Homeब्लॅक अँड व्हाईटआचार्य अत्रे यांनी...

आचार्य अत्रे यांनी जखम होऊ न देता केलेली गुळगुळीत दाढी!

आचार्य उपाख्य प्रल्हाद केशव अत्रे हे मराठी सारस्वताला मिळालेले मोठे देणे आहे. साहित्यिक, पत्रकार, राजकारणी नेता, शिक्षणतज्ज्ञ, अशा बहुविध भूमिका ते लीलया जगले, हे सारा महाराष्ट्र जाणतो. अशा या महान साहित्यकाराच्या लेखणीतून जन्मलेल्या ‘झेंडूची फुले’ या विडंबनात्मक काव्याला 100 वर्षे पूर्ण होत आहेत. या शंभरीनिमित्त ‘झेंडूची फुले’ या कवितासंग्रहाची कविवर्य महेश केळुस्कर यांनी संपादित केलेली आवृत्ती उद्या प्रकाशित होणार आहे. अशोक मुळे यांच्या डिम्पल प्रकाशनातर्फे ही आवृत्ती प्रकाशित केली जात आहे.

‘रला र, टला ट’ जन म्हणे काव्य करणारी या वृत्तीची यथेच्छ टर उडवणारी, टोपी उडवणारी, परंतु त्याचवेळी कुणालाही तुच्छ न लेखणारी ही निर्विश अशी निखळ विनोदी कविता आहे. या कवितामधील विनोदाबाबत खुद्द साहित्याचार्य तात्यासाहेब केळकर म्हणतात- “… प्रस्तुत पुस्तकातील विनोदाचा आस्वाद उत्तमप्रकारे घेऊ शकलो याचे कारण या विनोदाचा अस्सलपणा होय. वृत्तपत्रातून प्रथम या काव्यातील पंक्ती माझ्या अवलोकनातं आल्या तेव्हाच या काव्याचा कर्ता अत्यन्त बुद्धिमान असला पाहिजे असे मी अनुमान काढले होते.”

भरकटलेल्या कल्पनेवर प्रहार

साधारणतः 1925च्या दशकात मराठी काव्य प्रांतात रविकिरण मंडळातील कवीमंडळींचा प्रभाव होता. माधव ज्यूलीयन, यशवंत, कवी गिरीश आदी कवींचा काव्यप्रांतात दबदबा होता. मराठी कवितेत त्यांनी वेगवेगळे प्रकार हाताळले. परंतु पुढेपुढे शब्दांचे खेळ वाढू लागले व कवितेचा आत्मा गुदमरू लागला. तेव्हा केशव कुमारांनी (म्हणजे आचार्य अत्रे यांनी हो..)

‘जवळ जाऊंनी चोरपाऊली

नजर चोरटी आत टाकली!

आणि तेथले दृश्य पाहुनी

थक्क जाहला क्षणभरी मनी’

असा पॉवरफुल डोस देऊन या कवींचे चौर्यकर्म उघडकीस आणले.

“समीप होते त्यांचीया ग्रन्थ जाडे,

कागदाची आणखी तशी बाडे

त्यात बघुनी सारखा झपाट्याने

लिहीत होता कायसे मुकाट्याने!”

याहीपुढे जाऊन केशवकुमारांनी

“धन्य ते चौर्य जाणावे अब्रू जे जगी वाढवी,

धिक धिक चौर्य मित्रा, जे नाव लौकिक घालवी”

अशा शब्दांत कविमित्र चोराची निर्भत्सना करतोय.

चोराची आळंदी

मी विडंबनकार कसा झालो याबाबत खुद्द आचार्य सांगतात- ‘खरंतर त्यावेळच्या बालकवी, केशवसूत आदी कवीमंडळींप्रमाणे आपणही कविता कराव्यात असे मनात होते. पण हे मनासारखे होत नव्हते तोच “माझ्यासारखा लाजरा माणूस आपली चालचलणूक आणि चर्या बदलून खुशाल विडंबन काव्याच्या खुंटावर येऊन बसलेला होता.. गोविंदाग्रज, बालकवी सोडून देवाच्या आळंदीला पोहोचायच्या ऐवजी मी चोराच्या आळंदीला जाऊन पोहोचलो. खरंतर 1922मध्येच झेंडूची काही फुले तयार झालेली हॊती. परंतु समाजभयाने किमान अडीच-तीन वर्षे ते हस्तलिखित बंदिस्त होते. त्यानंतर इतिहासाचार्य राजवाडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शारदोपासक संमेलनात झेंडूच्या फुलाचे वाचन झाले. पहिल्या कवितेच्या वाचनानंतर हलकेसे स्मित आले. मात्र नंतरच्या कवितांनी हास्यधबधबा सुरु झाला.” रविकिरण मंडळातले कवी जर फाटकेतुटके असते आणि त्यांच्या काव्यात गुणांचा लवलेश नसता तर झेंडूच्या फुलांना महाराष्ट्रात जी अपरंपार लोकप्रियता लाभली ती मुळी लाभलीच नसती, असे खुद्द आचार्य यांनीच म्हटलेले आहे.

