Homeमाय व्हॉईसउद्या महाशिवरात्रः जाणून...

उद्या महाशिवरात्रः जाणून घ्या शिवाच्या उपासनेमागील शास्त्र 

उद्या महाशिवरात्र आहे. महाशिवरात्र हे भगवान शिवाचे व्रत आहे. भगवान शिव रात्रीच्या एका प्रहरी विश्रांती घेतात. त्या प्रहराला, म्हणजे शंकराच्या विश्रांती घेण्याच्या काळाला महाशिवरात्र असे म्हणतात. महाशिवरात्र हे व्रत ‘माघ कृष्ण चतुर्दशी’ या तिथीला करतात. या वर्षी महाशिवरात्र 8 मार्च या दिवशी आहे. देशभरात महाशिवरात्र सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. उपवास, पूजा आणि जागरण ही महाशिवरात्र व्रताची 3 अंगे आहेत. शिवाच्या उपासनेच्या अंतर्गत विविध कृती आहेत. शृंगदर्शनामुळे पूजकाला होणारे लाभ, शिवाच्या पिंडीला अर्धप्रदक्षिणा का घालावी? आणि शिवाला बेल वाहण्यामागील शास्त्र याविषयीचे शास्त्रीय विवेचन यासह महाशिवरात्रीचे महत्त्व सनातन संस्थेद्वारा संकलित केलेल्या या लेखात केले आहे.

महाशिवरात्री व्रताचे महत्त्व काय आहे?: भगवान शिव रात्रीच्या एका प्रहरी विश्रांती घेतात. तो काळ पृथ्वीवर वर्षातून एकदा महाशिवरात्र म्हणून साजरा केला जातो, कारण पृथ्वीवरील एक वर्ष म्हणजे स्वर्गलोकातील एक दिवस. पृथ्वी आणि उच्च लोकांतील कालमानात अंतर आहे. पृथ्वी जड (स्थूल) आहे. जडाची गती खूप कमी असते. म्हणजेच जडाला ब्रह्मांडात प्रवास करण्यास जास्त वेळ लागतो. देवता सूक्ष्म असल्याने त्यांची गती जास्त असते. त्यामुळे त्यांना ब्रह्मांडात प्रवास करण्यास कमी वेळ लागतो. यामुळेच पृथ्वी अन् देवता यांच्या कालमानात अंतर आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी शिव सर्व जिवांना आवर्जून मार्गदर्शन करतात. त्यामुळे अनेक जीव शिवाकडून मार्गदर्शन घेण्यासाठी त्या दिवशी शिवलोकात उपस्थित असतात.

महाशिवरात्रीचे व्रत कसे करावे?: महाशिवरात्री व्रताचे दोन प्रकार आहेत– काम्य आणि नैमित्तिक. उपवास, पूजा आणि जागरण ही महाशिवरात्र व्रताची तीन अंगे आहेत. माघ कृष्ण त्रयोदशीला एकभुक्त राहवे. चतुर्दशीच्या दिवशी सकाळी महाशिवरात्र व्रताचा संकल्प करावा. सायंकाळी नदीवर किंवा तळ्यावर जाऊन शास्त्रोक्त स्नान करावे. भस्म आणि रुद्राक्ष धारण करावे. प्रदोषकाळी शिवाच्या देवळात जावे. शिवाचे ध्यान करावे. मग षोडशोपचार पूजा करावी. भवभवानीप्रीत्यर्थ तर्पण करावे. शिवाला एकशे आठ कमळे किंवा बेलाची पाने नाममंत्राने वाहवीत. मग पुष्पांजली अर्पण करून अर्घ्य द्यावे. पूजासमर्पण, स्तोत्रपाठ आणि मूलमंत्राचा जप झाल्यावर शिवाच्या मस्तकावरील एक फूल काढून ते स्वतःच्या मस्तकावर ठेवावे आणि क्षमायाचना करावी.

महाशिवरात्रीच्या रात्री करावयाची यामपूजा!: शिवरात्रीला रात्रीच्या चार प्रहरी चार पूजा कराव्यात, असे विधान आहे. त्यांना ‘यामपूजा’ असे म्हणतात. प्रत्येक यामपूजेत देवाला अभ्यंगस्नान घालावे, अनुलेपन करावे, तसेच धोत्रा, आंबा आणि बेल यांची पत्री वाहवी. तांदुळाच्या पिठाचे 26 दिवे करून त्यांनी देवाला ओवाळावे. पूजेच्या शेवटी 108 दिवे दान द्यावेत. प्रत्येक पूजेतील मंत्र वेगवेगळे असतात, त्यांनी अर्घ्य द्यावे. नृत्य, गीत, कथाश्रवण इत्यादी गोष्टींनी जागरण करावे. पहाटे स्नान करून पुनश्च शिवपूजा करावी. पारण्याला ब्राह्मणभोजन घालावे. आशीर्वाद घेऊन व्रतसमाप्ती करावी. बारा, चौदा किंवा चोवीस वर्षे हे व्रत केल्यावर त्याचे उद्यापन करावे.

