गेले कित्येक वर्षे बेंगळुरूच्या एलहानका हवाई तळालगत देशाचा मोठा असा एअरो इंडिया शो सातत्याने आयोजित केला जातो. साधारणतः फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात तो संपन्न होतो. यंदाही सर्व ती कोरोना बाबतची काळजी घेऊन तो होणार आहे. तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात भारताच्या संरक्षण सिद्धतेबरोबरच अन्य निर्यात करारमदार होतात. देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह याचे आज, बुधवारी उदघाटन करतील तर राष्ट्रपती रामनाथ कोविंद याचा समारोप करणार आहेत.
एरवी पाच दिवस चालणारा हा उपक्रम यंदा तीनच दिवसात आटोपता घेतला जाईल. विविध विषयांवर इथे चर्चासत्रे होणार असून अनेक देश सहभाग घेणार असल्याने शेजारील चीन, पाकिस्तान या शत्रू राष्ट्राचे लक्ष इकडे लागले आहे. तशातच दोनच दिवसांपूर्वी दिल्लीतील इस्रायल दुतावासाजवळ कमी तीव्रतेचा स्फोट इराणी घटकाने घडवून आणल्याने या परिसरात अधिकच काळजी घेतली जात आहे. याचे उदघाटन झाल्यावर चित्तथरारक हवाई प्रात्यक्षिके सादर केली जातील. पावणे बाराला राजनाथ सिंह देशातील विविध संरक्षणविषयक घटकांच्या माहिती देणाऱ्या शामियानाचे उदघाटन करतील. दोन ते साडे पाच वाजेपर्यंत परिसंवाद, देशाच्या हवाई प्रमुखांचे मार्गदर्शन होईल. पुन्हा सायंकाळी हवाई कसरती होतील. भारत, रशिया देशातील तज्ज्ञांची बैठक, तर सायंकाळी उशिरा परदेशातील मान्यवरांना मेजवानी असा कार्यक्रम आहे.
गुरूवारी सकाळी हवाई दलप्रमुख आपल्या दुसऱ्या सत्रात विचार मांडतील. भारतीय हद्दीलगतचे नि अन्य देशाचे संरक्षण मंत्री यांची परिषद होईल. विविध घटकांचे चर्चासत्र सुरू राहील. दुपारी तीन वाजता भारतीय नौदलाने आपल्या समुद्री हद्दीलगतच्या देशांचे चर्चासत्र आयोजित केले आहे. गुरूवारी देशातील राज्य राष्ट्रीय पातळीवरील व्यापारी संघटना, राज्य शासन यांचा सहभाग असलेली चर्चासत्रे होणार आहेत. यात डी आर डी ओसह अन्य देशांचे दूतावास एकत्र येतील. भूदल, नौदल, फिक्की, असोचेम, भारतीय तटरक्षक दल, गुंतवणूकदार कंपन्या, संशोधन संस्था विचारांची देवाणघेवाण करतील.
शुक्रवारी स्टार्टअप मंथन होणार आहे. हवाई कसरती तर रोज होतील. गेल्याच्या गेल्या वर्षी भारतीय हवाई दलाच्या सूर्यकिरण विमानांची हवेत टक्कर होऊन दोन जणांना जीव गमवावा लागला होता. गेल्या वेळी याच कार्यक्रमावेळी बाहेर उभ्या असलेल्या गाड्यांना अचानक आग लागली नि अनेक वाहनं आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. यावेळी असे प्रकार घडू नयेत म्हणून खूपच काळजी घेतली जात असल्याचे सूत्रांनी सांगितले. शुक्रवारी समारोपाच्या दिवशी ‘बंधन’ हा विविध सामंजस्य करार करण्याचा नि त्यांच्या घोषणांचा कार्यक्रम दुपारी होईल. साडेतीन वाजता देशाचे राष्ट्रपती नि तिन्ही संरक्षण दलांचे प्रमुख डॉ. रामनाथ कोविंद उपस्थित समुदायाला संबोधित करतील. भारताची संरक्षण सिद्धता सांगतील नि सहकार्याचे आवाहन करतील.
एकूणच कार्यक्रमात सुमारे सहाशेच्या जवळपास प्रदर्शक उपस्थित राहणार असून त्यात ५२३ भारतीय तर ७८ परदेशी आहेत. तर २४८ व्हर्च्युअल सहभागी आहेत. चौदा देश सहभागी होणार आहेत. भारतीय बनावटीचे तेजस, विविध क्षेपणास्त्रे, भारतीय संशोधनाची झेप दाखवणारी सामग्री, खासगी क्षेत्रातील कंपन्या यात सामील आहेत. जय हिंद.