Homeन्यूज अँड व्ह्यूजगोव्यातल्या राष्ट्रीय क्रीडा...

गोव्यातल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्रातले ९०० खेळाडू!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गोव्यात आज, 26 ऑक्टोबरपासून सुरू होत असलेल्या ३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राचे नऊशे खेळाडू सहभागी होत असून यावेळीही आपले खेळाडू उत्तम कामगिरी करतील. सर्वाधिक पदके जिंकून राज्याला अव्वल स्थान मिळवून देतील, असा विश्वास उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनचे अध्यक्ष अजित पवार यांनी काल व्यक्त केला.

या क्रीडा स्पर्धेसाठी जात असलेल्या ९०० खेळाडू व २०० मार्गदर्शक अशा एकूण ११०० सदस्यांच्या महाराष्ट्राच्या पथकाकडे क्रीडाध्वज हस्तांतर करण्याचा सोहळा उपमुख्यमंत्री पवार यांच्या उपस्थितीत मुंबईत मंत्रालयात आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी क्रीडा मंत्री संजय बनसोडे, क्रीडा आयुक्त सुहास दिवसे, महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनचे महासचिव नामदेव शिरगावकर, उपाध्यक्ष प्रदीप गंधे, महाराष्ट्र कबड्डी संघाचे सचिव बाबुराव चांदेरे आदींसह स्पर्धेत सहभागी होण्यासाठी रवाना होत असलेले खेळाडू, क्रीडा संघटनांचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.

स्पर्धेतल्या सहभागी सर्वच खेळाडूंकडून महाराष्ट्राला पदकांची अपेक्षा आहे. मात्र, अपेक्षांच्या दबावाखाली न येता खेळाडूंनी त्यांचा नैसर्गिक खेळ खेळावा आणि सर्वोत्तम कामगिरी करावी. मागच्या वेळी, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी ८०० खेळाडू आणि अधिकाऱ्यांचे पथक पाठविले होते. त्यावेळी ३९ सुवर्ण, ३८ रौप्य, ८३ कांस्य अशी १४० पदके मिळाली होती. यावेळी आपले पथक मोठे आहे. यावेळी आपली तयारीही चांगली आहे. खेळाडूंमध्ये आत्मविश्वासही आहे. त्यामुळे ही  क्रीडा स्पर्धा आपल्याला अधिक पदके मिळवून देणारी, राज्याच्या गौरवात भर टाकणारी असेल. महाराष्ट्राने सर्वाधिक पदके जिंकून, पहिला क्रमांक मिळवलेला असेल. त्यावेळी विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सर्वजण पुन्हा एकत्र येऊ, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला.

राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जात असलेले खेळाडू महाराष्ट्राचे प्रतिनिधी म्हणून जात आहेत. तिथे राज्याला मान खाली घालावी लागेल, अशी कुठलीही चुकीची गोष्ट तिथे घडणार नाही, याची काळजी सर्वांनी घ्यावी. महाराष्ट्राच्या खेळाडूंनी आपल्या खेळातून, खिलाडूपणातून, वागण्यातून क्रीडा रसिकांची मने जिंकण्याचे काम करावे. राज्यासाठी पदके जिंकणे आणि खिलाडूपणे वागणे, या दोन्ही गोष्टी सारख्याच महत्त्वाच्या आहेत, याची जाणीवही त्यांनी खेळाडूंना करुन दिली.

