सर्वोच्च न्यायालयाने कायम केलेले ३७० कलम हटवण्याचा विषय असो की उद्धव ठाकरे यांची विधानपरिषदेतील उपस्थिती, मुख्यमंत्री एकनाथ शिन्दे आणि उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी दोन्ही विषयात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्याची संधी सोडली नाही. ते विधिमंडळात आले हे काय कमी आहे, अशा शब्दांत ठाकरेंची खिल्ली उडवली गेली.
समुद्रात ट्रॅक्टर चालवणारा मुख्यमंत्री, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिन्दे यांची संभावना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. पत्रकारांशी बोलताना ठाकरे यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर ही टीका केली. त्याला प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री शिन्दे म्हणाले की, त्यांना ट्रॅक्टर कसा असतो, हे माहीत नाही. वास्तविक, मुंबईतील समुद्रकिनाऱ्याची स्वच्छता करणाऱ्या संस्थेच्या मोहिमेत गेलो असताना मी त्या विशिष्ट यंत्रावर बसून समुद्रातील घाण जाळीने काढण्याचे काम उद्घाटन करताना केले. हे यंत्र वेगळे आहे. पण उद्धव ठाकरे यांना ते ट्रॅक्टर वाटले. त्यांनी टीका करण्यापूर्वी मशिनची नीट माहिती घ्यावी, इतकेच मी त्यांना सांगेन. बाकी, घरी बसून काम करणारा मुख्यमंत्री हवा की फील्डवर जाऊन काम करणारा, हे जनतेनेच ठरवायचे आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
उद्धव ठाकरे विधिमंडळात आले आणि ते दोन दिवस विधानपरिषदेच्या कामकाजात सहभागी होणार आहेत, असे सांगून एका टीव्ही पत्रकाराने प्रतिक्रिया विचारली असता उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस उत्तरले, अहो उद्धव ठाकरे विधिमंडळात आले, हे काय कमी आहे? किती आनंदाची गोष्ट आहे, उद्धवजी आले, अधिवेशनात आले. प्रत्यक्ष येऊन बसले हे काय कमी आहे. पण, किती दिवस आले याचा हिशेब तुम्ही लावा.. पण आले हे काय कमी आहे. त्यावर मी फार काही बोलणार नाही, असे म्हणत म्हणत फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांची खिल्ली उडवली.

याच विषयावर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिन्दे म्हणाले की, हे महाराष्ट्रातील लोकांनी ठरवायचे आहे की त्यांना घरात बसून काम करणारा मुख्यमंत्री हवाय की फील्डवर उतरून काम करणारा…
घटनेचे ३७० वे कलम हटवण्याच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावर प्रतिक्रिया देताना फडणवीस यांनी या निर्णयाचे स्वागत करून पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांचे अभिनंदन केले. उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना ते म्हणाले की, हिन्दूहृदयसम्राट दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची ३७० कलम हटवावे, ही मागणी होती आणि अयोध्येत राम मंदिर व्हावे, हीदेखील त्यांची भूमिका होती. ही दोन्ही कामे पंतप्रधान मोदी यांनी केली आहेत. पण बाळासाहेब ठाकरे यांच्या भूमिकेशी विपरित भूमिका घेणाऱ्या लोकांबरोबरच उद्धव ठाकरे बसल्याने त्यांना या विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही.
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे स्वागत करताना मुख्यमंत्री शिन्दे यांनीही पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांचे अभिनंदन केले. तसेच, इतर राज्यातील विधानसभा निवडणुकांमध्येही मोदीजी की ग्यारन्टी यावर लोकांचा विश्वास असल्याचे दिसून आले आहे, हे लक्षात घेण्याचा सल्लाही त्यांनी विरोधकांना दिला.

