26/11नंतर आता 22/4. देशावरचा गेल्या पंधरा वर्षांतील सर्वात मोठा हल्ला. आतंकवादाचा क्रूर आणि भीषण चेहरा मुंबईवरील “कसाब”करणीत जसा समोर आला, सामान्य जनता तेव्हा जशी हादरली, तसाच प्रकार काश्मीरमधील पहलगाममध्ये घडला यात शंका नाही. ऊरी आणि पुलवामा हे हल्लेही भीषणच होते. पण ते हल्ले आणि पहलगामचा हल्ला यात फार मोठा फरक आहे. सर्वसामान्य पर्यटकांना, काश्मीरच्या अंत्यंत सुंदर अशा पहेलगाममध्ये अचानक घेरले गेले. देशातील सर्वसामान्य माणसाच्या मनात दहशत निर्माण व्हावी आणि त्याचबरोबर मोदी सरकारची जगात छीथू व्हावी, भारताला मोठा मानसिक हादरा बसावा, हेच या हल्ल्याचे सूत्र होते. चारच अतिरेकी अचानक जनतेत घुसून कसा हैदोस करू शकतात, भीतीचा किती मोठा माहौल उभा करू शकतात, हे मुंबईवरील 26 नोव्हेंबरच्या हल्ल्यात जाणवले होते. तसेच ते पहलगाममध्ये एप्रिल 22 तारखेच्या हिंसेच्या तांडवात जाणवले. तोच संताप. तीच शोकाची, दुःखाची लाट देशभरात उसळली.
2008मधील कसाबचा मुंबई हल्ला आणि पहलगामच्या एप्रिल 22चा हल्ला यादरम्यान देशातील राजकारण मोठ्या प्रामाणात बदललेले आहे हाही एक फरक आहेच. त्यावेळी कोणताही एक पक्ष सत्तेत नव्हता. युपीए-1 हे अनेक लहान पक्षांचे मिळून बनलेले कडबोळे सरकार देशात केंद्रीय सत्ता सांभाळत होते. डॉ. मनमोहन सिंग पंतप्रधान होते तर सोनिया गांधी या सूत्रसंचालक होत्या. आजही कोणत्याही एका पक्षाचे नव्हे तर आघाडीचे सरकार आहे. पण 2008मध्ये मध्यवर्ती सरकारच्या आघाडीचे नेतृत्त्व करणाऱ्या सोनिया गांधी आणि डॉ. सिंग या दोघांत पूर्ण समन्वय नव्हता. आज मोदींच्या नेतृत्त्वातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीत भाजपा हा देशातील सर्वात मोठा राजकीय पक्ष केंद्रस्थानी आहे. आणि मोदींचे जे मित्रपक्ष सरकारमध्ये आहेत त्यांची संख्याही भाजपाच्या खासदार संख्येच्या मानाने दहा-पंधरा टक्क्यांच्या पुढे जात नाही. याउलट 2008मध्ये काँग्रेस बहुमतापासून प्रचंड लांब होता. काँग्रेसकडे लोकसभेत फक्त 145 खासदार होते आणि सीपीएमप्रणित डाव्या आघाडीचे 59 खासदार, मायावतींचे 19, मुलायम सिंगांच्या सपाचे 36, आणखीही काही लहान पक्ष अशा साऱ्यांच्या टेकूंवर ते सरकार अवलंबून होते. आणि या सर्वांचाच राजकीय अजेंडा निरनिराळा होता. याउलट सध्याच्या सरकारमध्ये मोदी व शाहांच्या नेतृत्त्वातील भारतीय जनता पक्षाकडे 240 खासदार आहेत. लोकसभेतील बहुमतापेक्षा फक्त 30 खासदार कमी, अशी त्यांची स्थिती आहे. त्यातही नीतीशकुमार आणि चंद्राबाबू नायडू या दोघा मुख्यमंत्र्यांचे पक्ष भाजपाबरोबर ठाम उभे आहेत. हे दोघेही राष्ट्रीय धोरणात कोणताही हस्तक्षेप करत नाहीत. जे जे मोदी व शाह ठरवतील, जे भाजपा ठरवेल, त्याला मित्रपक्षांचा बिनशर्त आणि संपूर्ण पाठिंबा मिळताना दिसत आहे. असे आतासारखे भक्कम सरकार 2008मध्ये नव्हते.