संयुक्त महाराष्ट्रातही लोकप्रिय

“मना नीटपंथे कधीही न जावे

निशापाणी केल्याप्रमाणे चलावे

जरी वाहने मागूनी कैक येती

कधी ना तरी सोडीजे शांतवृत्ती!”

असे कितीही मासले दिले तरी झेंडूच्या फुलांनी संयुक्त महाराष्ट्र आंदोलन गाजवले यात शंकाच नाही. महाराष्ट्रविरोधी नेहरू, स. का. पाटील, मोरारजी देसाई, काकासाहेब गाडगीळ, शंकरराव देव, भाऊसाहेब हिरे, यशवंतराव चव्हाण आदी काँग्रेस नेत्यांना केशवकुमारांनी सळो की पळो करून सोडले होते.

“आता मराठ्यांनो उठा

हातात घ्या काळे निशाण

ते दोन मंत्री बेईमान

आले हिरे! आले चव्हाण!!”

तसेच

“मंत्री हा जुल्मी गडे,

यास पुन्हा निवडू नका।

छळीतो हा फार तुम्हा,

यास मत देऊ नका।।”

“उपवासी देव माझा,

सांगा कुणी पाहिला।

जीर्ण मलीन पंचा ज्याचा,

बघुनी जीव घाला।।

आरती हिरे भाऊ, नका राजीनामा देऊ”

अशा अनेक झेंडूच्या फुलांनी महाराट्र आंदोलन नटलेले आहे. या झेंडूच्या फुलांना सुगंध नसेल तरीही हे चुकीचं चाललं आहे, केवळ शब्दांचा अट्टाहास आहे, यात जिवन्तपणा नाही आणि तो जिवंतपणा येण्यासाठी थोडीशी छुरी चालवली पाहिजे. पण कुणालाही जखम तर व्हायला नको, या काळजीने शब्द चालवलेले आहेत. त्याने निश्चितच मनाला आनंद मिळतो व चेहऱ्यावर स्मित झळकते. कुणाला ही फुले आवडली नाहीत तर केशवकुमार सांगतात..

“रागाने चुरगळलीस जरी ही पुशपे कधी त्वा बरे…।

केव्हाही विसरू नकोस तळीचे खाण्या परी खोबरे।।”

आम्ही तरी दुसरे काय सांगणार??

छायाचित्र मांडणीः प्रवीण वराडकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

आतातरी एकनाथरावांना पडली ठाण्याची चिंता! हेही नसे थोडके!!

एकनाथराव शिंदे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा ते 'चिंता करतो राज्याची..' या भूमिकेत होते. उपमुख्यमंत्री झाल्यापासून 'चिंता करतो पक्षाची!', या भूमिकेत आल्यासारखे वाटते. आणि कालपरवा त्यांना चक्क 'चिंता वाटते ठाण्याची..' या भूमिकेपर्यंत बदल झाल्यासारखे दिसत आहे. ठाणेकरांना त्याचा प्रत्यय येईल...

मराठी पाऊल.. किती काळ गाणार ही रुदाली?

या आठवड्याच्या प्रारंभी कविवर्य महेश केळुस्कर यांच्या 'जय भवानी, जय शिवाजी' या राजकीय कादंबरीचे ऍड. राजेंद्र पै यांच्या हस्ते प्रकाशन झाले. यानिमित्ताने डिम्पल प्रकाशन व बोधगया यांनी 'मराठी पाऊल पडते पुढे-मागे' या नेहमीच्याच विषयावर चर्चा ठेवली हॊती. कादंबरी प्रकाशित...

‘राडा’ संस्कृतीवरचा मुख्यमंत्र्यांचा उतारा होईल का पुरेसा?

कालच्या गुरुवारी राज्य विधिमंडळ परिसरात व नंतर विधिमंडळाच्या लॉबीत दोन आमदारांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेली झटापट तसेच हाणामारी लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अखेर आमदारांचे 'कान' टोचावेच लागले. 'जनता म्हणते की, आमदार माजले आहेत' हे आपण आपल्या वर्तनावरून जनतेला दाखवून...
Skip to content