१३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी सध्या क्रिकेटच्या दुनियेतील सर्वात चर्चेतील चेहरा आहे. आयपीएल २०२६च्या आधी एका पत्रकाराने त्याला विचारलं की, “या हंगामात किती धावा करायच्या आहेत?” यावर वैभवने अगदी शांतपणे, निरागस उत्तर दिलं, “दोन-तीन हजार!” संपूर्ण पत्रकार परिषदेत हास्यकल्लोळ झाला. एका हंगामात टी-ट्वेण्टीमध्ये इतक्या धावा होणं जवळजवळ अशक्य असलं, तरी या निरागस महत्त्वाकांक्षेनेच सगळ्यांचं मन जिंकलं. राजस्थान रॉयल्सच्या या लहानग्या सलामीवीराने आधीच टी-ट्वेण्टीमध्ये सर्वात तरुण शतकवीर होण्याचा विक्रम नोंदवला असून आयपीएलमध्येही त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत.
या आयपीएल हंगामात वैभवसमोर सोपी वाट नाही. तज्ज्ञांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, आता सर्व गोलंदाज त्याचा बारकाईने अभ्यास करून मैदानात उतरतील. त्याच्या खेळातील कमकुवत बिंदू शोधण्यात आले आहेत. माजी क्रिकेटपटू इरफान पठाण याने म्हटलं की, “हा हंगाम वैभवसाठी शिकण्याचा असेल. गोलंदाज आता त्याला सोपे चेंडू टाकणार नाहीत. तो कसा प्रतिसाद देतो, यावर त्याचं भविष्य ठरेल.” राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान पराग मात्र ठाम आहे. त्याने सांगितलं की, वैभवची एकाग्रता आणि खेळातील सातत्य हेच त्याचं सर्वात मोठं बलस्थान आहे. त्याने फक्त स्वतःच्या खेळावर विश्वास ठेवायला हवा.
क्रिकेटच्या इतिहासात असे अनेक युवा तारे आले ज्यांनी पहिल्या वर्षी जग जिंकलं; पण दुसऱ्या वर्षी विरोधी संघांनी त्यांचे होमवर्क केलेले असते. सचिन तेंडुलकर असो किंवा शुभमन गिल. प्रत्येक महान खेळाडूला ही ‘दुसऱ्या हंगामाची परीक्षा’ द्यावीच लागली. वैभव सूर्यवंशीसाठी आयपीएल २०२६ म्हणजे केवळ धावांची स्पर्धा नाही, हे त्याच्या क्रिकेट बुद्धिमत्तेचं, मानसिक खंबीरपणाचं आणि तांत्रिक परिपक्वतेचं खरं व्यासपीठ आहे. “दोन-तीन हजार रन्स” हे स्वप्न असलं, तरी पहिल्या शंभर धावा करताना दाखवलेला संयम, हाच त्याला खरा ‘मोठा खेळाडू’ बनवेल!

