Homeडेली पल्सजगाला गवसणी घालून...

जगाला गवसणी घालून भारतात परतल्या नौदलाच्या नाविका!

आठ महिन्यांत ‘आय.एन.एस.व्ही तारीणी’ या विषेश नौकानयन जहाजावरील 25000हून अधिक नॉटिकल मैलाच्या प्रवासात, तीन महासागरे, चार मोठी बेटे आणि तीन समुद्रीतळांना भेट देऊन भारतीय नौदलाच्या दोन महिला अधिकारी गुरुवारी भारतात परतल्या. गोव्यातील भारतीय नौदलाच्या मोले जेट्टी, मार्मुगाव पोर्ट इथे आयोजित कार्यक्रमात, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी लेफ्टनंट कमांडर दिलना के आणि लेफ्टनंट रुपा यांचे स्वागत करुन त्यांच्या धाडसाचे कौतुक केले. या महिला अधिकाऱ्यांनी भारताचा तिरंगा झेंडा जगभर फडकविला ही अभिमानाची बाब आहे, असे सिंह म्हणाले.

गुरुवारी ‘सागर परिक्रमा 02’च्या सांगता समारंभात छायाचित्रांसह या जागतिक प्रदक्षिणा मोहिमेची माहिती देणारी ‘ब्रेकिंग वेव्ज, मेकिंग हिस्टरी’ ही पुस्तिकाही प्रकाशित करण्यात आली. गुरुवारीच नॅशनल डिफेंस एकेडमीत 17 महिला अधिकाऱ्यांनी प्रशिक्षण पूर्ण केले याचा उल्लेख करुन सिंह म्हणाले की, भारतात नारीशक्तीचा उदय होतोय ही देशवासीयांची मान उंचावणारी बाब आहे.

02 ऑक्टोबर 2024ला गोव्यातून ‘सागर परिक्रमा 02’ या मोहिमेंतर्गत प्रवासाला सुरुवात करुन या महिला अधिकाऱ्यांनी 25,600 नॉटिकल मैल (50,000 किलोमीटर) अंतर कडक थंड हवामान आणि दक्षिण महासागरातील वादळी हवामानाला तोंड देऊन पार केले. त्यांनी फ्रेमेंटल (ऑस्ट्रेलिया), लिटलटन (न्यूझीलंड), पोर्ट स्टेनली (फॉकलंड आयलंड) आणि केप टाऊन (दक्षिण आफ्रिका) या बंदराना भेटी दिल्या. त्यांच्या भेटीत तेथील उच्चायुक्ताचे अधिकारी, अनिवासी आणि निवासी भारतीयांनी त्यांना भेटून त्यांचे मनोधैर्य उंचावले. गुरुवारी झालेल्या कार्यक्रमाला गोव्याचे मुख्य सचिव डॉ. व्ही कंडावेल्लू, महासंचालक आर्मड फोर्सेस मेडिकल कॉलेज, व्हाईस एडमिरल आरती सरीन, नौदलाच्या दक्षिण विभागाचे मुख्य ध्वज अधिकारी वाईस एडमिरल व्ही. श्रीनिवास, कमांडर (निवृत्त) अभिलाष टोमी आदी उपस्थित होते.

सागर परिक्रमा-

“सागर परिक्रमा” हा संरक्षण दलांमध्ये कार्यरत भारतीय महिलांच्या सामर्थ्याचे आणि लवचिकतेचे दर्शन घडविणाऱ्या तसेच भारताच्या स्वदेशी जहाजबांधणी क्षमतेला अधोरेखित करणाऱ्या सागरी नौकानयनाला चालना देण्याच्या उद्देशाने सुरु केलेला महत्त्वाचा उपक्रम आहे. “सागर परिक्रमा 01” मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात 2017-2018मध्ये सहा महिलांच्या चमूने अशीच सागर परिक्रमा केली होती.

अंतिम टप्पा-

अंतिम टप्प्याला केपटाऊन ते गोवा अशी सुरुवात झाली. “आयएनएसव्ही तारिणी”ने 15 एप्रिल 2025 रोजी रॉयल केप यॉट क्लब (आरसीवायसी), केपटाऊन येथून गोव्याच्या दिशेने समारंभपूर्वक प्रयाण केले. केपटाऊनमधील भारताचे कौन्सिल जनरल, भारताचे दक्षिण आफ्रिकेसाठी नेमलेले संरक्षण संलग्नक, आरसीवायसी प्रशासक मंडळाचे सदस्य आणि केप टाऊन येथील भारतीय समुदायाच्या प्रतिनिधींनी या महिला अधिकाऱ्यांना निरोप दिला.

