संगीत रंगभूमीच्या वैभवशाली कालखंडाची आठवण करून देणारा संगीत-नाट्य महोत्सव मुंबईच्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रात नुकताच साजरा झाला. संगीत नाटकांना चांगले दिवस यावेत यासाठी संस्था गेली १६ वर्षे हा महोत्सव आयोजित करत आहे.

संगीत अमृतवेल हे खल्वायन, रत्नागिरी निर्मित, आणि डॉ. श्रीकृष्ण जोशी लिखित, मनोहर जोशी दिग्दर्शित, राम तांबे यांनी संगीत दिग्दर्शन केलेल्या संगाती नाटकाने महोत्सवाचा प्रारंभ झाला. त्यानंतर अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळ, रत्नागिरी निर्मित सं. ययाती आणि देवयानी, हे वि. वा. शिरवाडकर लिखित आणि गणेश जोशी दिग्दर्शित, नाटक सादर झाले. जितेंद्र अभिषेकी यांनी मूळ संगीत दिलेल्या या नाटकाच्या संगीत मार्गदर्शक स्मिता करंदीकर आहेत.

संगीत नाट्यमहोत्सवाचा समारोप विद्याधर गोखले नाट्य प्रतिष्ठान निर्मित सं. बावनखणी, हे विद्याधर गोखले लिखित आणि श्रीकांत दादरकर दिग्दर्शित नाटकाने झाला. नाटकाचे संगीतकार यशवंत देव असून संगीत मार्गदर्शन ज्ञानेश पेंढारकर यांचे आहे. नृत्य मार्गदर्शन स्मृती तळपदे यांचे असून निर्मिती प्रमुख शुभदा दादरकर आहेत.

तीन दिवस चाललेल्या या महोत्सवात कलाकारांनी अभिनयाची बाजूही चांगली सांभाळली. मुळात लोकप्रिय असलेल्या नाटकांनी बहार केली. जुनेजाणते कलाकार, अप्रतिम गाणी यांनी दोन्ही प्रयोग चांगलेच रंगले. गाण्यांना वन्स मोअरही मिळाले.