Homeमाय व्हॉईसपोलीस काय भांगेची...

पोलीस काय भांगेची गोळी लावून असतात?

अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या अकाली मृत्यूनंतर बराच गदारोळ झाला. कोणी म्हणतात आत्महत्त्या, तर कोणाला वाटतो खून. अखेर तपासासाठी राष्ट्रीय तपास यंत्रणा मैदानात उतरतात. तरीही आता सुमारे दोन वर्षे होत आली तरी घोळ काही संपलेला नाही. सुशांतच्या मृत्यूनंतर अंमली पदार्थाचे सेवनही बरेच चर्चेत आले होते. सुशांत अंमली पदार्थांच्या आधीन झाला होता हेही तपासात उघड झाले होते. त्यानंतर अंमली पदार्थ प्रतिबंधक राष्ट्रीय तपास यंत्रणाही मैदानात उतरली होती. आता फिल्म जगतातील अंमली पदार्थ सेवन करणाऱ्यांचे आणि त्यांना पुरवठा करणाऱ्यांचे काही खरे नाही म्हणून ढोलही बडवण्यात आले. परंतु या तपास यंत्रणेने अगदीच चिल्लर माणसे ताब्यात घेऊन संपूर्ण तापसाचेच हसे करून घेतले.

त्यांनी अनेकांना अटक केली हे खरे असले तरी खरे मोठे पुरवठादार मात्र तपास यंत्रणांच्या जाळ्याबाहेरच राहिले ही वस्तुस्थिती आहे. त्यांनी अगदी गाजावाजा करून मुच्छड पानवाल्यालाही पकडले. काही अभिनेत्यांच्या नातेवाईकांनाही जेरबंद केले. अनेक नामवंत चित्रपट अभिनेते आणि अभिनेत्रीचे जाबजबाब नोंदविले. म्हणजेच गेल्या सुमारे दोन वर्षांपासून जवळजवळ सर्वच राष्ट्रीय तपास यंत्रणा मुंबईत तळ ठोकून असतानाही काल मध्यरात्रीनंतर उशिरा भर समुद्रात उभ्या, गोव्याकडे कूच करण्याच्या बेतात असलेल्या एका आलिशान जहाजावर धाड टाकून अनेकांना जेरबंद करण्यात आले.

तपास यंत्रणांनी हे काम चांगले केले असले तरी एका वेगळ्या अर्थाने तपास यंत्रणांची छिथूच झालेली आहे, असेच मानावे लागेल. जेरबंद करण्यात आलेल्यांमध्ये मेगा स्टार शाहरुख खान यांचा मुलगा आर्यन आणि त्याचे काही मित्र तसेच दिल्लीतील उद्योगपतींच्या मुलींचा समावेश आहे. शाहरुखचा मुलगा असल्याने सर्वच माध्यमांना चमचमीत खाद्यंच मिळाले. मग शाहरुखच्या बाबा आदमच्या काळातील मुलाखती प्रसार करण्याचा काहींनी झपाटाच सुरू केला. आर्यन लहान असताना शाहरूख काहीशा थट्टेने काय म्हणाला होता हे तिखटमीठ लावून सांगण्यात येऊ लागले. या सर्वात एक गोष्ट विसरली जात आहे ती अशी की, तपास यंत्रणा शहरात हजर असतानाही अंमली पदार्थांचा आमचा धंदा आम्ही सर्वांना फाट्यावर मारून करत आहोतच.




आलिशान जहाजावरील पार्टीत अंमली पदार्थ सेवन केल्याच्या आरोपावरून आर्यन आणि त्याच्या मित्रांना अटक केली तेव्हा..

हा मस्तवालपणा केंद्र व राज्य सरकारने गांभीर्याने घेण्याची वेळ आली आहे. हा मस्तवालपणा या अंमली पदार्थ विक्रेत्यांमध्ये कशामुळे येतो? अर्थात दोन्ही सरकारांतील त्यांच्या गॉडफादरमुळे येतोच येतो, असा समज कोणी करून घेतला तर त्यात चूक ते काय? काय योगायोग आहे पाहा. ओटीटीवर दोन दिवसांपूर्वीच एक थी बेगम, या सिरीजचा दुसरा भाग  प्रदर्शित झाला आहे. त्यातील काही भागाचे साम्य आढळले इतकेच.. त्यातही अंमली पदार्थांची विक्री, त्यातून मिळणारा अमाप पैसा, त्या पैशावर गुंड टोळ्यांना झुंजत ठेवणे आदी प्रसंग अगदी खरे वाटावे असे चित्रित केलेले आहेत. त्यामुळेच अंमली पदार्थांच्या विक्री आणि पुरवठादारांवर काहीच कारवाई होत नसल्याचे उगाचच मनात आले. मुंबई पोलिसांची यंत्रणा आणि राष्ट्रीय तपास यंत्रणा मुंबई आणि आसपासच्या भागात तैनात असताना शहरातील नामवंत हॉटेल्स, पंचतारांकांकित हॉटेल्समधील डान्स फ्लोअर, जोगेश्वरीचा फिल्टरपाडा परिसर, नवी मुंबईतील तारांकित हॉटेल्स, शाळा बंद आहेत म्हणून काही परिसरातील औषध दुकानदार, मुंबई-ठाण्यातील अनेक छोट्यामोठ्या पानाच्या टपऱ्या, वाण्याच्या दुकानात मिळणाऱ्या काही विशिष्ट गोळ्या व चॉकलेट्स, आदी वस्तू मुबलक प्रमाणात मिळत असताना पोलीस वा अंमली पदार्थ प्रतिबंधक विभाग काय झोपा काढत असतात? मी राहतो त्या ठाण्याच्या ढोकाली भागातही अंमली पदार्थयुक्त सिगारेट्स सहज मिळू शकतात. याचाच अर्थ अंमली पदार्थांनी आपल्या समाजाला विळखाच घातलेला दिसतो.