शिवाने स्वत: भक्तांना आशीर्वचन दिले आहे, जे महाशिवरात्रीला माझे व्रत करतील, त्यांच्यावर माझी पुढीलप्रमाणे कृपादृष्टी होईल–

1. पुरुषांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील.
2. कुमारिकांना मनासारखा वर मिळेल.
3. विवाहित स्त्रियांचे सौभाग्य टिकेल.

महाशिवरात्रीच्या दिवशी हे अवश्य करा!

1. दिवसभर भगवान शिवाचे नामस्मरण करा.
2. शिवपिंडीला अभिषेक करा.
3. पांढ-या अक्षता, पांढरी फुले, बेल अर्पण करून भगवान शंकराची पूजा करा.
4. भगवान शिवाच्या मंदिरात जाऊन दर्शन घ्या.

महाशिवरात्रीला शिवाचा ‘ॐ नमः शिवाय।’ या षडक्षर मंत्राचा नामजप करा!

महाशिवरात्र या दिवशी शिवतत्त्व नेहमीपेक्षा 1000 पटीने कार्यरत असते. भगवान शिवाची भावपूर्णरित्या पूजा करण्यासह ‘ॐ नमः शिवाय’ हा नामजप जास्तीतजास्त केल्याने त्याची कृपा प्राप्त होते. आपल्याला शिवतत्त्व अधिकाधिक ग्रहण करता येते.

शिवाच्या उपासनेमागील शास्त्र-

शृंगदर्शन (नंदीच्या शिंगांमधून शिवलिंग पाहणे)

शिवाच्या पिंडीतून प्रक्षेपित होणारे तेज हे सर्वसामान्य पूजकाला पेलवणारे नसते. त्यामुळे शिवपिंडीचे दर्शन घेताना ते नंदीच्या दोन्ही शिंगातून घ्यावे असे शास्त्र सांगते.

शृंगदर्शनाची योग्य पद्धत-

वामहस्ती वृषण धरोनि।

तर्जनी अंगुष्ठ शृंगी ठेवोनि।। – श्री गुरुचरित्र, अध्याय 49, ओवी 44

सविस्तर अर्थ: नंदीच्या उजव्या अंगाला बसून किंवा उभे राहून डावा हात नंदीच्या वृषणावर ठेवावा. उजव्या हाताची तर्जनी (अंगठ्याच्या जवळचे बोट) आणि अंगठा नंदीच्या दोन शिंगांवर ठेवावे. दोन्ही शिंगे आणि त्यांवर ठेवलेली दोन बोटे यांच्यामधील पोकळीतून शिवलिंग न्याहाळावे.

शृंगदर्शनाचे लाभ-

शिवाच्या पिंडीतून प्रक्षेपित होणारे तेज सहसा सर्वसामान्य व्यक्‍त‍ीला न पेलवणारे असते. नंदीच्या शिंगांतून प्रक्षेपित होणार्‍या शिवतत्त्वाच्या सगुण मारक लहरींमुळे व्यक्‍त‍ीच्या शरिरातील रज-तम कणांचे विघटन होऊन व्यक्‍त‍ीची सात्त्विकता वाढण्यास साहाय्य होते. त्यामुळे शिवाच्या पिंडीतून बाहेर पडणार्‍या शक्‍त‍ीशाली लहरी पेलवणे व्यक्‍त‍ीला शक्य होते. नंदीच्या शिंगांतून दर्शन न घेताच शिवाचे दर्शन घेतल्यास तेजाच्या लहरींचा आघात झाल्याने शरिरात उष्णता निर्माण होणे, डोके बधीर होणे, शरिराला अचानक कंप सुटणे यासारखे त्रास होऊ शकतात. तसेच पिंडीचे प्रत्यक्ष दर्शन घेताना पिंडी आणि नंदी यांच्यामध्ये उभे न राहता किंवा न बसता, पिंडी अन् नंदी यांना जोडणार्‍या रेषेच्या शेजारी (बाजूला) उभे राहवे.

शिवाच्या पिंडीला अर्धप्रदक्षिणा का घालावी?

