Homeचिट चॅट४० बेवारस मृतदेहांचे...

४० बेवारस मृतदेहांचे ‘वारसदार’ नारायण पारदळे सन्मानित

मुंबईतल्या बोरीवली पश्चिम येथील रेल्वेस्थानकाजवळ गेल्या अनेक वर्षांपासून नारायण पांडुरंग पारदळे वृत्तपत्र विक्रीचा व्यवसाय करीत आहेत. या अनेक वर्षांच्या काळात त्यांनी रेल्वे अपघातातील सुमारे चाळीसहून अधिक बेवारस मृतांच्या पार्थिवावर स्वतः पदरमोड करून अंत्यसंस्कार केले. रेल्वे फलाटावर अनाथ म्हणून वावरणाऱ्यांना सामाजिक व मानवतावादी दृष्टिकोनातून सहकार्य करणाऱ्या पारदळे यांचा नुकताच सत्कार करण्यात आला.

नारायणरावांच्या पत्नी सामाजिक कार्यकर्त्या होत्या. त्यांच्या अकाली निधनानंतर खचून न जाता मुलगा आणि मुलींचा त्यांनी सांभाळ केला. स्वतःच्या प्रकृतीची तमा बाळगली नाही. आर्थिक विवंचनेत असूनही स्वत:ची सामाजिक बांधिलकी कायम ठेवून वयाच्या ७२व्या वर्षीसुद्धा ते कार्यरत आहेत. अशा या नारायण पारदळे यांचा महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे वरिष्ठ अधिकारी आणि वि. स. पागे अध्यासन केंद्राचे संचालक निलेश मदाने यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कवितांगण परिवाराचे प्रमुख, ज्येष्ठ पत्रकार पंकज दळवी, ईशान संगमनेरकर, संदीप बाक्रे आणि प्रबोधन गोरेगावचे अध्यक्ष नितीन शिंदे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला नारायण पारदळे यांची कन्या स्मिता पारदळे जंगम, जावई विजय जंगम आवर्जून उपस्थित होते.

नारायणराव, आपण बोरीवली रेल्वेमार्ग अपघातात मृत आणि जखमींसाठी देवदूत म्हणून सदैव निःस्वार्थ भावनेने उभे असता. आपण वर्तमानपत्र विक्रीचा व्यवसाय करुन या वयातही कुटुंबाची जबाबदारी पार पाडता. स्वतःची आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही पदरमोड करून मृत जखमींसाठी मानवतेच्या दृष्टिकोनातून मदत करीत असता. दिवसेंदिवस लोप पावत असलेली मानवता, समाजातील माणसं जात, धर्म, पंथ, राजकारणातील गटबाजीत विभागत चाललेली असताना तसेच धनदांडगे आर्थिक संपन्न समृद्ध मंडळींचा ‘आपल्याला काय त्याचे?’ अशी कोरडी, स्वार्थी, आत्मकेंद्री वृत्ती यामुळे आपली समाजाप्रती असलेली संवेदनशीलता दीपस्तंभासारखी समाजाला सदैव मार्गदर्शक राहील. आपल्या या महान कार्याकडे पाहून आम्हाला ‘बाबा आमटे’ यांच्या कुष्ठरोगी सेवेची आठवण आल्याशिवाय रहात नाही, अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त करत गोरेगावच्या प्रबोधन क्रीडा भवनात उपस्थितांनी पारदळे यांना सन्मानित केले.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content