गेल्या सात-आठ दिवसांपासून पावसाने कहर केला आहे. आधी मुंबईला झोडपले. मुंबईत दरडी कोसळल्या, भिंती पडल्या. पावसाने लोकांचा रोजगार बुडाला. घरांत पाणी शिरून मनस्ताप झाला. नुकसान झाले. आता तोच पऊस त्यापेक्षा अधिक जोराने कोकणात कोसळला आहे. शुक्रवारीही पाऊस थांबण्याची लक्षणे दिसत नाहीत. उलट हतनूरपासून कोयनापर्यंत अनेक धरणे काठोकाठ भरत आल्यामुळे राज्याच्या अनेक भागात पूरस्थिती वाढते आहे.
धरणांतून विसर्ग वाढल्यामुळे नद्यांची पातळी वाढते आहे. कोयनेचे सोडलेले पाणी सांगलीत पूर आणत आहे. पंचगंगाही दुथडी भरून वाहते आहे. कोल्हापूरमध्ये अनेक भागात पाणी शिरले आहे. कृष्णेची सांगतीलीत पातळी 52 फुटांपर्यंत वाढण्याची भीती असून हजारोंना स्थलांतर करण्यास सांगण्यात येते. गोवा महामार्गही पाण्याखाली गेल्यामुळे कोकणात मदत पोहोचणेही अडचणीचे झाले आहे.
महाड तालुक्यातील नाते रोडवर तळीये गावावर गुरुवारी दरड कोसळली. त्यात ३१ घरांचे नुकसान झाल्याचे समजते. ढिगाऱ्याखाली काही जण अडल्याची भीती व्यक्त होत आहे. चिपळूण, महाड शहरांना बेटांचे रूप आले आहे. गुरुवारी मुंबईतून निघालेल्या राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या एनडीआरएफच्या तुकड्यांना मोठी कसरत करतच चिपळूणपर्यंत पोहोचता आले. दहा-दहा फूट पाण्यात अडकलेल्या लोकांसाठी हवाईमार्गेच मदत पोहोचवावी लागत आहे.
इकडे ठाणे जिल्हयातही उल्हास नदीच्या पुरामुळे बदलापूरसह कल्याण तालुक्यातील अनेक गावे जलमय झाली. कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रातील नद्यांनीही धोक्याची पातळी ओलांडल्याने अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली. विदर्भातही अतिवृष्टीने दाणादाण उडवली. अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका अर्थातच चिपळूणला बसला आहे. बुधवारी रात्रभर झालेली अतिवृष्टी, कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग आणि समुद्राला आलेली भरती या तिन्ही घटनांच्या एकत्रित परिणामाने गुरुवारी चिपळूण शहर जलमय झाले.
चिपळूण मुख्य बाजारपेठेत सकाळी ११ वाजता १० फूट पाणी होते. शहरातील बहुसंख्य इमारतींचे तळमजले पाण्यात बुडाले असून, काही ठिकाणी पहिल्या मजल्यांवरील घरांमध्येही तीन ते चार फूट पाणी भरले. अनेक घरांमध्ये छपरापर्यंत पाणी आल्याने शेकडो लोक पाण्यात अडकले. गुरुवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत तालुक्यात तब्बल २०५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. वाशिष्ठी आणि शिव नदीला आलेल्या पुराने शहरातील अनेक भागात पाणी साचले असून अंतर्गत मार्ग बंद झाले आहेत. पुराच्या पाण्यात असंख्य दुचाकी-चारचाकी गाड्या वाहून गेल्या.
तिकडे रायगड जिल्ह्यालाही अतिवृष्टीने झोडपले. सावित्री, गांधारी, काळ आणि नागेश्वरी नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने महाड शहराला पुराने वेढा घातला. बाजारपेठेत आठ ते दहा फूट पाणी होते. संपर्क यंत्रणा कोलमडली असून, सर्व रस्ते बंद आहेत. रात्री उशिरापर्यंत पूर ओसरलेला नव्हता. बिरवाडी आणि महाड औद्योगिक वसाहतीलाही पुराचा फटका बसला. पूर पाहण्यासाठी गच्चीवर गेलेले संजय नारखेडे यांचा इमारतीवरून पडून मृत्यू झाला.

कर्जत, खोपोली, नागोठणे परिसरही जलमय झाले. कर्जत येथे दोन जण पुराच्या पाण्यात वाहून गेले. उल्हास नदीच्या पुराचा फटका बदलापूर, कल्याण तालुक्यातील गावे आणि कल्याण शहराच्या काही भागांना बसला. बदलापूर-कर्जत राज्य मार्ग आणि रेल्वेमार्ग पाण्याखाली गेले होते. शेकडो घरांमध्ये पाणी शिरले. पुरात अडकलेल्या शंभरहून अधिक जणांची राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, अग्निशमन दलाच्या मदतीने सुटका करण्यात आली.