शिवाच्या पिंडीला प्रदक्षिणा घालताना शिवपिंडीच्या समोर उभे राहिल्यावर उजवीकडे अभिषेकाच्या पाण्याची पन्हाळी (शाळुंकेचा पुढे नेलेला स्रोत) असते. प्रदक्षिणेचा मार्ग तेथून चालू होतो. प्रदक्षिणा घालताना पन्हाळीपासून स्वतःच्या डाव्या बाजूने पन्हाळीच्या दुसर्‍या कडेपर्यंत जावे. मग पन्हाळी न ओलांडता परत फिरावे आणि पुन्हा पन्हाळीच्या पहिल्या कडेपर्यंत येऊन प्रदक्षिणा पूर्ण करावी. शाळुंकेच्या स्रोतातून शक्ती बाहेर पडत असल्याने सर्वसाधारण भाविकाने तो स्रोत वारंवार ओलांडल्यास त्याला शक्तीचा त्रास होऊ शकतो; म्हणून शिवपिंडीला अर्धप्रदक्षिणाच घालावी. स्वयंभू किंवा घरातील लिंगास हा नियम लागू नाही.

शिवाला बेल वाहण्यामागील शास्त्र-

बेलाची वैशिष्ट्ये-

त्रिदलं त्रिगुणाकारं त्रिनेत्रं च त्रयायुधम्।

त्रिजन्मपापसंहारं एकबिल्वं शिवार्पणम्।। – बिल्वाष्टक, श्लोक १

अर्थ: तीन पाने असलेले, त्रिगुणाप्रमाणे असलेले, तीन डोळ्यांप्रमाणे असणारे, तीन आयुधे असल्याप्रमाणे असणारे आणि तीन जन्मांची पापे नष्ट करणारे असे हे बिल्वदल मी शंकराला अर्पण करतो.

बेल उपडा वाहण्यामागील कारण- बेलाचे पान शिवपिंडीवर उपडे वाहिल्यावर त्यातून निर्गुण स्तरावरील स्पंदने अधिक प्रमाणात प्रक्षेपित होतात. त्यामुळे बेलाच्या पानाचा भाविकाला अधिक लाभ होतो. शिवाला बेल ताजा न मिळाल्यास शिळा चालतो; परंतु सोमवारचा बेल दुसर्‍या दिवशी चालत नाही.

बेलाचे आरोग्यदृष्ट्या असलेले लाभ- आयुर्वेदातील कायाकल्पात त्रिदलरससेवनाला महत्त्व दिले आहे. बेलफळाला आयुर्वेदात अमृतफळ म्हणतात. बेलाने बरा होत नाही, असा कोणताही रोग नाही. कोणतेही औषध न मिळाल्यास बेलाचा वापर करावा; मात्र गरोदर स्त्रीला बेल देऊ नये; कारण त्याने अर्भक मरण पावण्याची शक्यता असते.

संदर्भ: सनातन संस्थेचा ग्रंथ ‘शिव’

संपर्क क्र.: 9920015949 

Continue reading

संपात उतरणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई!

विविध प्रलंबित मागण्यांसाठी उद्या म्हणजेच २१ एप्रिलपासून बेमुदत संप पुकारण्याबाबत राज्य सरकारी, निमशासकीय कर्मचाऱ्यांनी शासनास नोटीस दिली असून, या पार्श्वभूमीवर या संपामध्ये सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा शासनाने दिला आहे. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, राज्य सरकारी गट‑ड (चतुर्थ श्रेणी)...

२४ एप्रिलपर्यंत राज्यात वादळी पाऊस, गारपीट व विजांचा इशारा

भारतीय हवामान खात्याच्या आज जाहीर केलेल्या अंदाजानुसार, राज्यातील विविध भागांत २४ एप्रिलपर्यंत वादळी वारे, विजांचा कडकडाट, गारपीट आणि पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. विशेषतः मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि कोकण विभागातल्या जिल्ह्यांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने केले आहे. या पार्श्वभूमीवर...

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उद्यापासून जर्मनीच्या दौऱ्यावर

इराण आणि अमेरिकेतला संघर्ष तीव्र होत असतानाच तसेच नाटो संघटनेतल्या युरोपीय राष्ट्रांची यावरील भूमिका महत्त्वाची ठरत असतानाच भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उद्यापासून 23 एप्रिलपर्यंत तीन दिवसांच्या जर्मनीच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यादरम्यान, संरक्षण मंत्री त्यांचे जर्मनीतील समकक्ष बोरिस...
Skip to content