Homeटॉप स्टोरीउद्धव ठाकरे येणार...

उद्धव ठाकरे येणार घायकुतीला?

मुंबई महापालिकेतल्या गेल्या काही वर्षांच्या काराभाराची चौकशी करण्यासाठी पोलिसांची एसआयटी नेमण्याला काही तास उलटत नाहीत तोच आज ईडीने उद्धव ठाकरे कुटुंबियांच्या जवळच्या माणसांच्या जागांवर धाडी टाकल्यामुळे उद्धव ठाकरे गोत्यात आल्याची चर्चा वेग धरू लागली आहे. त्यातच राज्य सरकारने ठाकरे कुटुंबाचे पोलीस संरक्षण कमी केल्यामुळे घायकुतीला येणार का, अशी चर्चा सध्या सुरू झाली आहे.

मुंबई महापालिकेच्या कारभारावर कॅगने अलीकडेच ताशेरे ओढले होते. सुमारे साडेबारा हजार कोटींच्या कामात मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचा ठपका कॅगने (महालेखापाल) ठेवला होता. या ताशेऱ्यांची दखल घेत राज्य सरकारने दोन दिवसांपूर्वीच पोलिसांचे विशेष तपास पथक (एसआयटी) नेमले. हे पथक आपले काम सुरू करत नाही तोच आज कोव्हिड सेंटरच्या कथित घोटाळाप्रकरणी अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) दहा ठिकाणी धाडी टाकल्या. यामध्ये आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय सूरज चव्हाण, संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजीत पाटकर यांचा समावेश आहे. पाटकर यांच्या निवासस्थानी छापेमारीच्या वेळी राऊत समर्थकांनी त्यांना विरोध करण्याचाही प्रयत्न केल्याचे समजते. संजीव जैस्वाल, नितीन गुरव, संजय शाह यांच्या घरीही ईडीची छापेमारी सुरू आहे. कोव्हिड सेंटर बनवण्यासाठी वापरलेल्या साहित्यात घोटाळा केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

दरम्यान यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात प्रसारमाध्यमांकडे आपले मत व्यक्त केले. नेमकी काय कारवाई सुरू आहे याबद्दल मला माहिती नाही. पण ज्यावेळी मुंबई महापालिकेत कोविड सेंटर सुरू करण्यात आले आणि त्यातील घोटाळा समोर आल्यानंतर धक्कादायक माहिती हाती आली होती. कशाप्रकारे कोणताही अनुभव नसणाऱ्या कंपन्या तयार झाल्या आणि लोकांच्या जीवाशी खेळण्यात आले, त्यातून कसे मृत्यू झाले याची सर्वांना कल्पना आहे. पुण्यात तर एका पत्रकाराचा मृत्यू झाला. त्यामुळे चौकशी सुरू होती. आता ती कुठपर्यंत पोहोचली आहे, छाप्यात काय मिळाले आहे याची मला कल्पना नाही, असे ते म्हणाले.

उद्धव ठाकरेंच्या सुरक्षाव्यवस्थेत कपात

दरम्यान, राज्य सरकारने ठाकरे कुटुंबियांच्या सुरक्षाव्यवस्थेत कपात केली आहे. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे, तेजस ठाकरे यांची सुरक्षाव्यवस्था कमी करण्यात आली आहे. तसेच मातोश्रीवर असलेल्या सुरक्षारक्षकांच्या संख्येतही कपात करण्यात आली आहे. उद्धव ठाकरे यांच्या सुरक्षा ताफ्यातील एक एस्कॅार्ट गाडी तसेच पायलट गाडीही कमी करण्यात आली आहे. मातोश्रीवर असलेली राज्य राखीव पोलीस दलाची (एसआरपीएफ) सुरक्षा काढून टाकण्यात आली आहे. त्यांना असलेली झेड प्लस सुरक्षा आता वाय प्लस दर्जाची करण्यात आली आहे. राज्याच्या गृह विभागाने हा आदेश दिला आहे. गृह विभागाच्या अखत्यारीतील एक समिती वेळोवेळी विविध महत्त्वाच्या व्यक्तींना असलेल्या धोक्याची तीव्रता अभ्यासत असते. त्यानंतर आवश्यकतेनुसार त्यांच्या सुरक्षाव्यवस्थेत वाढ वा कमतरता करत असते. त्यानुसारच ठाकरे कुटुंबाच्या सुरक्षाव्यवस्थेत फेरबदल करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

Continue reading

शिक्षणतज्ज्ञ प्राचार्य डॉ. सुनिता कामटे सेवानिवृत्त

मुंबईतल्या बोरीवली पूर्व येथील सुविद्या प्रसारक संघाच्या श्री मंगुभाई दत्ताणी विद्यालय आणि योजना कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या शिक्षणतज्ज्ञ डॉ. सुनिता कामटे आपल्या ३३ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर नुकत्याच सेवानिवृत्त झाल्या. याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सुविद्या प्रसारक संघाचे अध्यक्ष शिक्षणतज्ज्ञ महादेव रानडे...

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सुरेखा पुरंदरे यांचे देहावसान

मुंबईतल्या दादर माटुंगा कल्चरल सेंटरच्या सल्लागार सदस्या तसेच दादर वनिता समाज, या प्रतिष्ठित संस्थेच्या ज्येष्ठ सदस्या सुरेखा पुरंदरे यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले. त्या ९१ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. शास्त्रीय संगीतात...

प्राध्यापक डॉक्टर भ्रष्टाचारी? जे. जे. रुग्णालयात खळबळ!

मुंबईतील प्रसिद्ध जे. जे. रुग्णालयाच्या अस्थिरोगशास्त्र (आर्थॉपेडिक्स) विभागात एका वरिष्ठ प्राध्यापकाविरुद्ध अत्यंत गंभीर आणि धक्कादायक आरोप झाल्यामुळे वैद्यकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. प्रा. डॉ. नितीन महाजन यांच्यावर निवासी डॉक्टरांचा मानसिक व आर्थिक छळ करणे, बनावट सह्या करणे आणि...
Skip to content