पडद्यावर आलेल्या चित्रपटांपेक्षा तेथे पोहचू न शकलेल्या चित्रपटांच्या गोष्टी एकदम भारी. ताजे उदाहरण २०२१च्या “चकदा एक्स्प्रेस” या चरित्रपटाचे. भारतीय महिला क्रिकेट संघातील झुलेन गोस्वामी हिच्या आयुष्यावर आधारित हा चरित्रपट आहे. अतिशय गरीब कुटुंबातील ही युवती अतिशय मेहनतीने आणि संघर्षातून स्थानिक पातळीवरील क्रिकेटपासून भारतीय क्रिकेट संघाचा भाग झाली. आदर्श ठरावा असा चरित्रपट महत्त्वाचा. विशेष उल्लेखनीय गोष्ट अनुष्का शर्मा या चित्रपटाची निर्माती आणि शीर्षक भूमिकेत आहे. विराट कोहलीच्या पत्नीने महिला क्रिकेटपटूच्या आयुष्यावर आधारित चित्रपट निर्मिती करावी हेच केवढे तरी कौतुकाचे. हीच ब्रेकिंग न्यूज म्हणायचे. विशेष म्हणजे ही गोष्ट रेणुका शहाणेच्या सोशल मीडियातील पोस्टमुळे समजली. या चित्रपटात रेणुका शहाणेचा लूक अगदी वेगळा आहे आणि तिने तो फोटोदेखील पोस्ट केला आहे.

एखादा कलाकारच खुद्द आपल्या अशा पडद्यावर येऊ न शकलेल्या चित्रपटातील आपला लूक आणि त्या चित्रपटाबाबत पोस्ट करतो तेव्हा ते विशेष उल्लेखनीय. सोशल मीडियावर अशा अनेक दुर्मिळ गोष्टी समजतात. रेणुका शहाणेसारखे बुद्धीवादी कलाकार माध्यमाचा योग्य सदुपयोग करतात तो असा. चित्रपटाच्या जगात घोषणा झालेला, मुहूर्त झालेला, दोन-चार रिळांचे चित्रिकरण झालेला, इतकेच नव्हे तर तब्बल पंधरा-सोळा रिळे तयार असलेला, अगदी पूर्ण झालेला, इतकेच नव्हे तर सेन्सॉर संमत झालेला, असा चित्रपट निर्मितीच्या विविध स्तरांवर “थांबलेला” चित्रपट, हा चक्क चित्रपट निर्मितीमधील एक भाग आहे. यांची संख्या मोजता न येणारी. खुद्द कलाकारही आपले असे “न आलेले चित्रपट” सांगू शकणार नाहीत. काहींना पडद्यावर न आलेल्या कामाचे पैसे मिळाले असतीलही, तर काहींचे बुडालेही असतील. त्यातील काही चित्रपट तरी पडद्यावर आले असते तर चित्रपटाचा इतिहास बदलला असता.

असाच एक घोषणेवरच शेवट झालेला चित्रपट चित्रपट, “रिश्वत”. सत्तरच्या दशकाच्या उत्तरार्धातील ही गोष्ट. राज खोसला दिग्दर्शित या चित्रपटात देव आनंद, टीना मुनिम, राकेश रोशन आणि अमरीश पुरी यांच्या प्रमुख भूमिका. राज खोसला यांनी कायमच विविधता दाखवली. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या सी. आय. डी. (१९५६), काला पानी (१९५८), बम्बई का बाबू (१९६०) आणि यानंतर अनेक वर्षांनी शरीफ बदमाश (१९७३) या चित्रपटात देव आनंद अशी ही जमलेली जोडी. आणि राज खोसला गुन्हेगारी पार्श्वभूमीवरचे चित्रपट टर्न आणि ट्विस्ट यांचा मेळ घालत खुलवत. त्यांचा “रिश्वत” पडद्यावर यायला हवा होता. तसा या जोडीच्या “तिजोरी” या चित्रपटाचा फिल्मिस्तान स्टुडिओत मुहूर्तही झाला. स्क्रीन साप्ताहिकात पानभर जाहिरात आली. पण हाही चित्रपट त्या जाहिरातीत राहिला. त्या काळातील आघाडीचे निर्माते मुशीर रियाज हे या चित्रपटाचे निर्माते असूनही पुढील प्रगतीसाठी हिरवा कंदील मिळाला नाही. त्या काळातील हे खूप मोठे निर्माते.

अमिताभ बच्चनचे जवळपास पंचेचाळीस-पन्नास चित्रपट असेच पडद्यावर येऊ शकले नाहीत. खुद्द अमिताभला तरी आपण रुद्र, आलिशान, राम की गीता श्याम की सीता, लंबू दादा, शिनाख्त अशा नावाच्या चित्रपटांतून भूमिका साकारत होतो हे आठवत असेल का? पडद्यावर येऊ न शकलेल्या चित्रपटांवर निर्माता, दिग्दर्शक, पटकथालेखक आणि कलाकारांनी बोलायला हवे, खूपच रंजक आणि एक्सलुझिव्ह गोष्टी समोर येतील. एकूणच काय कधी जेवण तयार आहे, पण ताटात न पडता थंड पडतेय अथवा शिळे होतेय…
(लेखक दिलीप ठाकूर ज्येष्ठ सिने पत्रकार आणि समीक्षक आहेत.)

