Homeटॉप स्टोरीकाँग्रेसच्या मनातली राज्यपालांची...

काँग्रेसच्या मनातली राज्यपालांची भेट, जी ठरलीच नव्हती!

राज्य सरकारकडून शिफारस झालेल्या विधान परिषदेच्या १२ भावी आमदारांचे भवितव्य अजूनही टांगणीलाच आहे. या सदस्यांच्या यादीवर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार असल्याच्या चर्चेला ऊत आला. परंतु राज्य सरकारकडून राज्यपालांची आज भेटही मागण्यात आली नाही आणि राजभवनाकडूनही त्यांना बोलावणे गेले नव्हते, असे संध्याकाळी स्पष्ट झाले.

राज्य सरकारने साधारण आठ महिन्यांपूर्वी राज्यपालांकडे १२ जणांची शिफारस विधान परिषदेच्या सदस्यत्वासाठी केली होती. एकनाथ खडसे, उर्मिला मातोंडकर, सचिन सावंत आदींचा यात समावेश होता. राज्यपालांनी या यादीला अजूनही मान्यता दिलेली नाही. यावर काही जणांनी मुंबई उच्च न्यायालयातही दाद मागितली. न्यायालयानेही राज्यपालांना आम्ही कोणतेही निर्देश देऊ शकत नाही, असे स्पष्ट केले. त्यानंतर गेल्या आठवड्यातच प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत लवकरच राज्यपालांशी चर्चा करणार असल्याचे सांगितले होते.

राज्यपाल

अजित पवार यांच्या या माहितीनंतर काही माध्यमांनी रोज या कथित नियोजित भेटीच्या वृत्तांचा पाठपुरावा चालवला. गुरूवारी काँग्रेसच्या गोटातून राज्यपालांची भेट ठरविण्यात आल्याची माहिती पसरविण्यात आली. त्यामुळेच दूरचित्रवाहिन्यांच्या काही माध्यमांतून आजच्या कथित भेटीचे चित्र रंगविण्यात आले. यासाठी सकाळपासून संध्याकाळपर्यंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच महसूल मंत्री बाळासाहेब थोरात राज्यपालांना भेटायला जाणार असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर फक्त मुख्यमंत्री राजभवनावर जाणार असल्याचे सांगण्यात आले.

सह्याद्री अतिथीगृहातून मुख्यमंत्री निघाल्यानंतर ते राजभवनाकडे रवाना झाल्याचे सांगण्यात येऊ लागले. पण, नंतर ते शिवाजीपार्कच्या दिशेने रवाना झाल्याचे स्पष्ट होताच माध्यमांची एकच धावपळ झाली. राजभवनावर त्यावेळी पुस्तक प्रकाशनाचा समारंभ चालू होता. गोव्याचे दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्यावरील एक मनोहर कथा, नावाच्या पुस्तकाचे प्रकाशन राज्यपालांच्या हस्ते झाले. विधानसभेचे विरोधी पक्षनेते व राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच पुस्तकाच्या लेखिका मंगलाताई खाडिलकर यावेळी उपस्थित होते.

राज्यपाल

तितक्यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यपालांवर निशाणा साधत राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना भेट नाकारल्याचे सांगितले. नंतर उशिरा राज्य सरकारने तशी भेटच मागितली नसल्याचे व राजभवनाकडून मुख्यमंत्र्यांना बोलावण्यातच आले नव्हते, असे स्पष्ट झाले.

मिलिंद नार्वेकर राजभवनावर

या सर्व घडामोडीतच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक आणि शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर राजभवनावर पोहोचले. तेथे त्यांनी राज्यपालांची भेट घेतली अशी चर्चा आहे. मात्र, या चर्चेचा तपशील समजू शकला नाही

Continue reading

रणजित दळवी, सुनील लवाटे, जान्हवी मुळे आणि स्वदेश घाणेकर यांचा होणार गौरव

मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वतीने क्रीडा पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणार्‍या पत्रकारांना दरवर्षी प्रदान करण्यात येणार्‍या क्रीडा पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यंदा २०२५ आणि २०२६ या दोन वर्षांसाठी ज्येष्ठ आणि युवा अशा दोन गटांतील चार पत्रकारांची पुरस्कारांसाठी निवड...

शिक्षणतज्ज्ञ प्राचार्य डॉ. सुनिता कामटे सेवानिवृत्त

मुंबईतल्या बोरीवली पूर्व येथील सुविद्या प्रसारक संघाच्या श्री मंगुभाई दत्ताणी विद्यालय आणि योजना कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या शिक्षणतज्ज्ञ डॉ. सुनिता कामटे आपल्या ३३ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर नुकत्याच सेवानिवृत्त झाल्या. याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सुविद्या प्रसारक संघाचे अध्यक्ष शिक्षणतज्ज्ञ महादेव रानडे...

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सुरेखा पुरंदरे यांचे देहावसान

मुंबईतल्या दादर माटुंगा कल्चरल सेंटरच्या सल्लागार सदस्या तसेच दादर वनिता समाज, या प्रतिष्ठित संस्थेच्या ज्येष्ठ सदस्या सुरेखा पुरंदरे यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले. त्या ९१ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. शास्त्रीय संगीतात...
Skip to content