Homeन्यूज अँड व्ह्यूजया निवडणुकीत तुतारी...

या निवडणुकीत तुतारी वाजलीच नाही!

पराजय समोर दिसत असल्याने, तुतारी वाजलीच नसल्यामुळे वैफल्यग्रस्त, निराश आणि हताश झालेले अनिल देशमुखांसारखे नेते खालच्या पातळीवर येऊन संभ्रम निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहेत, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी काल मुंबईत एका पत्रकार परिषदेत केला.

संपूर्ण लोकसभा निवडणुकीत तुतारीचा आवाज कुठेच दिसला नसल्याने ही मंडळी वैफल्यग्रस्त झाली आहेत. अनिल देशमुख आमच्यासोबत येणार होते. त्यांना मंत्रीपद हवे होते. मात्र भाजपने मंत्रीपद देण्यास नकार दिला. त्यामुळेच ते तिथे राहिले, असा गौप्यस्फोट त्यांनी केला. अनिल देशमुख यांनी त्यांच्याबाबतीत माझ्याकडून जे काही सहकार्य झाले त्याची जाण ठेवून वक्तव्य केले असते तर बरे झाले असते. माझी आणि शरद पवार, जयंत पाटील यांची भेट होण्याचे कारणच असू शकत नाही, असे चर्चेला पूर्णविराम देताना सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले.

नाशिक दौऱ्यावर असताना हॉटेलला वॉशरुमसाठी गेलो. तीन-चार मिनिटे थांबलो. सुदैवाने तिथे त्यांच्या कार्यालयात काम करणारा दत्ता नावाचा हेमंत टकले यांच्या गाडीचा चालक भेटला आणि तो रायगड लोकसभा मतदारसंघातील रोहा येथील होता. त्याला शरद पवार यांचा पीए सुनिल रानडे याने फोनवर माझ्या विरोधात मतदान करायला सांगितले असे त्याने बोलताना सांगितले. माझ्या गावात अनेक विकासकामे अदिती तटकरे आणि तुम्ही केली असल्याचे त्याने बोलताना सांगितले. शिवाय ९५ टक्के मतदान तुम्हालाच होणार असल्याचे रानडे यांना ठणकावून सांगितल्याचे दत्ताने सांगितले, असेही ते म्हणाले.

महाराष्ट्रातील अखेरच्या टप्प्यातील नाशिक आणि पालघर या दोन लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची, नाशिकमधील सर्व विधानसभा सदस्यांची बैठक घेऊन प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात पक्षाच्या माध्यमातून करावयाची महत्त्वपूर्ण भूमिका कार्यकर्त्यांसमोर मांडली. गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा झाली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे, गिरीश महाजन यांच्याशीही चर्चा झाली. अखेरच्या टप्प्यात महत्वपूर्ण नियोजन करण्याच्यादृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेस पूर्ण क्षमतेने दोन्ही लोकसभा मतदारसंघात काम करत आहे, असेही तटकरे यांनी सांगितले.

आमचे नेते छगन भुजबळ यांच्याशीही प्रदीर्घ चर्चा झाली असून त्यांच्याकडून या दोन्ही लोकसभा मतदारसंघातील सद्यस्थिती व राजकीय स्थिती आणि निवडणूक नियोजन याची माहिती घेतली. नाशिक आणि दिंडोरी या दोन्ही लोकसभा मतदारसंघात महायुतीला यश मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आज डहाणू येथे पालघर लोकसभा मतदारसंघाची बैठक घेतली. पालघर, वसई विरार येथील पदाधिकारी उपस्थित होते. त्यावेळी पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्यासोबतही चर्चा केली. या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहे. अखेरच्या टप्प्यातही महायुतीला अनुकूल वातावरण असून महायुतीचे उमेदवार चांगल्या मताधिक्याने विजयी होतील असा दावाही तटकरे यांनी केला.

महाराष्ट्रात कॉंग्रेसची वाट बिकट करणारे पृथ्वीराज चव्हाण यांचे वक्तव्य फारसे गांभीर्याने घेण्याची आवश्यकता नाही. त्यांना स्वतःला कधी आपल्या मतदारसंघात फारसे यश मिळवून देता आले नाही. त्यांनी अशा गप्पा करण्याची आवश्यकता नाही, असा टोला सुनिल तटकरे यांनी लगावला.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे, सूरज चव्हाण आदी उपस्थित होते.

Continue reading

शिवसेना खटलाः विधिमंडळ पक्षापेक्षा राजकीय पक्षाचेच वर्चस्व!

शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्हाच्या वादावर उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे गटाच्या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयात बुधवारी, ५ ऑगस्ट रोजी महत्त्वाची सुनावणी पार पडली. या सुनावणीदरम्यान ठाकरे गटाचे ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी तब्बल तीन तास जोरदार युक्तीवाद करत, विधानसभा...

रणजित दळवी, सुनील लवाटे, जान्हवी मुळे आणि स्वदेश घाणेकर यांचा होणार गौरव

मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वतीने क्रीडा पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणार्‍या पत्रकारांना दरवर्षी प्रदान करण्यात येणार्‍या क्रीडा पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यंदा २०२५ आणि २०२६ या दोन वर्षांसाठी ज्येष्ठ आणि युवा अशा दोन गटांतील चार पत्रकारांची पुरस्कारांसाठी निवड...

शिक्षणतज्ज्ञ प्राचार्य डॉ. सुनिता कामटे सेवानिवृत्त

मुंबईतल्या बोरीवली पूर्व येथील सुविद्या प्रसारक संघाच्या श्री मंगुभाई दत्ताणी विद्यालय आणि योजना कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या शिक्षणतज्ज्ञ डॉ. सुनिता कामटे आपल्या ३३ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर नुकत्याच सेवानिवृत्त झाल्या. याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सुविद्या प्रसारक संघाचे अध्यक्ष शिक्षणतज्ज्ञ महादेव रानडे...
Skip to content