Homeटॉप स्टोरीआता मंत्रालयात दिलेल्या...

आता मंत्रालयात दिलेल्या पत्रांचा ठावठिकाणा कळणार मोबाईलवरच!

येत्या महाराष्ट्र दिनापासून मंत्रालयात आपल्या पत्रांचा पाठपुरावा करण्यासाठी चपला झिजवणाऱ्या अभ्यागतांना मंत्रालयातल्या त्यांच्या पत्रांचा ठावठिकाणा मोबाईलवरच मिळण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच इतर मंत्री वा अधिकारी यांना पत्र देण्यासाठी तसेच त्यांचा पाठपुरावा करण्याकरीता दररोज हजारो लोक मंत्रालयात येत असतात. यामुळे मंत्रालयात मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. दैनंदिन कामात अडथळा येतो. तो रोखण्यासाठी मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर सेंट्रल रजिस्ट्री युनिट उभारले जात आहे. याद्वारे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांपासून ते सचिवांपर्यंत ३७ विभागांची दररोजची सुमारे ४० हजार पत्रे प्रवेशद्वारावरील याच युनिटमध्ये स्वीकारली जाणार आहेत. या खिडक्यांवर तत्काळ ही पत्रे स्कॅन होऊन थेट संबंधित विभागात पोहोचणार आहेत. त्याचे ‘टोकन’ पत्र देणाऱ्या व्यक्तीच्या मोबाईलवर मिळणार आहे, असे कळते.

सरकारच्या माहिती तंत्रज्ञान विभागाकडून यासाठी ऑनलाईन यंत्रणा उभारली जात आहे. प्रवेशद्वारावरील सेंट्रल रजिस्ट्री युनिटमध्ये स्वीकारलेल्या पत्रांवर नेमकी काय कारवाई सुरू आहे हे पत्र देणाऱ्या व्यक्तीला अगदी गावात बसूनही संबंधित वेबसाईटवर टोकन नंबर टाकताच कळणार आहे.

माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी आज याबाबत अधिकृत माहिती एका पत्रकार परिषदेत दिली. मंत्रालयात येणाऱ्या सामान्य नागरिकांच्या टपालावर जलद गतीने कार्यवाही व्हावी यासाठी मंत्रालयात मध्यवर्ती टपाल केंद्र सुरू करण्यात येत आहे. शासनाचा कारभार पारदर्शक होण्यासाठी मंत्रालयातील सर्व प्रशासकीय विभागात ई-ऑफिस होण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्यात येत असून, शासनाचा कारभार हा लवकरच कागदविरहित (Paperless) करण्याचा शासनाचा मानस असल्याची माहिती सौनिक यांनी दिली.

मंत्रालयीन प्रशासकीय विभागांना नागरीकांकडून तसेच क्षेत्रिय कार्यालयांकडून पाठविण्यात येणारे टपाल स्वीकारण्यासाठी मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ मध्यवर्ती टपाल केंद्र सुरू करण्यात येणार आहे. सामान्य प्रशासन विभागाच्या अधिपत्याखालील कार्यालयांमध्ये प्राप्त होणाऱ्या टपालांवर तत्काळ कार्यवाही व्हावी व वेळेचा अपव्यव टाळण्यासाठी मंत्रालयातील सर्व प्रशासकीय विभागात तसेच क्षेत्रीय कार्यालयांतील पत्रव्यवहार करताना प्रत्येक टपाल ई- ऑफिसच्या माध्यमातून पाठविण्यासाठी ई-ऑफिस प्रणालीचा वापर प्रभावीपणे करण्यासाठी कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. मंत्रालयात फक्त टपाल देण्यासाठी येणाऱ्या नागरिकांकडून आणि क्षेत्रीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांद्वारे प्राप्त होणारे टपाल स्वीकारण्यासाठी कार्यालयीन वेळेत मंत्रालयाच्या मध्यवर्ती टपाल केंद्रात टपाल स्वीकृतीसाठी विभाग व कार्यालयनिहाय व्यवस्था करण्यात आली आहे. या केंद्रामध्ये संबंधित विभागाने स्विकारलेले टपाल स्कॅन करुन ते संबंधित प्रशासकीय विभागाच्या नोंदणी शाखेस ई-ऑफिसद्वारे ऑनलाईन पाठविण्यात येईल. याकरिता मध्यवर्ती टपाल केंद्रातील विभागांकरिता स्वतंत्र ई-खाते एनआयसी (NIC) मार्फत तयार करण्यात येणार आहे, असे त्या म्हणाल्या.

नोंदणी शाखेस ई-ऑफिस प्रणालीद्वारे ऑनलाईन पाठविण्यात आलेल्या टपालावर संबंधित विभागाने ई-ऑफिस प्रणालीच्या माध्यमातून कामकाज करणे अपरिहार्य आहे. मंत्रालयीन प्रशासकीय विभाग तसेच क्षेत्रीय कार्यालयांमार्फत पाठविण्यात येणारे जे टपाल (उदा. नकाशे, पुस्तके इ.) ई-ऑफिसच्या माध्यमातून पाठविणे शक्य नाही, असे टपाल समक्ष स्वीकारले जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले.

आपले सरकार वेबपोर्टलही होणार लोकाभिमुख

‘आपले सरकार’ वेब पोर्टलच्या माध्यमातून 511 सेवांपैकी ३८७ सेवा नागरिकांना दिल्या जातात. शासनाच्या जास्तीतजास्त सेवा लोकाभिमुख करण्यासाठी आपले सरकार पोर्टलमध्ये 124 सेवांचा समावेश करण्यात येणार आहे. त्याचबरोबर नागरिकांना आपले अर्ज दाखल केल्यापासून सेवा सहज मिळाव्यात यासाठी मोबाईल ॲपदेखील सुरू करण्याचा शासनाचा मानस आहे, असेही त्यांनी सांगितले.

Continue reading

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...
Skip to content