त्याहीवेळी देशात काहूर उठले होते की, पाकिस्तानला आत घुसून मारा, धडा शिकवा. पण त्यावेळी भारताचा प्रतिसाद तत्पर व तीव्र नव्हता. थोडे दिवस सीमेवर तणाव निर्माण झाला. मनमोहन सिंगांच्या सरकारने सैन्याला तयारीचे आदेश दिले होते. सैन्याचा जोरदार सरावही सुरु होता. पण प्रत्यक्षात फारसे काही झाले नाही. पण तेच मोदी सत्तेत असताना पहिल्या टर्ममध्ये ऊरीमध्ये सैन्यतळांवर व पुलवामामध्ये सैन्याच्या वाहनांच्या ताफ्यावर अतिरेकी हल्ले झाले, तेव्हा भारताने दिलेला प्रतिसाद पाकला हादरवणारा व जगालाही चकित करणारा ठरला. भारताने सर्जिकल स्ट्राईक केले. पाकव्याप्त काश्मीरमधील पाकिस्तानी लष्कराने चालवलेले अतिरेक्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. पहलगामचा हल्ला गेल्या पाच वर्षांतील शांततेनंतरचा हल्ला आहे. काश्मीरचा प्रश्न कायमचा निकाली काढण्यासाठी भारत सरकारने एका झटक्यात कलम 370 रद्द करून टाकल्यानंतरचा हा हल्ला आहे. गेल्या पाच वर्षांत अतिरेक्यांच्या सीमेपलिकडच्या तसेच काश्मीरमधील हालचाली मंदावल्यानंतर, तिथे पर्यटनाने जोरदार चालना घेतल्यानंतरचा हा हल्ला आहे.
काश्मीरची लोकसंख्या आहे अडीच कोटी. आणि तिथे गेल्या वर्षभरात पर्यटक गेले आहेत, पावणे तीन कोटी. म्हणजेच जम्मू-काश्मीरमध्ये प्रचंड आर्थिक उलाढाल सुरु झाली. लोकांना स्थैर्य लाभले आहे. नेमक्या अशाचवेळी, थेट पर्यटन व्यवसायावरच हा हल्ला झाला आहे. म्हणूनच काश्मिरी जनता संतापली. काही वर्षांपूर्वी अतिरेक्यांना पाठिंबा देण्यासाठी काश्मिरी जनता रस्त्यावर उतरत असे. पण यावेळी अतिरेक्यांच्या विरोधात लोक रस्त्यावर होते, हा प्रचंड मोठा फरक झाला आहे. पहलगामधील या हल्ल्यामध्ये पाक लष्कराचा हात होता, हेही पुरेसे स्पष्ट झाले आहे. पाकने शिकवून तयार केलेले अतिरेकी आले होते. एक अतिरेकी तर पाकिस्तानी सैन्याच्या स्पेशल फोर्सेसमधील जवानच होता असेही पुरावे पुढे आले. आता यानंतर भारत काय करणार? कोणते कठोर पाऊल उचलणार? भारताला आता केवळ सर्जिकल स्ट्राईक करून चालणार नाही. त्याहून अधिक कृती करून पाकिस्तानला चांगली अद्दल घडवावी लागेल. तसेच मोदी सरकार करेल, हेही दिसतेच आहे. पाकवर सोडलेले, “सिंधु जलास्त्र” चांगलेच वर्मी लागले आहे. सिंधु जलवाटप करार भारताने एकतर्फी मोडीत काढल्यामुळे पाकपुढे झेलमसारख्या नद्यांमधून अचानक सोडलेल्या जादा पाण्याच्या पुराचे संकट ओढवले आहे, तर दुसरीकडे सिंधू, रावी, बिआसचे पाणी रोखले तर दुष्काळाचे संकट ओढवणार आहे. भारताने आता नौदल आणि वायुदलाला सज्ज केले आहे. लष्कराच्या तुकड्या पाक सीमेजवळ आणून ठेवल्या आहेत. क्षेपणास्त्रांच्या दिशा पाककडे रोखल्या आहेत. या साऱ्या तयारीबरोबर राजधानी दिल्लीतील, “1 न्यायमार्ग” हे पंतप्रधान मोदींचे निवासस्थान सतत सुरु असणाऱ्या उच्चस्तरीय बैठकांनी गजबजून गेले आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राष्ट्रीय सुरक्षा समितीच्या तीन-तीन बैठका झाल्या आहेत. एरवी या समितीची बैठक वर्षा-दोन वर्षांतही होत नाही.

