भारतीय तटरक्षक दलाच्या ‘समुद्र पहरेदार’ या प्रदूषण नियंत्रण जहाजाने ब्रुनेईमध्ये मुआरा येथे नुकताच थांबा घेतला. आशियाई देशांत सागरी तैनातीचा भाग म्हणून हा थांबा घेतला गेला. भारतीय तटरक्षक दलाच्या विशेष जहाजाने आशियाई देशाला भेट देण्याचा हा कार्यक्रम म्हणजे, सागरी प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 2022मध्ये घोषित केलेल्या भारत-आसिआन उपक्रमाचा भाग आहे.
कंबोडियामध्ये आसियान देशांच्या संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीत ही घोषणा झाली होती. तीन दिवसांच्या या थांब्यात समुद्र पहरेदार, या नौकेवरील कर्मचारीवृंद व्यावसायिक देवघेव करतील. सागरी प्रदूषण प्रतिसाद, सागरी शोध व बचाव, आणि सागरी कायद्याची अंमलबजावणी यावर यांचा भर असेल. एकमेकांच्या डेकवर प्रशिक्षण, विषयतज्ज्ञांकडून ज्ञानाची देवाणघेवाण आणि ब्रुनेई सागरी संस्थांबरोबर क्रीडास्पर्धा आदी कार्यक्रम यावेळी घेतले जातील.

भारत आणि ब्रुनेईच्या तटरक्षक दलांच्या दरम्यानचे संबंध बळकट करण्याच्या उद्देशाने ही भेट महत्त्वाची ठरेल. शिवाय आत्मनिर्भर भारत आणि मेक इन इंडिया या संकल्पनांचे समर्थन करणारी जहाजबांधणी क्षेत्रातील भारताची ताकद दाखवून देण्यासाठीही ही भेट उपयुक्त ठरेल. समुद्र पहरेदार वर स्वार झालेले राष्ट्रीय छात्र सेनेचे 25 छात्र तेथील स्थानिक तरुणांच्या सहयोगाने किनारा स्वच्छता कार्यक्रमात भाग घेतील. सरकारच्या ‘पुनीत सागर अभियानाचा’ हा भाग असेल.
परकीय देशांशी मैत्रीपूर्ण संबंध राखणाऱ्या देशांबरोबर आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढवण्यास आणि द्विपक्षीय संबंध वृद्धींगत करण्यास भारतीय तटरक्षक दल वचनबद्ध आहे. ही सागरी तैनात म्हणजे एकप्रकारे, त्या वचनबद्धतेचाच दाखला आहे. मुआरापूर्वी या जहाजाने व्हिएतनाम आणि फिलिपाईन्सला भेट दिली होती. आसियान क्षेत्रात धोरणात्मक सागरी संबंध सुरळीत राखण्यासाठी भारताचे सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचेच हे द्योतक आहे.
सागरी प्रदूषणावर सर्वांनी मिळून उपाय करण्यासाठी भारताची कटिबद्धता, सागरी सहकार्य वाढवून सागरी सुरक्षेत वाढ करण्याचे भारताचे प्रयत्न, हे ‘सागर (सर्व प्रदेशांत सुरक्षा आणि वृद्धी)’ तसेच ‘पूर्वेकडे कृती’ आणि हिंद-प्रशांत दृष्टिकोन या धोरणांशी सुसंगत आहे. भारतीय तटरक्षक दलाचे समुद्र पहरेदार जहाज आसिआन क्षेत्रात तैनात होते, हे भारताच्या याच प्रयत्नांचे प्रतिबिंब म्हटले पाहिजे.