HomeArchiveगडकरींची `घराणेशाही’

गडकरींची `घराणेशाही’

Details
गडकरींची `घराणेशाही’

    03-Apr-2019

| 0

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

नरेंद्र वि. वाबळे, संपादक, शिवनेर
narendrawable@rediffmail.com
राजकारणात घराणेशाहीला आता खूप महत्त्व प्राप्त झाले आहे. राजकारण हा एक व्यवसाय बनला आहे. त्यामुळे राजकारणातील घराण्यांना प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे स्वरूप आले आहे. पन्नास, साठ आणि सत्तरच्या दशकात असे चित्र नव्हते. पं. जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान. त्यांची लोकप्रियता अफाट होती. इंदिरा गांधी या त्यांच्या एकुलत्या एक कन्या. त्या पित्याबरोबर सावलीसारख्या राहत. त्यामुळे केवळ निरीक्षणातून इंदिराजी राजकारण शिकत गेल्या. पण आपल्या कन्येने पुढे आपल्या जागी पंतप्रधान व्हावे, असे कधी पंडितजींना वाटले नाही. त्यांनी तसे प्रयत्नदेखील केले नाहीत. पंडितजींच्या निधनानंतर लालबहादूर शास्त्री हे पंतप्रधान झाले. त्यांनीच आग्रहाने इंदिरा गांधींना आपल्या मंत्रिमंडळात माहिती, प्रसारण आणि नभोवाणी मंत्री केले. त्यात पंडितजींचा अर्थातच हात नव्हता. लालबहादूर शास्त्री यांनीदेखील आपल्या कोणत्याही मुलाला राजकारणाचे धडे दिले नाहीत. स्वत: पंतप्रधानपदापर्यंत पोहोचूनदेखील आपल्या मुलांना सत्तेत कोठेही स्थान दिले नाही. महाराष्ट्राचे भाग्यविधाते यशवंतराव चव्हाण हेदेखील याच मालिकेतील आदर्श राजकीय नेते होय. यशवंतरावजींना मूलबाळ नव्हते. पण त्यांचे सख्खे पुतणे त्यांना पोटच्या मुलांप्रमाणे होते. त्यांच्यावर त्यांनी नितांत प्रेम केले. पण एकाही पुतण्याला राजकारणात आणले नाही. घराणेशाहीला त्यांनी प्रोत्साहन दिले नाही. सारांश, पूर्वीचे राजकीय नेते हे असे होते. नि:स्वार्थ, प्रामाणिक आणि स्वच्छ हातांचे.

या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या `घराणेशाही’कडे पाहूया. गडकरी हे रोखठोक बोलण्याच्या बाबतीत विख्यात आहेत. ते आत एक आणि बाहेर एक असे बोलत नाहीत. जे बोलतात त्यावर ठाम राहतात. आपण हे बोललोच नाही असे ते कधी करत नाहीत. नागपुरात आयोजित केलेल्या एका प्रचारसभेत नितीन गडकरी घराणेशाहीवर जे बोलले ते अतिशय स्तुत्य असे होते. गडकरी म्हणाले, `मी घराणेशाहीच्या विरोधात आहे. आमची मूलबाळं निवडणुका लढली तर मग कार्यकर्त्यांनी काय करायचे?’ गडकरी यांच्या या विधानामुळे भाजपच्या तळागाळातील कार्यकर्त्यांच्या गळ्यातील ते ताईत बनल्यास आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. गडकरींच्या घराणेशाही संदर्भातील विधानाचा अर्थ फार व्यापक आहे. गडकरी आपल्या रक्ताच्या नातेवाईकांना राजकारणात आणण्यास अनुकूल नाहीत. त्यामुळे पक्षाच्या सच्चा कार्यकर्त्यांवर अन्याय होईल याची त्यांना जाणीव आहे. पण पक्ष हेच आपले `घराणे’ गडकरींनी मानले आहे. त्यामुळे या घराण्यातील मंडळी सत्तेच्या राजकारणात यावीत, अशी त्यांची इच्छा आहे. नितीन गडकरींची ही `घराणेशाही’ अतिशय आदर्श आणि स्तुत्य म्हणावी लागेल. पक्ष काही मूठभर नेत्यांमुळे चालत नसतो. तो कार्यकर्त्यांच्या बळावर उभा राहतो. पण एकदा सत्तेत गेल्यावर नेते कार्यकर्त्यांना विसरतात. मोक्याच्या जागी आपल्या नातेवाईकांना बसवितात. तेथेच पक्षाची अधोगती सुरू होते.

जे पक्ष मोठा मानून राजकारण करतात, ते इतिहासात अमर होतात. उदा. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते काकासाहेब गाडगीळ हे पुण्याचे होते. ते पेशाने वकील होते. पण काँग्रेसमुळे ते केंद्रात मंत्री झाले आणि राज्यपालदेखील झाले. मात्र त्यांचे पाय सदैव जमिनीवर राहिले. म्हणूनच ते सदैव म्हणत की, `काँग्रेस वजा काकासाहेब गाडगीळ म्हणजे पुण्यातील एक साधा वकील.’ नितीन गडकरीदेखील आपल्या पक्षाचे महत्त्व जाणतात. पक्षातील कार्यकर्त्यांच्या कार्याचे चीज झाले पाहिजे असे ते मानतात. म्हणूनच ते पक्षाच्या `घराणेशाही’चा पुरस्कार करतात. सर्वच नेत्यांनी गडकरींप्रमाणे कार्यकर्त्यांचा विचार केला तर किती बरे होईल!”
 

Continue reading

इराकमधून अमेरिकेची संपूर्ण सैन्यवापसी!

अमेरिकेने इराकमधून आपले सर्व सैन्य माघारी बोलावण्याचा निर्णय घेतला असून, ३० सप्टेंबर २०२६पर्यंत सर्व अमेरिकन सैनिक मायदेशी परततील. इराकचे पंतप्रधान मोहम्मद शिया अल-सुदानी आणि अमेरिकन सेंट्रल कमांड यांच्यात झालेल्या चर्चेनंतर या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. या माघारीमुळे २००३मध्ये...

केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा रुग्णालयात दाखल

भारतीय जनता पक्षाचे (भाजप) माजी राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय आरोग्य तथा कुटुंब कल्याण मंत्री जे. पी. नड्डा यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना तातडीने दिल्लीतील एम्स (AIIMS) रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काल, १३ ऑगस्टच्या सायंकाळी जे. पी. नड्डा यांना अचानक...

फेसबुक, इन्स्टाग्रामला ५,४०० कोटींचा दंड

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचा लहान मुलांवर आणि त्यांच्या मानसिक आरोग्यावर होणारा गंभीर परिणाम लक्षात घेता, अमेरिकन न्यायालयाने 'मेटा' (फेसबुक आणि इन्स्टाग्रामची मूळ कंपनी) ला मोठा दणका दिला आहे. मुलांच्या सुरक्षेशी तडजोड केल्याप्रकरणी, त्यांच्या मानसिक आरोग्याला हानी पोहोचवल्याप्रकरणी आणि गोपनीयतेच्या उल्लंघनाबाबत...
Skip to content