मुंबई, ठाण्यातील हुक्का पार्लरमध्ये तर हमखास अंमली पदार्थ मिळतात. मुंबई, ठाणे, नवी मुंबईत ज्या-ज्या ठिकाणी डान्स फ्लोअर आहेत, तेथे अंमली पदार्थाचा एक झुरका घेतल्याशिवाय तरुणाईचे पाय थिरकतच नाहीत आणि एकदा का तो झुरका घेतला की पहाटेपर्यंत ब्रह्मानंदी टाळी लागावी तसे पाय थिरकतच राहतात. हे विस्ताराने अशासाठी लिहिले की, माझ्यासारख्या सामान्य माणसाला जर इतकी माहिती मिळू शकते तर पोलिसांच्या विशेष शाखा काय भांगेची गोळी लावून झोपतात काय?

तपास यंत्रणा जर अंमली पदार्थ विक्रीच्या गॉडफादरचा वेध घेऊ शकत नसतील तर माध्यमांच्या प्रतिनिधींना अंगुलीनिर्देश करा, वा संशयाची सुई कोणाकडे वळते आहे ते तरी नेत्रकटाक्षाने सूचित करा.. आणि हो.. ते अंमली पदार्थांबाबतचे कायदेही जरा बदला म्हणे एका व्यक्तीला 20 किलो गांजा आणायची परवानगी आहे. आणि समजा 50 जणांची टोळी वेगवेगळ्या मार्गाने आली, गेली तर तुमच्या कायद्याचे काय हो? असले पुचाट कायदे चुलीत घाला.. हो. आज अचानक नामदेव ढसाळ आठवला..

“हे मुंबई!

तुझा इंद्राचा दरबार क्षत पडलेला

लोभ, मत्सर, द्वेष, वासनेचा गाळ

रंभा, मेनका, अप्सरा यांच्या पायातला चाळ

शाप, उ:शापाने भरलेली तुझी यक्ष नगरी

आता नगरी नगरी, द्वार द्वार, माणसाला कुठे शोधू?

Continue reading

न्यायमूर्तींचे निरीक्षण मोदी सरकारच्या अंगाशी!

अखेर अडीच-तीन महिन्यांच्या घोळानंतर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलाच! त्यासाठी विद्यार्थ्यांना जंतरमंतरवर चार दिवस आंदोलन करावे लागले, लाठीमर खावा लागला. अनेक विद्यार्थ्यांना तर दिल्ली पोलिसांनी बदडून काढलेले जनतेने पाहिले. (विद्यार्थ्यांनीही पोलिसांना मारले...

‘य. दि.’ स्मरणाच्या निमित्ताने दिसली मुणगेकरांची वैचारिक दिवाळखोरी!

यशवंत दिनकर फडके उर्फ य. दि. यांचा पहिला एन्काऊंटर सुमारे 50 वर्षांपूर्वी चर्चगेटजवळील केसी महाविद्यालयात 'बॉम्बे कॉलेज ऑफ जर्नालीझम'च्या वर्गात झाला. त्यांचा विषय अर्थातच राजकारण, खास करून महाराष्ट्रातील राजकारण असा होता. काही काळानेच पत्रकारितेत रीतसर प्रवेश झाल्यावर मात्र विविध...

घाटकोपर पूर्व चकचकित तर, पश्चिम ओंगळवाणे!

मुंबई महापालिका असो, मध्य रेल्वे असो, मेट्रो असो वा अगदी मुंबई प्राधिकरण असो. या सर्व सरकारी यंत्रणानी घाटकोपर स्थानकाच्या पश्चिम परिसरावर धडधडीत अन्याय केल्याचे दोन दिवसांच्या पाहणीत आढळून आले. पूर्वी पूर्व भाग अगदी चिंचोळा होता. तेव्हापासून त्या भागात जाणे...
Skip to content