आमचा न्यायालयावर पूर्ण विश्वास आहे. साऱ्या जगाचे लक्ष सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे लागले आहे. यावर केवळ शिवसेनेचे भवितव्यच अवलंबून नाही तर देशात लोकशाहीचे भविष्य किती काळ राहील, हे स्पष्ट होईल, असे सांगत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात आपली बाजू लंगडी असल्याचे अप्रत्यक्षपणे सूचित केल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
११ जुलैला होणारी सुनावणी ही देशात लोकशाहीचे अस्तित्त्व किती काळ टिकणार आहे…. राज्यघटनेनुसार कारभार होणार आहे की नाही असा दिशा देणारा निकाल असेल…. असे ते म्हणाले.
आज एका पत्रकार परिषदेत बोलताना ठाकरे यांनी शिवसेना तसेच शिवसेनेचा धुष्यबाण, हे चिन्ह कोणीही नेऊ शकत नाही, असे स्पष्ट केले. शिवसेनेचा विधिमंडळ पक्ष वेगळा आणि रस्त्यावरचा पक्ष वेगळा आहे. जनतेच्या न्यायहक्कासाठी लढणारी शिवसेना हा रस्त्यावरचा पक्ष आहे. काही आमदार एकाकडे गेले म्हणजे पक्ष तिकडे गेला असे नाही. काही नगरसेवक तिकडे गेल्याचे सांगितले जाते. परंतु महापालिकाच आता अस्तित्त्वात नाहीत. ते शिवसैनिक नाहीत तर ज्यांना त्यांच्या सांगण्यानुसार तिकिटे दिली ते कार्यकर्ते गेले, असे ते म्हणाले.
पैशाचे आमीष, धमक्यांना न जुमानता जे १५-१६ आमदार आमच्याबरोबर राहिले आहेत, त्यांचा सत्कार करायला हवा. आज अनेकजण म्हणतात की, आजही बोलावले तर यायला तयार आहोत. हे मी आधीच बोललो होतो. सूरतला जाऊन बोलायची गरज नव्हती. गेली अडीच वर्षे हेच लोक माझ्या कुटुंबियांविषयी विकृत भाषा वापरत होते. त्यांना विरोध करणारे भाष्य कुणी केले नाही. माझ्या मुलाला आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न झाला. त्यांच्या मांडीला मांडी लावून हे बसत आहेत, असेही ठाकरे म्हणाले.
राष्ट्रपती निवडणुकीत कोणती भूमिका घ्याची याबाबत खासदारांशी, माझ्या सहकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेईन, असे ते म्हणाले. राज्यात हिम्मत असेल तर विधानसभेच्या निवडणुका घ्या, असे आव्हानही त्यांनी पक्षातल्या शिंदे गटाला दिले.