आशियाई स्पर्धेत देशाची आणि महाराष्ट्राची उज्ज्वल कामगिरी

चीनमध्ये नुकत्याच झालेल्या, 19व्या आशियाई स्पर्धांमध्ये देशाच्या आणि आपल्या राज्याच्या खेळाडूंची कामगिरी सरस ठरली. आशियाई स्पर्धांमध्ये भारताने, २८ सुवर्ण, ३८ रौप्य, ४१ ब्राँझ, अळी एकूण १०७ पदके जिंकली. यात महाराष्ट्राचे मोलाचे, महत्त्वाचे योगदान होते. आशियाई स्पर्धेत, भारताने जिंकलेल्या 28 सुवर्णपदकांपैकी 15 सुवर्णपदके महाराष्ट्राच्या खेळाडूंनी जिंकली आहेत. याशिवाय महाराष्ट्राला 7 रौप्य, 5 कांस्य पदकं मिळाली आहेत. क्रीडा क्षेत्रातला देशाचा आणि राज्याचा हा विजयरथ पुढे नेण्याचे काम यापुढील काळात, राष्ट्रीय स्पर्धेत खेळणाऱ्या खेळाडूंना करायचे आहे, याची जाणीव ठेऊन तुम्ही तयारी केली पाहिजे. चांगले खेळले पाहिजे, असेही उपमुख्यमंत्री पवार म्हणाले.

आशियाई पदक विजेत्यांच्या बक्षीसात भरघोस वाढ

राज्य सरकार सातत्याने खेळ आणि खेळाडूंच्या पाठिशी राहिले आहे. चीनमधल्या, आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलेल्या, राज्याच्या खेळाडूंना १ कोटी रुपयांचे आणि मार्गदर्शकाला १० लाख रुपयांचं बक्षीस देण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. त्याचा शासन आदेश निर्गमित केला आहे. आशियाई स्पर्धेतल्या रौप्यपदक विजेत्या खेळाडूला ७५ लाख रुपये आणि मार्गदर्शकाला ७ लाख ५० हजार रुपये मिळणार आहेत. कांस्यपदक विजेत्या खेळाडूला ५० लाख आणि मार्गदर्शकाला ५ लाख रुपयांचे रोख बक्षीस देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.  स्पर्धेत भाग घेणाऱ्या सहभागी खेळाडूंना, चांगली तयारी करता यावी म्हणून, प्रोत्साहनपर १० लाख रुपये देण्याचा निर्णयही आपण घेतला आहे, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. आशियाई क्रीडा स्पर्धेतील सांघिक क्रीडा प्रकारात सुवर्ण पदकाची कमाई केलेल्या खेळाडूस ७५ लाख, मार्गदर्शकास ७ लाख ५० हजार, रौप्यपदक विजेत्या खेळाडूस ५० लाख, मार्गदर्शकास ५ लाख तर कांस्यपदक विजेत्या खेळाडूस २५ लाख, मार्गदर्शकास २ लाख ५० हजार रूपये देण्यात येणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.

Continue reading

संपात उतरणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई!

विविध प्रलंबित मागण्यांसाठी उद्या म्हणजेच २१ एप्रिलपासून बेमुदत संप पुकारण्याबाबत राज्य सरकारी, निमशासकीय कर्मचाऱ्यांनी शासनास नोटीस दिली असून, या पार्श्वभूमीवर या संपामध्ये सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा शासनाने दिला आहे. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, राज्य सरकारी गट‑ड (चतुर्थ श्रेणी)...

२४ एप्रिलपर्यंत राज्यात वादळी पाऊस, गारपीट व विजांचा इशारा

भारतीय हवामान खात्याच्या आज जाहीर केलेल्या अंदाजानुसार, राज्यातील विविध भागांत २४ एप्रिलपर्यंत वादळी वारे, विजांचा कडकडाट, गारपीट आणि पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. विशेषतः मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि कोकण विभागातल्या जिल्ह्यांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने केले आहे. या पार्श्वभूमीवर...

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उद्यापासून जर्मनीच्या दौऱ्यावर

इराण आणि अमेरिकेतला संघर्ष तीव्र होत असतानाच तसेच नाटो संघटनेतल्या युरोपीय राष्ट्रांची यावरील भूमिका महत्त्वाची ठरत असतानाच भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उद्यापासून 23 एप्रिलपर्यंत तीन दिवसांच्या जर्मनीच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यादरम्यान, संरक्षण मंत्री त्यांचे जर्मनीतील समकक्ष बोरिस...
Skip to content