Homeटॉप स्टोरीतसेही तुम्हाला मुख्यमंत्रीपद...

तसेही तुम्हाला मुख्यमंत्रीपद सोडावेच लागले असते!

जर तुमच्या म्हणण्यानुसार भारतीय जनता पार्टीने आश्वासन पाळले असते, तरी अडीच वर्षांनंतर तुम्हाला मुख्यमंत्री पदावरून उतरावे लागलेच असते. मग आता पदावरून उतरल्यावर इतके अस्वस्थ होण्यासारखे काय, असा सवाल शिवसेनेच्या शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना एका पत्रकार परिषदेत केला.

उद्धव ठाकरे यांना आपण तीन सवाल विचारले होते, ज्याची उत्तरे अजूनही मिळाली नाहीत. आपण एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवण्याचे आश्वासन दिले होते की नाही? शिंदे यांनी आपल्याला मुख्यमंत्री होण्यात रस नाही, असे सांगत तुम्हालाच मुख्यमंत्रीपदी राहण्यास सांगितले होते की नाही? मात्र त्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीची साथ सोडून भाजपाची, हिंदुत्वाची कास धरा, असे सांगितले होते की नाही?, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी युतीबद्दल चर्चा केली होती आणि येथे भाजपाचे १२ आमदार निलंबित केल्यामुळे पुढची बोलणी थांबली, ही खासदार राहुल शेवाळे यांनी दिलेली माहिती खोटी आहे का, असे सवाल करत केसरकर यांनी ठाकरे यांना पुन्हा धारेवर धरले.

अडीच वर्षे फक्त राजकारणच केले. राजकारण करण्यालाही मर्यादा असतात. रोज सकाळी नऊ वाजता एकाने उठायचे आणि पत्रकारांसमोर केंद्र सरकारवर टीका करायची. अशाने राज्य चालवता येत नाही. युवा सेनेचे नेते आता जे शाखा-शाखांमधून फिरत आहेत ते अडीच वर्षे कुठे होते? सातव्या मजल्यावर त्यांचे कार्यालय होते. जनतेला भेटण्यासाठीच कार्यालय आणि सरकारी निवासस्थान दिलेले असते. मग या काळात किती वेळा ते कार्यालयात गेले आणि किती जणांना भेटले, असा सवालही त्यांनी आदित्य ठाकरे यांचे नाव न घेता केला.

तुम्ही आजारी असताना आम्ही कटकारस्थान केले, या आरोपात काहीही तथ्य नाही. आम्ही कारस्थानच केले नाही. जे काही केले ते सांगून, समजावून केले. कार्यकर्ते कसे गोळा करायचे हा तुमचा प्रश्न आहे. पण यात जनतेला ओढू नका. आज खासदारांच्या घरावर मोर्चा काढला जात आहे. अशाने कायदा-सुव्यवस्थेला धक्का लागू शकतो. पोलिसांना बळाचा वापर करणे भाग पडू शकते. तुम्हाला शांतता नको आहे का? हे सर्व थांबले गेले पाहिजे. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. शेतकऱ्यांच्या बांधावर जाण्याची भाषा करणाऱ्यांनी अतिवृष्टीमुळे हवालदील झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी बांधावर जाण्याची गरज आहे. खासदारांच्या घरावर मोर्चा काढण्याचे अधिकार तुम्हाला दिले कोणी, असा सवालही केसरकर यांनी उद्धव ठाकरे यांना केला.

Continue reading

शिक्षणतज्ज्ञ प्राचार्य डॉ. सुनिता कामटे सेवानिवृत्त

मुंबईतल्या बोरीवली पूर्व येथील सुविद्या प्रसारक संघाच्या श्री मंगुभाई दत्ताणी विद्यालय आणि योजना कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या शिक्षणतज्ज्ञ डॉ. सुनिता कामटे आपल्या ३३ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर नुकत्याच सेवानिवृत्त झाल्या. याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सुविद्या प्रसारक संघाचे अध्यक्ष शिक्षणतज्ज्ञ महादेव रानडे...

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सुरेखा पुरंदरे यांचे देहावसान

मुंबईतल्या दादर माटुंगा कल्चरल सेंटरच्या सल्लागार सदस्या तसेच दादर वनिता समाज, या प्रतिष्ठित संस्थेच्या ज्येष्ठ सदस्या सुरेखा पुरंदरे यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले. त्या ९१ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. शास्त्रीय संगीतात...

प्राध्यापक डॉक्टर भ्रष्टाचारी? जे. जे. रुग्णालयात खळबळ!

मुंबईतील प्रसिद्ध जे. जे. रुग्णालयाच्या अस्थिरोगशास्त्र (आर्थॉपेडिक्स) विभागात एका वरिष्ठ प्राध्यापकाविरुद्ध अत्यंत गंभीर आणि धक्कादायक आरोप झाल्यामुळे वैद्यकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. प्रा. डॉ. नितीन महाजन यांच्यावर निवासी डॉक्टरांचा मानसिक व आर्थिक छळ करणे, बनावट सह्या करणे आणि...
Skip to content