लोकांना दिसू शकतात, असे जाणकारांचे मत आहे.