पश्चिम घाटक्षेत्रातही सातारा, पुणे, कोल्हापूर जिल्ह्यांत पावसाने धुमाकूळ घातला. पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून, कोयनासह प्रमुख धरणांतून विसर्ग सुरू करण्यात आल्याने नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात येत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात पंचगंगेसह प्रमुख नद्यांनी गुरुवारी इशारा पातळी ओलांडली असून, त्या धोका पातळीच्या दिशेने वाहत आहेत. जिल्ह्याला महापुराचा धोका निर्माण झाला आहे. जिल्ह्यातील दूधगंगा, वारणा, हिरण्यकेशी, घटप्रभा, वेदगंगा या नद्याही इशारा पातळीपर्यंत पोहोचल्या आहेत. महाबळेश्वर येथे सर्वाधिक ४८० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. जुलैपर्यंत जेमतेम पावसाची नोंद झालेल्या विदर्भातही अतिवृष्टीने दाणादाण उडवली. नद्यांना आलेल्या पुरात चिपळूणप्रमाणेच जीवितहानीच्या बातम्या वर्धा, चंद्रपूर, यवतमाळ अशा जिल्ह्यातूनही येत आहेत. मुसळधार पावसाने विदर्भात जनजीवन विस्कळीत झाले.
हा असा निसर्गाचा प्रकोप सुरू असताना लोकांच्या मनात प्रश्न असा येतोय की इतक्या पावसात कोरोनाचा विषाणू नष्ट होईल का? सध्या कोरोनाचे महाराष्ट्रातीलही आकडे कमी झाल्याचे दिसते आहे. गेल्या आठ दिवसांत सरासरी दहा हजार नव्या रुग्णांवरून आपण सरासरी आठ-साडेआठ हजार नवे रुग्ण दररोज, इतके खाली आलो आहोत. सोमवारी तर सहा हजार नव्या रुग्णांचा आकडा दिसला. पण तो रविवारचा परिणाम असावा. कोरोनाचा काळ सुरू झाल्यापासूनचे सार्वजनिक आरोग्य अधिकाऱ्यांचे हे निरिक्षण आहे की सोमवारचे आकडे नेहमीच कमी भरतात. याचे कारण असेही असावे की शनिवारी व रविवारी राज्यातील अनेक तपासणी केंद्रे बंद राहतात. लोक तपासणी केंद्राकडेही कमी फिरकतात.
देशभरात सध्या रोजचे सापडणारे रुग्ण 32 हजार आठशे इतके आहेत, तर महाराष्ट्रातील संख्या सात हजारांच्या आगे-मागे स्थिरावते आहे. तरीही नव्या रुग्णवाढीत महाराष्ट्राचा क्रमांक अद्यापही वरचाच आहे. सध्या केरळनंतर आपलाच नंबर याबाबतीत लागतो. महाराष्ट्र सध्या देशात क्रमांक दोनचे नवे रुग्ण देणारे राज्य आहे. केरळमध्ये बारा-तेरा हजारांचे आकडे रोजचे येत आहेत. तिसऱ्या क्रमांकावर आंध्र व पाचव्या क्रमांकावर आसाम इथले रोजचे नवे रुग्ण सतरा-अठराशे इतकेच आहेत हे विशेष. राजस्थानमध्ये तर फक्त वीस-बावीस नवे रुग्ण आढळत आहेत.
केरळ आणि महाराष्ट्राचा नव्या रुग्णवाढीतील वाटा सत्तर टक्क्यांच्या जवळ असावा ही चांगली गोष्ट नक्कीच नाही. पण त्याचवेळी आपण लसीकरणात मोठी आघाडी घेत आहोत हेही चांगले लक्षण आहे. महाराष्ट्राची लसीकरण झालेल्या लोकसंख्या सव्वाचार कोटींवर आहे. देशात 41 कोटी 78 लाखांचे लसीकरण पार पडले आहे. जुलै अखेरीपर्यंत पन्नास कोटींच्या लसीकरणाचे उद्दिष्ट आपण पूर्ण नाही करू शकलो तरी त्याच्याजवळ नक्कीच जात आहोत. मात्र, त्यानंतर तरी कोरोनाची अखेर दिसू लागेल का?
वाढत्या पुराच्या पण्यात कोरोनाचा अंत झाला तर तेही आपल्याला परवडेल. खरेतर कोरोना संपणे म्हणजे काय? तर कोरोनामुळे होणारे मृत्यू किमान स्तरावर येणे अन् कोरोनामुळे रुग्णालयात दाखल करावे लागण्याचे प्रमाण किमान पातळीवर येणे. म्हणजेच कोरोनाची अखेर हे आता जगभरात मान्य केले जात आहे. त्या आकड्यांपर्यंत जग पोहोचेल तेव्हा कोरोनाची, “जीवघेणी साथ”, ही भीती संपून जाईल..