केप टाउनच्या बंदरावरील मुक्कामादरम्यान “आयएनएसव्ही तारिणी”ने अनेक संपर्क कार्यक्रम तसेच राजनैतिक कार्यक्रमांसाठीचे केंद्र म्हणून भूमिका निभावली. यावेळी अधिकाऱ्यांनी भारताचे दक्षिण आफ्रिकेतील उच्चायुक्त प्रभात कुमार, वेस्टर्न केपचे उपसभापती रेगन अॅलेन, माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आणि भारताचे मित्र जोनाथन ऱ्होड्स, प्रतिष्ठित गोल्डन ग्लोब शर्यत 2022-23ची विजेती आणि सुप्रसिद्ध एकल परिक्रमक किर्स्तेन नॉशफर, रुबी जसप्रीत आणि केपटाऊन येथील भारताचे काऊंसिल जनरल, भारतीय समुदायाचे सदस्य आणि स्थानिक मान्यवर यांच्याशी सुसंवाद साधला. मान्यवर पाहुण्यांचे स्वागत करण्याव्यतिरिक्त “आयएनएसव्ही तारिणी”च्या कर्मचाऱ्यांनी लैंगिक समानता, महिला सक्षमीकरण आणि स्वदेशी बोट बांधणीमध्ये भारताची क्षमता अशा विषयावरील कार्यक्रमांत सहभाग नोंदवला.

भारतीय समुदायाच्या विद्यार्थ्यांशी विशेष संवाद, केपटाऊनमधील आरसीवायसी येथे प्रमुख नागरिक आणि राजनैतिक समुदायाच्या सदस्यांसोबत अनुभव सामायिक करणे व समुद्रातील नौकानयनाचे आव्हान तसेच “नाविका सागर परिक्रमे”मागील दृष्टिकोन यांचा या कार्यक्रमांत समावेश होता. शिवाय वेस्टर्न केप विद्यापीठातील प्राध्यापक आणि निवडक विद्यार्थ्यांसोबत एक औपचारिक सत्र, नौदल कॉलेजमध्ये नौदल विद्यार्थी आणि नौदल अधिकाऱ्यांशी संवाद आणि रॉयल केप यॉट क्लब (आर सी वाय सी) सेलिंग अकादमीच्या तरुण इच्छुकांशी संवाद, यांचाही या कार्यक्रमात समावेश होता.

आयएनएसव्ही तारिणी

मेसर्स अ‍ॅक्वेरियस शिपयार्ड लिमिटेडने बांधलेले हे 56 फूट लांबीचे जहाज 18 फेब्रुवारी 2017 रोजी भारतीय नौदलात सामील झाले. या जहाजाने आतापर्यंत 66,000 नॉटिकल मैल (1,22,223 किमी)पेक्षा जास्त प्रवास केला आहे. प्रगत नेव्हिगेशन, सुरक्षा आणि दळणवळण उपकरणांनी सुसज्ज अशा या जहाजाने 2017मध्ये “नाविका सागर परिक्रमे”च्या पहिल्या आवृत्तीतही भाग घेतला होता. नाविका सागर परिक्रमेचा लोगोतला मध्यवर्ती अष्टकोनी आकार भारतीय नौदलाचे प्रतिनिधित्व करतो. शिवाय सूर्य एका खगोलीय पिंडाचे प्रतीक आहे असून होकायंत्र आव्हानात्मक समुद्रांमधून खलाशांना मार्गदर्शन करणारे नेव्हिगेशन दर्शवितो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

पावसाळ्यात पाणी तुंबणे ही तर मुंबईची एक परंपरा!

सतत मुसळधार पावसात मुंबईत पाणी तुंबणे ही गेले कित्येक दशकांची परंपरा आहे आणि मुंबईत कोसळणाऱ्या पावसाने मेघालयातील चेरापुंजीला कधीच मागे टाकले आहे. रस्ते, रेल्वे आणि बरोबरीने हवाई वाहतूक ठप्प होणे अशा प्रकारामुळे भारतातच नव्हे तर भारताबाहेरदेखील “मुंबई की बारीश”ची एक...

‘ऑपरेशन सिंदूर’वरही निघाले पुस्तक!

एखादी लक्षवेधी घटना घडली की लेखकांचे हात लगेचच शिवशिवतात. मग, ती १९९२मधली भीषण जातीय दंगल असो की, मार्च १९९३मधले बॉम्बस्फोट असो. २६/११चा मुंबईतला दहशतवादी हल्ला असो की काश्मीरमधला दहशतवाद. त्यावर आधारीत कथा, पुढे पटकथा आणि नंतर चित्रपट अशी मालिका...

प्रवासीभाडे नाकारणाऱ्या 28 हजार रिक्षा-टॅक्सीचालकांचे परवाने होणार रद्द!

प्रवासीभाडे नाकारणे, विनागणवेश वाहन चालविणे, ज्यादा प्रवासी अशा गुन्ह्यांविरोधात 18 एप्रिल ते 02 मे या काळात मुंबईत चालविलेल्या मोहिमेत 48,417जणांविरुध्द ई-चलान कारवाई करुन पोलिसांनी 40,25,356 रुपये दंड वसूल केला. यात प्रवासीभाडे नाकारणे- 28814, विनागणवेश वाहन चालविणे- 1164, ज्यादा प्रवासी घेऊन वाहन चालविणे- 6268 आणि 12171 इतर गुन्ह्यांचा समावेश होता....
Skip to content