राहुल गांधी व मल्लीकार्जून खर्गे या संसदेतील दोन्ही विरोधी पक्षनेत्यांसह तमाम विरोधी पक्षांनी, एकमुखाने सरकारच्या कारवाईला पाठिंबा दिला आहे. अगदी ओवेसींसारखे कट्टर मुस्लीम नेतेही पाकला लाखोली वाहताना दिसत आहेत. मात्र तरीही काँग्रेसमधील काही वाचाळवीर मात्र देशातील जनतेच्या भावनांशी खेळत आहेत. यातील पहिले वीर आहेत आपले महाराष्ट्र विधानसभेतील माजी विरोधी पक्षनेते, माजी मंत्री विजय वडेट्टीवार. ते म्हणाले की, “अतिरेकी गोळीबार करताना धर्म कशाला विचारतील, तितका वेळ तरी असतो का त्यांना?”. दुसरे वाचाळवीर कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी म्हटले की, पाकबरोबर युद्ध करू नका. तिसरे राहुल गांधींचे “मित्र”, शेतकरी नेते राकेश टिकैत म्हणाले की, पाकचे पाणी थांबवू नका. त्याने तिथला शेतकरी अडचणीत येईल. अशा या नेत्यांच्या अकलेच्या दिवाळखोरीबद्दल काय बोलावे? भारतीय लोक संतापाने वेडे झाले आहेत. अतिरेक्यांनी गोळ्या मारण्याआधी लोकांना धर्म विचारला. हिंदूंना टिपून टिपून मारले. हे सारे उघड झाले असताना, वडेट्टीवार मृतांच्या कुटुंबियांच्या भावनांशी खेळत आहेत. देशाच्या भावनांशी खेळत आहेत. ही तर काँग्रेसवाल्यांची विनाशकाले विपरीत बुद्धी!
पंतप्रधान मोदी आपला अरब देशांचा दौरा अर्धवट टाकून 22 एप्रिलच्या रात्रीच भारतात परतले व तेव्हापासून त्यांनी पाकला कोणते कठोर उत्तर भारत देणार आहे त्याची तयारी सुरु केली आहे. हे स्पष्ट दिसत असूनही काँग्रेसच्या सोशल मीडिया सेलच्या प्रमुखांनी नस्ता आगाऊपणा केला. मोदी देशाच्या साऱ्या हालचालींमधून गायब आहेत, असे सुचवणारे एक प्रक्षोभक चित्र त्यांनी काँग्रेसच्या अधिकृत एक्स हँडलवरून प्रसृत करून टाकले. अशी पोस्ट पक्षाच्या अकलेची दिवाळखोरीच दर्शवते, याचे खर्गे व राहुल यांना थोडेतरी भान असावे. त्यांनी या वाचाळ व मूर्ख नेत्यांची कानउघाडणी केली. जयराम रमेश तर म्हणाले की, अशा विधानांशी काँग्रेस पक्षाचा कोणताच संबंध नाही. एक्सवरील वादग्रस्त पोस्ट काँग्रेसने तासाभरातच हटवली खरी, पण तोवर पक्षाचे जे नुकसान झाले ते झालेच आहे. अशा बेताल बडबडीचा तसेच मूर्ख कृतींचा बदला, जनता पुढे घेतल्याशिवाय राहणार नाही. पण याचेही भान वडेट्टीवारांसारख्या वाचाळ, मूर्खांना नसावे हे दुर्दैव!